॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक पंधरावा : आत्मदशक

समास पहिला : चातुर्यलक्षण

॥ श्रीराम ॥

अस्थिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें ।
नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, सर्व शरीरे अस्थिमांसमयच असतात. त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्या त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो. (१)

घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें ।
व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥
घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो. त्यांपैकी काय व्हावे व काय होऊ नये, हे सर्व त्याला बरोबर कळते. (२)

येंकीं मागमागों घेणें । येकां न मागतांच देणें ।
प्रचीतीनें सुलक्षणें । ओळखावीं ॥ ३ ॥
एखाद्याला अनेक वेळा तोंड वेंगाडावे, तेव्हा एखादी गोष्ट मिळते. तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागताच लोक देतात. या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ते ओळखावे.

जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा ।
राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ॥ ४ ॥
(३) माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे. राहून राहून दुसऱ्यांच्या अंत:करणात काय चालले आहे, याचा शोध घ्यावा. (४)

जानवें हेंवडकारें जालें । ढिलेपणें हेवड आलें ।
नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥
जानवे ढिले असले की, ते एकात एक गुंतते. पण ते जर नीटनेटकेपणाने घातले असेल, तर शोभून दिसते. (५)

तैसेंचि हे मनास मन । विवेकें जावें मिळोन ।
ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥
त्याप्रमाणेच माणसाने विवेकाने आपले मन दुसर्‍याच्या मनाशी मिळवून घ्यावे म्हणजे चांगले. ढिलेपणाने उगीच मनात नाना कल्पनांना वाव मिळतो. (६)

अनुमानें अनुमान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो ।
याकारणें प्रत्यये तो । आधीं पाहावा ॥ ७ ॥
कल्पनेने कल्पना वाढत जाते. भिडेने कार्यभाग साधत नाही म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा. (७)

दुसयाचें जीवीचें कळेना । परांतर तें जाणवेना ।
वश्य होती लोक नाना । कोण्या प्रकारें ॥ ८ ॥
दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळत नसेल, त्याचे अंत:करण जाणता येत नसेल, तर मग अनेक लोक वश कसे होतील ? (८)

आकल सांडून परती । लोक वश्यकर्ण करिती ।
अपूर्णपाणें हळु पडती । ठाईं ठाईं ॥ ९ ॥
अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात. (९)

जगदीश आहे जगदांतरीं । चेटकें करावीं कोणावरी ।
जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ ॥ १० ॥
जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणिमात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावीत ? याप्रकारे जो विचार करून जाणून घेतो, तोच श्रेष्ठ होय. (१०)

श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ ।
कर्मानुसार प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥
जो श्रेष्ठ कार्य करतो, तोच श्रेष्ठ होय. कनिष्ठ असतो तो सामान्य कार्ये करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो. (११)

राजे जाती राजपंथें । चोर जाती चोरपंथें ।
वेडें ठके अल्पस्वार्थें । मूर्खपणें ॥ १२ ॥
राजे लोक राजमार्गाने जातात. चोर असतात ते चोरवाटेने जातात. वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणे वागतात. (१२)

मूर्खास वाटे मी शहाणा । परी तो वेडा दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाणा असतो. जो चतुर असतो, तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो. (१३)

जो जगदांतरे मिळाला । तो जगदांतरचि जाला ।
अरत्रीं परत्रीं तयाला । काय उणें ॥ १४ ॥
जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो, तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे ? (१४)

बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धिविण माणुस काचें ।
राज्य सांडून फुकाचे । भीक मागे ॥ १५ ॥
बुद्धी हे भगवंताचे देणे असते. ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो. त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागतो. (मनुष्यदेह प्राप्त झाला असता स्वस्वरूपज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानाने दु:खी होतो. ) (१५)

जें जें जेंथें निर्माण जालं । तें तें तयास मानलें ।
अभिमान देऊन गोविलें । ठाईं ठाईं ॥ १६ ॥
ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात. मान्य होतात. त्यांना त्याचा अभिमान वाटतो. पण अभिमानामुळे ते ठायी ठायी गुंततात. (१६)

अवघेच म्हणती आम्ही थोर । अवघेचि म्हणती आम्ही सुंदर ।
अवघेचि म्हणती आम्ही चतुर । भूमंडळीं ॥ १७ ॥
या जगांत सर्वच लोक म्हणतात की, आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत. आम्ही चतुर आहोत. (१७)

ऐसा विचार आणितां मना । कोणीच लाहान म्हणविना ।
जाणते आणिती अनुमाना । सकळ कांहीं ॥ १८ ॥
असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणवून घेत नाही. पण जाणते लोक असतात, ते कल्पनेने सर्व काही जाणतात. (१८)

आपुलाल्या साभिमानें । लोक चालिले अनुमानें ।
परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥ १९ ॥
आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहातात. पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतले पाहिजे. (१९)

लटिक्याचा साभिमान घेणें । सत्य अवघेंच सोडणें ।
मूर्खपणाचीं लक्षणें । ते हे ऐसीं ॥ २० ॥
खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा, ही तर चक्क मूर्खपणाची लक्षणे आहेत. (२०)

सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निराभिमान ।
न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ २१ ॥
जो सत्याचा अभिमान धरतो, तो निरभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापिही एक नव्हेत. (२१)

न्याये म्हणिजे तो शाश्वत । अन्याये म्हणिजे तो अशाश्वत ।
बाष्कळ आणि नेमस्त । येक कैसा ॥ २२ ॥
न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत होय. बाष्कळ आणि नेमस्त यांना एक कसे म्हणता येईल ? (२२)

येक उघड भाग्य भोगिती । येक तश्कर पळोन जाती ।
येकांची प्रगट महंती । येकांची कानकोंडी ॥ २३ ॥
एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो, तर दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो, तर एखाद्याचा मिंधेपणा असतो. (२३)

आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो सीण ।
धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥
उत्तम आचार-विचाराशिवाय जे जे काही करावे, तो उगीच शीण होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचाच शोध घ्यावा. (२४)

उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आळिले ।
धूर्तांपासीं कांहीं न चले । बाजायांचें ॥ २५ ॥
उदंड बाजारबुणगे एकत्र आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसापुढे बाजाऱ्यांचे काही चालत नाही. (२५)

याकारणें मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य ।
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥
याकारणे जे कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील, त्यांच्याशी सख्य करावे. असे केल्याने असंख्य बाजारबुणगे भोवती जमतात. (२६)

धूर्तासि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तींच पवाडे ।
उगेंचि हिंडती वेडे । कार्येंविण ॥ २७ ॥
हुशार माणसाला हुशार-चतुर माणूसच आवडतो. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीचच भटकत असतात. (२७)

धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मनास मनपण मिळालें ।
परी हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्वे ॥ २८ ॥
चतुर माणसालाच चतुरपणाची पारख होते. असे झाले की त्यांची मने मिळतात. पण हे सर्व काही गुप्तरूपाने केले पाहिजे. (२८)

समर्थाचें राखतां मन । तेथे येती उदंड जन ।
जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥
मोठ्या माणसाचे मन राखले, त्याला प्रसन्न करून घेतले की तेथे असंख्य लोक एकत्रित येतात. सज्जन माणसे आणि सामान्य लोकही आर्जव करतात. (२९)

वोळखीनें वोळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी ।
नीतिन्यायें वाट रोधावी । पाषांडाची ॥ ३० ॥
ओळखीने ओळखी वाढवाव्यात. आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा. नीतिन्यायाने वागून पाखंडमताचा प्रचार न होईल असा प्रयत्न करावा. (३०)

वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥
वेष साधासुधा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकांचे प्रेम जतन करावे, त्यात अंतराय पडू देऊ नये. (३१)

निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
प्रगट जाणतां सज्जन । दुल्लभ जगीं ॥ ३२ ॥
नि:स्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असते, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. (३२)

नाना जिनसपाठांतरें निवती सकळांचीं अंतरें ।
चंचळपणें तदनंतरें । सकळां ठाईं ॥ ३३ ॥
नाना विषयांच्या पाठांतराने युक्त, सर्वांच्या अंत:करणास निवविणारा असून तो चंचळपणे सर्वत्र संचार करीत असतो. (३३)

येके ठाईं बैसोन राहिला । तरी मग व्यापचि बुडाला ।
सावधपणें ज्याला त्याला । भेटि द्यावी ॥ ३४ ॥
तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला, तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल. म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. (३४)

भेटभेटों जरी राखणें । हे चातुर्याचीं लक्षणें ।
मनुष्यमात्र उत्तम गुणें । समाधान पावे ॥ ३५ ॥
वरचेवर भेट्रन त्यांना आपलेसे करावे, हीच चातुर्याची लक्षणे आहेत. उत्तम गुणांच्यामुळे मनुष्यमात्राला समाधान लाभते. (३५)

इति श्रीदासबोचे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यलक्षणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'चातुर्यलक्षणनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : निःस्पृहव्यापलक्षण

॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें मानवी शरीरें । उदंड दाटलीं लाहान थोरें ।
पालटती मनोविकारें । क्षणाक्षणा ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, या पृथ्वीवर असंख्य मानवशरीरे असून लहान-थोर माणसांची गर्दीच गर्दी झाली आहे. त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. (१)

जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती । सारिख्या नस्ती आदिअंतीं ॥
नेमचि नाहीं पाहावें किती । काये म्हणोनी ॥ २ ॥
जितके लोक तितक्या प्रकृती, स्वभाव आहेत. सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा दुसरा आढळत नाही. त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते, ते कसे सांगावे ? (२)

कित्येक म्लेंच होऊन गेले । कित्येक फिरंगणांत आटले ।
देशभाषानें रुधिले । कीतीयेक ॥ ३ ॥
या देशातील कित्येक लोक म्लेंच्छ होऊन गेले. कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले. भाषाभेदाने कित्येकांची अडवणूक झाली. (३)

मर्ह्हाष्टदेश थोडा उरला । राजकारनें लोक रुधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ॥ ४ ॥
महाराष्ट्र देशच यापासून थोडा फार वाचला आहे. येथे लोक राजकारणात अडकले आहेत. त्यांना इतकी कामे आहेत की जेवायलाही वेळ नाही. (४)

कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले ।
रात्रंदिवस करूं लागले । युद्धचर्चा ॥ ५ ॥
कित्येक युद्धप्रसंगात इतके गुंतले आहेत की, त्यामुळे उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाचीच चर्चा करू लागले आहेत. (५)

उदिम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा जाला ।
अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥ ६ ॥
व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला आहे की त्यांना मोकळा वेळच मिळत नाहीसा झाला आहे. निरंतर आपल्या पोटापाण्याचा धंदा करण्यात ते गढून गेले आहेत. (६)

शडदर्शनें नाना मतें । पाषांडें वाढली बहुतें ।
पृथिवीमधें जेथ तेथें । उपदेसिती ॥ ७ ॥
षड्दर्शने-सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा (वेदांत) आणि नाना मते तसेच नास्तिक मते खूपच वाढली आहेत. या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करीत आहेत. (७)

स्मार्थीं आणि वैष्णवी । उरलीं सुरलीं नेलीं आघवी ।
ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८ ॥
यांतून उरलेले लोक स्मार्त किंवा वैष्णव मताचे अनुसरण करीत आहेत. याप्रमाणे सर्वत्र गोंधळच माजून राहिला आहे. (८)

कित्येक कामनेचे भक्त । ठाइं ठाइं जालें आसक्त ।
युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९ ॥
कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत. ते निरनिराळ्या विषयांत आसक्त झालेले असल्याने योग्य किंवा अयोग्य हे पाहणार तरी कसे ? (९)

या गल्बल्यामधें गल्बला । कोणीं कोणीं वाढविला ।
त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥ १० ॥
या गोंधळातच कोणी कोणी अधिक गोंधळ वाढवीत आहेत. ते वैदिक लोकांना पाहावत नाही. (१०)

त्याहिमधें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन ।
प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥
त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो ? (११)

या कारणें ज्ञान दुल्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ ।
विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥
यामुळे ज्ञान दुर्लभ झाले आहे. जो पुण्यवान असेल, त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो. विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ होते. (१२)

विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये ।
उपाय योजितां अपाये । आडवे येती ॥ १३ ॥
विचार आपल्यापुरता कळतो, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. त्यातही अनेक विघ्ने येतच असतात. म्हणजे उपाय करायला जावे, तर अपायच घडतो. (१३)

त्याहिमधें तो तिक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥
त्यामध्येही जो हुशार असतो, तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. अशा हुशार, तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देतात. (१४)

नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला घडघडाट ।
अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥
ज्याचे उत्तम पाठांतर असते, तो धडाधड बोलू लागला की आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाट रुंद, विस्तीर्ण करतो. (१५)

प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें । जाणें सकळांची अंतरें ।
निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥
लोकांना ज्ञानोपदेश करण्याचे अनेक मार्ग त्याला अवगत असतात. तो सर्व लोकांची अंत:करणे जाणतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना चटक लागते. (१६)

मतें मतांतरें सगट । प्रत्यये बोलोन करी सपाट ।
दंडक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥
अनेक मते व मतांतरे, तो स्वानुभवावर आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो. रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वत:कडे आकर्षित करतो. (१७)

नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें ।
उदास वृत्तिच्या गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥
तो मोजकी पण भेदक वचने प्रसंगानुसार नेहमी बोलतो आणि अनासक्तपणे तेथून उठूनही जातो. (१८)

प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला ।
नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥
आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्याचे निरूपण ऐकण्याची चटक लागते. इतर नाना मार्ग सोडून ते त्यालाच शरण येतात. (१९)

परी तो कोठें आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना ।
वेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २० ॥
पण त्याचा शोध घेऊ लागले की तो कोठेच दिसत नाही. कुठल्याच स्थळी सापडत नाही. त्याचा वेष पाहिला तर तो अगदी हीनदीन माणसासारखा दिसतो. (२०)

उदंड करी गुप्तरूपें । भिकायासारिखा स्वरूपें ।
तेथें येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥
तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो. गुप्तरूपाने उदंड कार्य करीत असतो. पण वास्तविक त्याच्या यश, कीर्ती, प्रतापाने सीमा ओलांडलेली असते. (२१)

ठाइं ठाइं भजन लावी । आपण तेथून चुकावी ।
मछरमतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥
ठिकठिकाणी तो लोकांना भक्तिमार्गास लावतो आणि आपण तेथून निघून जातो. मतामतांच्या गोंधळात जो जराही गुंतत नाही. (२२)

खनाळामधें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे ।
सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥
तो जेथे त्याला कोणी पाहणार नाही, अशा कडेकपारीत जाऊन राहतो. पण तेथे राहन तो सर्वांची काळजी करीत असतो. (२३)

अवघड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।
सृष्टीमधें सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥
जेथे जंगली लोक असतात, अशा अवघड ठिकाणी तो नेमका जाऊन राहातो. पण जगातील लोक तेथेही त्याला शोधीत येतात. (२४)

तेथें कोणाचें चालेना । अनुमात्र अनुमानेना ।
कट्ट घालीन राजकारणा । लोक लावी ॥ २५ ॥
त्याच्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. लोक त्याच्याविषयी अणुमात्र अनुमान करू शकत नाहीत. लोकांच्यात एकोपा घडवून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतो. (२५)

लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले ।
भूमंडळीं सत्त चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥
अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करतो, त्यामुळे त्याचे सामर्थ्य अमर्याद वाढते. जगात गुप्तरूपाने त्याचीच सत्ता चालत असते. (२६)

ठाइं ठाइं उदंड ताबे । मनुष्यमात्र तितुकें झोंबे ।
चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी ॥ २७ ॥
ठिकठिकाणी अनुयायांचे समुदाय निर्माण होतात. मनुष्यमात्र त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थबुद्धीचा उदंड प्रचार होतो. (२७)

उपासनेचा गजर । स्थळोस्थळूं थोर थोर ।
प्रत्ययानें प्राणीमात्र । सोडविले ॥ २८ ॥
जागोजागी उपासनेचा मोठमोठ्याने गजर होऊ लागतो. स्वानुभवाने तो प्राणिमात्रांना मुक्त करतो. (२८)

ऐसे कैवाडे उदंड जाणे । तेणें लोक होती शाहाणे ।
जेथें जेथें प्रत्यये बाणे । प्राणीमात्रासी ॥ २९ ॥
अशा प्रकारच्या युक्त्या तो अनेक जाणतो व त्यायोगे लोकांना शहाणे करतो. जेथे तेथे तो आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देतो. (२९)

ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें ।
दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलें ॥ ३० ॥
संसारात आल्यासारखे याप्रकारे कीर्ती मिळवून जावे व जीवन सार्थक करावे. रामदास म्हणतात की, मी हे अगदी सहज उदाहरणासाठी बोललो आहे. (३०)

इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे
निस्पृहव्यापनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'निःस्पृहव्यापलक्षणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : श्रेष्ठ अंतरात्मानिरूपण

॥ श्रीराम ॥

मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकर्ण पसारा ।
त्यांत साक्षत्वाचा दोरा । तोहि तत्त्वरूप ॥ १ ॥
श्रीसमर्थ सांगतात की, या दृश्य सृष्टीमध्ये अगदी मूळमायेपासून जो हा अफाट पसारा दिसून येतो तो सर्व पंचमहाभूतांपासून झालेला म्हणजे पांचभौतिकच आहे. यात जो साक्षीत्वाचा, जाणिवेचा तंतू दोरा ओवलेला आहे, तो म्हणजे अंतरात्मा. हाही तत्त्वरूपच आहे. (१)

दुरस्त्या दाटल्या फौजा । उंच सिंहासनीं राजा ।
याचा विचार समजा । अंतर्यामी ॥ २ ॥
दोन्ही बाजूला सैन्य दाटून भरलेले असते आणि उंच सिंहासनावर राजा बसलेला असतो. या बोलण्याचा अभिप्राय अंतर्यामी विचाराने जाणून घ्यावा. (सैन्याप्रमाणे असलेल्या पंचभौतिक विश्वाच्या पसाऱ्यात साक्षी म्हणजे अंतरात्मा हा राजासारखा श्रेष्ठ होय. ) (२)

देहमात्र अस्तिमांशांचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें ।
मूळापासून सृष्टीचें । तत्वरूप ॥ ३ ॥
सर्व देह हे अस्थिमांसाचे असतात, तसेच राजाचेही समजावे. मूळमायेपासून सर्व सृष्टी तत्त्वरूप म्हणजे पांचभौतिकच होय. (राजा आणि प्रजा सर्वच पांचभौतिक आहेत. ) (३)

रायाचे सत्तेनें चालतें । परन्तु अवघीं पंचभूतें ।
मुळीं आधिक जाणिवेचे तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥
राजाच्या सत्तेने सर्व कारभार चालतो, पण सर्व काही पांचभौतिकच आहे. मूळमायेच्या ठिकाणी इतरांपेक्षा जाणिवेचे अधिक अधिष्ठान हे वैशिष्ट्य आहे. (४)

विवेके बहुत पैसावले । म्हणौन अवतारी बोलिले ।
मनु चक्रवती जाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥
विवेकाने जे व्यापक झाले, त्यांना अवतारी म्हणतात. या न्यायानेच मनू आदींना चक्रवर्ती म्हटले जाते. (५)

जेथें उदंड जाणीव । तेचि तितुके सदेव ।
थोडे जाणिवेने नर्देव । होती लोक ॥ ६ ॥
ज्यांच्या ठायी उदंड जाणीव असते, ते भाग्यवान होत. अल्प जाणीव असेल तर लोक निर्दैव, करंटे होतात. (६)

व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती ।
तेणें प्राणी सदेव होती । देखतदेखतां ॥ ७ ॥
जे लोक खूप प्रयत्न करून व्याप वाढवितात. निरनिराळे धक्के सोसतात, तेच लोक पाहता पाहता भाग्यवान होतात. (७)

ऐसें हें आतां वर्ततें । मुर्ख लोकांस कळेना तें ।
विवेकीं मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥
आजकालसुद्धा असेच घडत असते, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी माणूस असतो, त्याला सर्व काही कळते. (८)

थोर लाहान बुद्धीपासी । सगट कळेना लोकांसी ।
आधीं उपजलें तयासी । थोर म्हणती ॥ ९ ॥
थोरपण, लहानपण हे बुद्धीवर अवलंबून असते, हे सर्व लोकांना कळते. आधी जो जन्माला आला असेल, म्हणजे ज्याचे वय जास्त आहे, त्याला लोक थोर म्हणतात. (९)

वयें धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती ।
विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ॥ १० ॥
राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्याला नमस्कार करतात. विवेकाची तर्‍हा अशी विचित्र आहे, ती समजली पाहिजे. (१०)

सामान्य लोकांचे ज्ञान । तो अवघाच अनुमान ।
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥ ११ ॥
सामान्य लोकांचे ज्ञान केवळ अनुमानाचे असते. दीक्षेचा लौकिक रूढ विधी, त्याचे लक्षण असेच निरर्थक होय. (११)

नव्हें कोणास म्हणावें । सामान्यास काये ठावें ।
कोणकोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥ १२ ॥
पण हे खरे नाही असे कोणाकोणाला सांगावे ? सामान्य लोकांना यातील काही कळत नाही. शिवाय हे किती जणांना सांगणार ? कारण लोक तर बहुसंख्य आहेत. (१२)

धाकुटा भाग्यास चढला । तरी तुछ्य करिती तयाला ।
याकारणें सलगीच्या लोकांला । दूरी धरावें ॥ १३ ॥
एखादा लहान वयाचा माणूस भाग्यास चढला तरी लोक त्याला तुच्छ समजतात. म्हणून लोकांशी जास्त सलगी करू नये. त्यांना थोडे दूरच ठेवावे. (१३)

नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४ ॥
मोजके कसे बोलावे, नेमस्तपणे राजकारण कसे करावे, हे कळत नसतानाही काही लोक स्वतःला मूर्खपणाने थोर समजतात. (१४)

नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानिना ।
आधी उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥
ज्याला निश्चितपणे काहीच कळत नाही आणि ज्याला कोणीही थोर मानत नाही, तो केवळ आधी जन्मला म्हणजेच वयाने थोर असला तरी त्याला कोण विचारतो ? (१५)

वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्यां धाकुटपण नाहीं ।
ऐसे बोलती त्यांस नाहीं । शाहाणपण ॥ १६ ॥
जे लोक असे म्हणतात की, 'वडील माणसांना कुणी वडील म्हणून मान देत नाहीत किंवा लहानांनी आपले लहानपण सोडले,' त्यांना शहाणपण नाही, असे समजावे. (१६)

गुणेविण वडिलपण । हें तों आवघेंच अप्रमाण ।
त्याची प्रतीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥
गुणांशिवाय मोठेपणा मानणे हे सर्वच अयोग्य, अप्रमाण होय. थोरपणा हा प्रचीतीवर प्रमाण मानावा. (१७)

तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें ।
नेणतां पुढें कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥
तथापि वयाने वडील असणारांनाही मान द्यावा. पण वडील माणसांनीही आपले वडीलपण खरे नव्हे हे जाणून घ्यावे, नाहीतर पुढे म्हातारपणी त्रास होईल. (१८)

तस्मात वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा ।
हें तों प्रगटचि आहे आम्हा । शब्द नाहीं ॥ १९ ॥
म्हणून सर्वांत वडील म्हणजे श्रेष्ठ जो अंतरात्मा तो जेथे प्रकाशित, जागृत झालेला असतो, त्या माणसाला मोठेपणा प्राप्त होतो हे तर उघडच आहे. असे म्हटल्याने आमच्याकडे दोष येत नाही. (१९)

याकारणें कोणी येकें । शाहाणपण सिकावें विवेकें ।
विवेक न सिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥
म्हणून कुणाही माणसाने विवेकाने शहाणपण शिकून घ्यावे. विवेकाने शहाणपण शिकले नाही, तर महत्त्व राहात नाही. (२०)

तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मा येऊन काये केलें ।
बळेंचि सांदीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥
पत जर राहिली नाही, तर मग जन्माला येऊन काय केले ? बळेच स्वतःला तुच्छ करून घेतले असे होईल. (२१)

सगट बायेका सिव्या देती । सांदीस पडिला ऐसें म्हणती ।
मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥
असे झाले तर सरसकट स्त्रियासुद्धा शिव्या देतात. अडगळीत पडला, व्यर्थ स्वत:ला तुच्छ करून घेतले, असे म्हणू लागतात. अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो. (२२)

ऐसें कोणीयेकें न करावें । सर्व सार्थकचि करावें ।
कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥
म्हणून कुणी असे करू नये. सर्व प्रकारे जन्माचे सार्थक करून घ्यावे. आपणास कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून जाणून घ्यावे. (२३)

शाहाण्यास कोणीतरी बाहाती । मुर्खास लोक दवडून देती ।
जीवास आवडे संपत्ति । तरी शाहाणें व्हावें ॥ २४ ॥
शहाण्या माणसाला सर्व बोलावतात, मान देतात, मूर्खास दूर सारतात. प्रत्येक जीवाला मोठेपणा आवडत असतो, म्हणून प्रत्येकाने शहाणे व्हावे. (२४)

आहो या शाहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें ।
परंतु शाहाणपण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५ ॥
हे शहाणपण प्राप्त व्हावे, म्हणून अनेक प्रकारे कष्ट करावे लागले तरी करावेत, पण काहीही करून शहाणपण शिकून घ्यावे हेच उत्तमोत्तम होय. (२५)

जों बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला ।
जनीं शाहाण्या मनुष्याला । काये उणें ॥ २६ ॥
जो अनेकांना मान्य होतो, तोच शहाणा झाला असे जाणावे. जो शहाणा असतो, त्या माणसाला या जगात काय उणे पडणार आहे ? (२६)

आपलें हित न करी लोकिकीं । तो जाणावा आत्मघातकी ।
या मुर्खायेवढा पातकी । आणिक नाहीं ॥ २७ ॥
लौकिकात जो आपले हित करीत नाही तो आत्मघातकी जाणावा. या मूर्खाएवढा पातकी दुसरा कोणीही नाही. (२७)

आपण संसारीं कष्टतो । लोकांकरवी रागेजोन घेतो ।
जनामध्यें शाहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥
आपण संसारात कष्ट करतो, पण (मूर्खपणामुळे) लोकांकडून रागवून घेतो. असे शहाणा माणूस करीत नाही. (२८)

साधकां सिकविलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें ।
मानेना तरी सांडावें । येकिकडे ॥ २९ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मी साधकांना स्वाभाविकपणे हे शिकविले आहे. त्यांना पटले तर त्यांनी सुखाने घ्यावे. जर पटले नाही तर सोडून द्यावे. (२९)

तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्षास लावितां लक्ष ।
हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसा ॥ ३० ॥
आपण सर्व श्रोते परम दक्ष आहात. आपण अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावीत असता, ध्यान करीत असता. मग मी जे सांगितले, ते तर अत्यंत सामान्य आहे. ही गोष्ट तर आपण प्रत्यक्ष जाणताच. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रेष्ठ अंतरात्मानिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'श्रेष्ठ अंतरात्मानिरूपणनाम' समास तिसरा समाप्त.

GO TOP

समास चौथा : शाश्वतब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

पृथ्वीपासून जालीं झाडें । झाडापासून होती लांकडें ।
लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होये ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, पृथ्वीपासून झाडे उत्पन्न होतात. पुढे ती झाडे वाळून लाकूड बनतात. ती लाकडे पुढे जळून भस्म होतात. म्हणजे परत (मातीच) पृथ्वीच होते. (१)

पृथ्वीपासून वेल होती । नाना जिनस फापावती ।
वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होये ॥ २ ॥
पृथ्वीपासून वेली बनतात. नानाप्रकारे फळाफुलांनी विस्तार पावतात. त्या वेली पुढे वाळून अथवा कुजून त्यांची मातीच होते. (२)

नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें करिती भोजनें ।
नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होये ॥ ३ ॥
नाना प्रकारच्या धान्यांपासून अन्नाचे नाना प्रकार तयार करून माणसे त्यांचे भोजन करतात. त्या अन्नाची विष्ठा अथवा ओक बनते म्हणजे मातीच होते. (३)

नाना पक्षादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंचि जालें ।
वाळोन भस्म होऊन गेलें । पुन्हा पृथ्वी ॥ ४ ॥
अथवा ती धान्ये, फळे, पाने, फुले वगैरे पशुपक्ष्यादी भक्षण करतात. त्यांचेही पुढे तसेच विष्ठादी होते किंवा वाळून अथवा जळून भस्म वगैरे होते. म्हणजे परत माती (पृथ्वी) च होते. (४)

मनुष्यें मरतांच ऐका । क्रिमि भस्म कां मृत्तिका ।
ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥
माणसे मेली की त्यांच्या प्रेतास कृमी भक्षण करतात. जाळल्याने भस्म होते अथवा पुरले तर मातीच होते. अशा प्रकारे अनेक शरीरांची शेवटी मातीच होते. म्हणजे पृथ्वीच होते. (५)

नाना तृण पदार्थ कुजती । पुढें त्याची होये माती ।
नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥
नाना तृणे, पदार्थ कुजून त्यांची माती होते. तसेच अनेक प्रकारचे किडे वगैरे मरतात, त्यांचीही माती होते. (६)

पदर्थ दाटले अपार । किति सांगावा विस्तार ।
पृथ्वीवांचून थार । कोणास आहे ॥ ७ ॥
जगात इतके असंख्य पदार्थ आहेत की, त्यांचा विस्तार किती म्हणून वर्णन करावा. पण सर्वांना शेवटी पृथ्वीशिवाय दुसरा थारा नाही. (७)

झाड पाले आणि तृण । पशु भक्षितां होतें सेण ।
खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥
झाडे, पालापाचोळा, गवत वगैरे पशू भक्षण करतात. त्याचे शेण होते. त्याचे खत होते ते, त्यांचे मूत्र, भस्म आदी काहीही झाले, तरी ती मातीच (पृथ्वीतत्त्वच) असते. (८)

उत्पत्तिस्थितिसंव्हारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें ।
जितुकें होतें आणि जातें । पुन्हा पृथ्वी ॥ ९ ॥
ज्याचा ज्याचा उत्पत्ती, स्थिती, व संहार होतो ते ते सर्व शेवटी पृथ्वीतच मिसळून जाते. जितके उपजते आणि नाश पावते, त्याची पुन्हा मातीच होते. (९)

नाना बीजांचिया रासी । विरढोने लागती गगनासी ।
पुढें सेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥ १० ॥
अनेक बीजांच्या राशी उगवून, वाढून गगनापर्यंत जातात, पण शेवटी त्या पृथ्वीतच मिसळून जातात. (१०)

लोक नाना धातु पुरिती । बहुतां दिवसां होये माती ।
सुवर्णपाषाणाची गती । तैसीच आहे ॥ ११ ॥
लोक नाना धातू (सोने, चांदी इत्यादी) पुरून ठेवतात, पण दीर्घ काळानंतर त्यांची मातीच होते. सुवर्ण असो वा पाषाण, सर्वांची तीच गती आहे. (११)

मातीचें होते सुवर्ण । आणी मृत्तिकेचे होती पाषाण ।
माहा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होये ॥ १२ ॥
मातीचेच सुवर्ण होते, मातीचेच पाषाण होतात, मोठ्या प्रलयाग्नीने त्याचे भस्म होते. म्हणजे परत ते पृथ्वीतत्त्वच होते. (१२)

सुवर्णाचें जर होतें । जर सेवटीं कुजोन जातें ।
रस होऊन वितुळतें । पुन्हा पृथ्वी ॥ १३ ॥
सुवर्णापासून जर तयार होते, ती पण शेवटी कुजून जाते आणि अग्नीने वितळून रस बनून परत पृथ्वी तत्त्वातच रूपांतर होते. (१३)

पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें रस होती ।
तया रसाची होये जगती । कठीणरूपें ॥ १४ ॥
पृथ्वीपासूनच सर्व धातू निपजतात. अग्नीच्या संपर्काने त्या रसरूप होतात. ते रस कठीण बनले की परत त्यांची पृथ्वीच होते. (१४)

नाना जळासी गंधी सुटे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे ।
देवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥
जलाला जो नाना प्रकारचा गंध येतो तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप प्रगट होत असते. जसे दिवस जातील तसे जल हळूहळू आटते आणि पुढे पृथ्वीच उरते. (१५)

पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती ।
ते जीव मरतां जगती । नेमस्त होये ॥ १६ ॥
पृथ्वीवर अनेक पत्रे, पुष्पे, फळे येतात, त्यांना अनेक जीव खाऊन टाकतात. ते सर्व जीव मरतात, तेव्हा निश्चितपणे त्यांची मातीच होते. (१६)

जितुका कांहीं जाला आकार । तितुक्यास पृथ्वीचा आधार ।
होती जाती प्राणीमात्र । सेवट पृथ्वी ॥ १७ ॥
जितका म्हणून आकार बनतो, त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. प्राणिमात्र होतात आणि जातात. शेवटी पृथ्वी तेवढी उरते. (१७)

हें किती म्हणौन सांगावें । विवेकें अवघेचि जाणावें ।
खांजणीभाजणीचें समजावें । मूळ तैसे ॥ १८ ॥
याप्रमाणे किती वर्णन करावे ? मनुष्याने विवेकाने सर्व समजून घ्यावे. उभारणी आणि संहारणीचे मूळ याप्रमाणे जाणून घ्यावे. (१८)

आप आळोन पृथ्वी जालू । पुन्हां आपींच विराली ।
अग्नियोगें भस्म जाली । म्हणोनियां ॥ १९ ॥
आप (जल) आटून पृथ्वी झाली. ती परत जलातच विरली. अग्नीच्या योगाने भस्म झाल्यामुळेच हे घडले. (१९)

आप जालें तेजापासुनी । पुढें तेजें घेतलें सोखुनी ।
तें तेज जालें वायोचेनी । पुढें वायो झडपी ॥ २० ॥
आप हे तेजापासून झाले. ते पुढे तेजानेच शोषून घेतले. ते तेज वायूपासून होते आणि पुढे वायूच त्याला विझवतो. (२०)

वायो गगनीं निर्माण जाला । पुढें गगनींच विराला ।
ऐसें खांजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥
वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे गगनातच लय पावला. याप्रमाणे उभारणी आणि संहारणीला जाणून घ्यावे. (२१)

जें जें जेथें निर्माण होतें । तें तें तेथें लया जातें ।
येणें रितीं पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥
जे जे तत्त्व जेथे निर्माण होते, ते ते तेथेच लय पावते. याप्रमाणे पंचमहाभूते नाश पावतात. (२२)

भूत म्हणिजे निर्माण जालें । पुन्हां मागुतें निमालें ।
पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥
भूत म्हणजे जे निर्माण झाले आणि पुन्हा मागाहून लय पावले. पुढे फक्त शाश्वत परब्रह्म तेवढे उरले. (२३)

तें परब्रह्म जों कळेना । तो जन्ममृत्यु चुकेना ।
चत्वार खाणी जीव ना । होणें घडे ॥ २४ ॥
त्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. चार खाणीत नाना जीवयोनीत जन्म घ्यावा लागतो. (२४)

जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ ।
निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥
जडाचे मूळ चंचळ माया आहे आणि चंचळ मायेचे मूळ ते निश्चळ परब्रह्म आहे. त्या निश्चळाला दुसरे मूळ नाही, हे विचार करून जाणून घ्यावे. (२५)

पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें ।
पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥
जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष, आणि ते मिथ्या आहे हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षांहून जे अलिप्त, जेथे काहीच झाले नाही ते परब्रह्म सर्वत्र ओतप्रोत संचलेले आहे. (२६)

हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें ।
विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ॥ २७ ॥
अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खूण बाणून घ्यावी. विचार न करता शिणत राहावे, हा मूर्खपणा होय. (२७)

ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला ।
उगाच करितो गल्बला । मायेंमधें ॥ २८ ॥
ज्ञानी असून जो मायेच्या भिडेने दडपला जातो, त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती कशी होणार ? तो उगीच मायेमध्ये गलबला करीत राहतो. (२८)

माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली ।
विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥
माया नि:शेष नाहिशी झाली की पुढे काय स्थिती झाली त्याचा विचारवंताने स्वतः विचार केला पाहिजे. (२९)

निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन ।
वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥
मायेचे निरसन पूर्णपणे ज्या वेळी होते, तेव्हाच खरे आत्मनिवेदन होते. त्या वेळी शब्दच उरत नाही; त्या विज्ञानाचे दुजेपणाने ज्ञान कसे व्हावे ? (३०)

लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानेंच बुडाला ।
याकारणें प्रत्ययाला । पाहिलेंच पाहावें ॥ ३१ ॥
जो लोकांच्या बोलण्याने विचलित होतो, तो अनुमानामुळे कल्पनेमुळे ज्ञानापासून वंचित होतो. म्हणून पुन्हापुन्हा अनुभवाचा, प्रत्ययाचा पाठपुरावा करीतच राहिले पाहिजे. (३१)

इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे
शाश्वतब्रह्मनिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'शाश्वतब्रह्मनिरूपणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : चंचळ लक्षण

॥ श्रीराम ॥

दोघां ऐसीं तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती ।
अधोर्ध सांडून वर्तती । इंद्रफणी ऐसीं ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्त्व, रज, तम हे त्रिगुण-त्रिदेव या अगुण (गुणातीत) अशा परब्रह्मात वागत असतात. ज्याप्रमाणे इंद्र (मांजर) आणि फणी (सर्प) एकमेकांवर टपून असतात, त्याप्रमाणेच ही सूक्ष्म चंचळ अष्टधा प्रकृती अधजड पांचभौतिकाला आणि ऊर्ध्वनिश्चळ स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते. तात्पर्य, चंचळ अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चळत्वही पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो. (१)

पणतोंडें भक्षितो पणजा । मूल बापास मारी वोजा ।
चुकाया गेला राजा । चौघां जणांचा ॥ २ ॥
वायू हा पणजा, अग्नी हा आजा, आप बाप आणि पृथ्वी मूल. पणजा पणतवंडांना खाऊन टाकतो. (यात चार महाभूते एकात एक लय पावतात ही लीला वर्णन केली आहे. ) तर मूल बापाला सहज मारते. (यात त्रिगुणांची लीला वर्णन केली आहे. ) चौघांचा राजा चुकार्‍या गेला असे म्हटले आहे. येथे राजा म्हणजे आकाश म्हणजेच अंतरात्मा होय. हा या लीलेत जणू नाहीसाच झालेला, दुर्लक्षित झालेला दिसतो. (२)

देव देवाळयामधें लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला ।
सृष्टिमधें ज्याला त्याला । ऐसेंचि आहे ॥ ३ ॥
देव म्हणजे अंतरात्मा हा देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो. देवळाची पूजा केली की ती देवाला पावते. सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते. (३)

दोनी नामें येकास पडिलीं । लोकीं नेमस्त कल्पिलीं ।
विवेकें प्रत्ययें पाहिलीं । तों येकचि नाम ॥ ४ ॥
प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावे वस्तुत: एका मायेचीच आहेत. लोक दोहोंची कल्पना करतात. पण विवेकाने प्रत्यय घेऊन पाहिल्यावर दोन्ही एकाचीच नावे आहेत हे कळते. (४)

नाहीं पुरुष ना वनिता । लोकीं कल्पिलें तत्त्वता ।
त्याचा बरा शोध घेतां । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
नावाप्रमाणे तेथे कुणी पुरुष अथवा स्त्री नाही. लोकांनी तत्त्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे. सारासारविवेकाने याचा शोध घेतल्यावर कळून येते की खरे तर येथे काहीच नाही. (५)

स्त्री नदी पुरुष खळाळ । ऐसें बोलती सकळ ।
विचार पाहातां निवळ । देह नाहीं ॥ ६ ॥
स्त्रीलिंगी नदी आणि ओढा पुल्लिंगी असे सर्व लोक बोलतात. विचार करून पाहिले की कळते की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा देह नाही. (६)

आपण आपणास कळेना । पाहों जातां आकळेना ।
काशास कांहींच मिळेना । उदंडपणें ॥ ७ ॥
आपण कोण हे आपले आपल्यालाही कळत नाही. शोध घ्यावा म्हणावे तर तेही जमत नाही. अफाटपणामुळे उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ बसत नाही. (७)

येकलाचि उदंड जाला । उदंडचि येकला पडिला ।
आपणासी आपला । गल्बला सोसवेना ॥ ८ ॥
एकला एक होता तोच उदंड झाला आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असे झाले. (८)

येक असोन फुटी पडिली । फुटी असोन स्थिति येकली ।
विचित्र कळा पैसावली । प्राणीमात्रीं ॥ ९ ॥
एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखा दिसतो. पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असले तरी अंतरस्थिती अंतरात्मा एकच होय. अनेक रूपांत भासूनही एकत्व भंगू न देण्याची ही अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणिमात्रांत पसरली आहे. (९)

वल्लिमधें जल संचरे । कोरडेपणें हें वावरे ।
वोलेवांचून न थिरे । कांहीं केल्यां ॥ १० ॥
वेलीमध्ये पाणी भरून राहिलेले असते, पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवत नाही. ती बाहेरून कोरडीच असते. पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जगूच शकणार नाही. (१०)

झाडांमधें केलीं आळीं । झाडें धांवती निराळीं ।
कित्येक झाडें अंतराळीं । उडोन जाती ॥ ११ ॥
झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात. पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात. कित्येक झाडे आकाशात उंच वाढतात, तर काही झाडे म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात. (११)

भूमीपासून वेगळीं जालीं । परी तें नाहींत वाळलीं ।
निराळींच बळावलीं । जेथतेथें ॥ १२ ॥
जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाहीत. ती जेथे तेथे आकाशात जोमाने वाढतात. (१२)

देवाकरितां चालती झाडें । देव नस्तां होती लाकडें ।
नीटचि आहे कुवाडें । सर्वथा नव्हे ॥ १३ ॥
अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो, अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते. हे सर्व स्पष्टच आहे. त्यात गुप्त काहीच नाही. (१३)

झाडापासून झाडें होती । तेहि अंतरीक्ष जाती ।
मुळानें भेदिली जगती । कदापि नाहीं ॥ १४ ॥
झाडापासून झाडे होतात. तीही झाडे आकाशात जातात. देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाहीत. मुळाने पृथ्वी भेदली असे कधी होत नाही. (१४)

झाडास झाडें खातपाणी । घालून पाळिलीं प्रतिदिनीं ।
बोलकीं झाडें शब्दमथनीं । विचार घेती ॥ १५ ॥
झाडांना झाडेच खतपाणी घालून रोजच्या रोज पाळतात. जी बोलकी झाडे असतात, ती शब्दांचे मंथन करून त्यातील जे सार असते, त्याचे ग्रहण करतात. (१५)

होणार तितुकें आधींच जालें । मग कल्पकल्पून बोलिलें ।
जाणतयासी समजलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
जे काही होणार असते, ते आधीच होऊन जाते, पण त्याचे विवेचन आपापल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलेले आहे. जो ज्ञानी असतो, त्यालाच सर्व काही नीट समजते. (१६)

समजलें तरी उमजेना । उमजलें तरी समजेना ।
प्रत्ययेंविण अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥
एखाद्याला ते समजले तरी उमजत नाही, दुसऱ्या कुणाला ते उमजते पण समजत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. (१७)

सर्वत्रांचा वडिल कोण । हेचि पाहावी वोळखण ।
भेटे आपणास आपण । जगदांतरें ॥ १८ ॥
सर्वांहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा. त्याची म्हणजेच अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी म्हणजे आपली आपल्याला भेट होते म्हणजेच स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हेही कळून येते. (१८)

अंतरनिष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्र्याची संगती खोटी ।
मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ॥ १९ ॥
जे अंतर्निष्ठ असतात ते फार उच्च कोटीचे जाणावेत. जे बहिर्मुख असतात, त्यांची संगती खोटी म्हणजे वाईट असते. पण मूर्खाला या गोष्टी कळत नाहीत. शहाणे लोक असतात तेच सर्व जाणतात. (१९)

अंतरें राखतां राजी । भलत्यास भलताच नवाजी ।
अंतरें न राखतां भाजी । मिळणार नाहीं ॥ २० ॥
आपण जर दुसऱ्याचे अंत:करण जाणून त्यास प्रसन्न केले तर कुणीही आपल्याला नावाजतो. आपण जर दुसऱ्याचे मन जाणून त्यास समाधान होईल असे वागलो नाही, तर भाजीसारखा क्षुद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार नाही. (२०)

ऐसें वर्ततें प्रत्यक्ष । अलक्षीं लावावें लक्ष ।
दक्षास भेटतां दक्ष । समाधान होतें ॥ २१ ॥
हे असे प्रत्यक्ष घडते हे आपल्याला दिसून येते. म्हणून अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावे. त्याचे अनुसंधान ठेवावे. अशा प्रकारे जो आत्मानुभवाविषयी दक्ष असतो, त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की अत्यंत समाधान लाभते. (२१)

मनास मिळतां मन । पाहोन येती निरंजन ।
चंचळचक्र उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥
गुरुशिष्यांचा ऐक्यभाव झाला, मनास मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येते. आणि मायेचा-मीपणाचा सर्व उपद्‌व्याप ओलांडून पलीकडे जाता येते. (२२)

येकदा जाऊन पाहोन आले । मग तें सन्निध देखिलें ।
चर्मचक्षी लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥
एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असे दिसते, म्हणजे जेथे पहावे तेथे सर्वत्र तोच दिसतो. पण चर्मचक्षुने, डोळ्याने त्याचा अनुभव कधी घेणे शक्यच नसते. (२३)

नाना शरीरीं चंचळ । अखंड करी चळवळ ।
परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठाईं ॥ २४ ॥
नाना शरीरात तो चंचळ अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र घनदाट कोंदाटलेले असले तरी ते निश्चळच असते. (२४)

चंचळ धांवे येकीकडे । वोस पडे दुसरेकडे ।
चंचळ पुरे सर्वांकडे । हें तो घडेना ॥ २५ ॥
चंचळ असते ते एकीकडे धावले की दुसरीकडे ओस पडते. चंचळ सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असे कधी घडूच शकत नाही. (२५)

चंचळ चंचळास पुरेना । आवघें चंचळ विवरेना ।
निश्चळ अपार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥
चंचळ असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळमायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही, तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कशी करू शकेल ? (२६)

गगनीं चालिली हवावी । कैसी पावेल पार पदवी ।
जातां मधेंचि विझावी । हा स्वभावचि तिचा ॥ २७ ॥
दारूचा बाण पेटविल्यावर तो आकाशात उंच जातो, पण तो आकाशाला भेदून पलीकडे कसा जाऊ शकेल ? जाता जाता तो मध्येच विझतो कारण तो त्याचा स्वभावच आहे. (२७)

मनोधर्म येकदेशी । कैसा आकळिल वस्तुसी ।
निर्गुण सांडून अपेसी । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥
त्याप्रमाणेच मन हे एकदेशी असल्याने सर्वव्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसे जाणू शकेल ? जो भाग्यहीन असतो, तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्वच ब्रह्म असे म्हणतो. (२८)

नाहीं सारासार विचार । तेथें अवघा अंधकार ।
खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥
जेथे सारासारविचार नसतो, तेथे सर्व अंधकारच असतो. अज्ञानी माणूस सत्य असे सार सोडून खोटे असार ग्रहण करतो. एखाद्या लहान अज्ञानी मुलासारखेच त्याचे हे वागणे असते. (२९)

ब्रह्मांडाचें माहाकारण । तेथून हें पंचीकर्ण ।
माहावाक्याचें विवर्ण । वेगळें असे ॥ ३० ॥
ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तेथूनच पंचमहाभूते व पंचीकरण वगैरे उत्पन्न होते. पण महावाक्याचे विवरण हे यापासून अगदी वेगळे असते. (३०)

महत्तत्त्व महद्भूात । तोचि जाणावा भगवंत ।
उपासना हे समाप्त । येथून जाली ॥ ३१ ॥
महत् तत्त्व सर्वांत श्रेष्ठ तत्त्व आणि महत् भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूंतील श्रेष्ठ वस्तू होय. म्हणजेच जाणीवकळा किंवा जगज्योती अथवा अंतरात्मा होय. तोच षड्गुणैश्वर्ययुक्त भगवंत जाणावा. त्याचे निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना होय. मूळमायेतच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते. कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झाले की, त्या वस्तूखेरीज दुसरे म्हणून कोणी उरतच नाही, तर कोण कुणाची उपासना करणार ? (३१)

कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड वेद हें प्रमाण ।
ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मी ॥ ३२ ॥
कर्म, उपासना आणि ज्ञान हे वेदांचे तीन भाग प्रमाण मानले जातात. पण याप्रमाणे वेदाचे ज्ञान झाले तरी ज्या वेळी परब्रह्मवस्तूशी ज्ञाता एकरूप होतो, त्या वेळी तो पूर्णता प्राप्त करतो. यालाच विज्ञान म्हणतात. ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे हेच महत्त्वाचे आहे. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चंचळलक्षणनिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'चंचळलक्षणनिरूपणनाम' समास पाचवा समाप्त.

GO TOP

समास सहावा : चातुर्यविवरण

॥ श्रीराम ॥

पीतापासून कृष्ण जालें । भूमंडळीं विस्तारलें ।
तेणेंविण उअमजलें । हें तों घडेना ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, दिव्यापासून (किंवा पिवळ्या हिरड्यापासून) काजळ, काळी शाई झाली. ती सर्व भूखंडावर विस्तार पावली. तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले, असे तर होऊच शकत नाही. (१)

आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण ।
अद्धम आणी उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥
काजळ किंवा शाई तसे पाहिले तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे. पण तिच्यामुळेच सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान साठवले जाते. अधम गुण आणि उत्तम गुण दोन्ही तिच्यातच सामावलेले असतात. (२)

महीसुत सरसाविला । सरसाऊन द्विधा केला ।
उभयेता मिळोन चालिला । कार्येभाग ॥ ३ ॥
महीसुत म्हणजे बोरू पुढे सरसावतो. नंतर त्याला तासून छेद दिला जातो. याप्रमाणे शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने सर्व लिखाण, सर्व कार्यभाग चालतो. (३)

स्वेतास्वेतास गांठीं पडतां । मधें कृष्ण मिश्रित होतां ।
इहलिकसार्थकता । होत आहे ॥ ४ ॥
श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्ण शाई मिश्रित झाली. त्यामुळेच इहलोकात सार्थकता प्राप्त होते. (४)

विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होये चतुर ।
सद्यप्रचित साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥
त्यांचे विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तत्काळ अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कारही होऊ शकतो. (५)

सकळांस जे मान्य । तेंचि होतसे सामान्य ।
सामान्यास अनन्य । होईजेत नाहीं ॥ ६ ॥
सर्वांना जे मान्य असते, त्यालाच सामान्य लोकही मान्यता देतात. पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या मायिक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नाही. (६)

उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टीची गुप्त रेखा ।
चत्वार अनुभव रारिखा । होत नाहीं ॥ ७ ॥
नशिबाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अदृष्ट म्हणजेच सुप्त, हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणाराचा सर्वांचा अनुभव एक असत नाही. (७)

चौदा पिड्यांचे पवाडे । सांगती ते शाहाणे कीं वेडे ।
ऐकत्यानें घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥
उगीच मागील चौदा पिढ्यांचे पराक्रम जे वर्णन करीत असतात ते लोक शहाणे की वेडे ? ऐकणाऱ्याने सांप्रत तसेच घडत आहे की नाही हे पहावे. (८)

रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें ।
डोळेझांकणी करावी तें । कायेनिमित्य ॥ ९ ॥
नशिबाची रेखा प्रभुकृपेने बदलता येते, असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो आणि तरी माणसाने तिकडे डोळेझाक का म्हणून करावी ? (९)

बहुतांचे बोलीं लागलें । तें प्राणी अनुमानीं बुडालें ।
मुख्य निश्चये चुकलें । प्रत्ययाचा ॥ १० ॥
अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणूस संशयात बुडून जातो. आणि मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान त्यास मुकतो. (१०)

उदंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावे ।
खरेंखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥
अनेक लोक ज्या अनेक गोष्टी सांगतात, त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपणाला ज्याचा साक्षात अनुभव येईल, त्यावरूनच अंतर्यामी खयाखोट्याची निवड करावी. (११)

कोणासी नव्हे म्हणों नये । समजावे अपाये उपाये ।
प्रत्यये घ्यावा बहुत काये । बोलोनियां ॥ १२ ॥
कुणाचे मत खोडून काढू नये, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे आणि स्वतः प्रत्यय घ्यावा. यापेक्षा अधिक काय सांगावे ? (१२)

माणुस हेंकाड आणी कच्चें । मान्य करावें तयाचें ।
येणेंप्रकारें बहुतांचें । अंतर राखावें ॥ १३ ॥
माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याचे म्हणणे मान्य करावे. याप्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खूष राखावे. (१३)

अंतरीं पीळ पेच वळसा । तोचि वाढवी बहुवसा ।
तरी मग शाहाणा कैसा । निवऊं नेणें ॥ १४ ॥
अंतरात जर अभिमान, डावपेच असतील तर तेच नाना तर्‍हेने वाढत जाते. अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचे अंत:करण निववू शकत नाही. मग त्याला शहाणा कसे म्हणावे ? (१४)

वेडें करावें शाहाणें । तरीच जिणें श्लाघ्यवाणें ।
उगेंच वादांग वाढविणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥
जे वेडे असतील, त्यांना शिकवून शहाणे करावे. असे केल्यानेच जीवनाचे सार्थक होते. उगीच वादंग वाढविणे हा मूर्खपणा होय. (१५)

मिळोन जाऊन मेळवावें । पडी घेऊन उलथावें ।
कांहींच कळों नेदावें । विवेकबळें ॥ १६ ॥
लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा. वेळप्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटवावा, पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्यास लागू देऊ नये. (१६)

दुसयाचे चालणें चालावें । दुसयाचे बोलणीं बोलावें ।
दुसयाचे मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥
दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन जावे. (१७)

जो दुसयाच्या हितावरी । तो विपट कहिंच न करी ।
मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥
जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही. त्याचे म्हणणे मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग जाणून घेतो. (१८)

आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळुहळु उकलावें ।
नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥
आधी अंतरंग जाणून घ्यावे आणि मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि मग नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावावे. (१९)

हेंकाडास हेंकाड मिळाला । तेथें गल्बलाचि जाला ।
कळहो उठतां च्यातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥
हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस भेटला, तर तेथे भांडणतंटाच उपस्थित होतो. एकदा कलह उत्पन्न झाला की ,तेथे चातुर्याला वावच उरत नाही. (२०)

उगीच करिती बडबड । परी करून दाखविणें हें अवघड ।
परस्थळ साधणें जड । कठिण आहे ॥ २१ ॥
लोक उगीच बडबड करतात, पण दुसऱ्याचे मन राखणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. बोलायला सोपी पण करायला कठीण आहे. (२१)

धके चपेटे सोसावे । नीच शब्द साहात जावे ।
प्रस्तावोन परावे । आपले होती ॥ २२ ॥
त्यासाठी प्रथम धक्के-धपेटे सोसावे लागतात. नीच शब्द सहन करावे लागतात. तेव्हा मग लोकांना पश्चात्ताप होतो आणि नंतर ते आपलेसे होतात. (२२)

प्रसंग जाणोनि बोलावें । जाणपण कांहींच न घावें ।
लीनता धरून जावें । जेथतेथें ॥ २३ ॥
प्रसंग पाहून बोलावे. आपली हुशारी प्रकट करू नये. जेथे तेथे लीनता धरून वागावे. (२३)

कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें ।
भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षून सोडावीं ॥ २४ ॥
कुग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान-थोर सर्व माणसांची नीट पारख करावी. (२४)

बहुतीं कांहींतरी सांपडे । विचक्षण लोकीं मित्री घडे ।
उगेच बैसतां कांहींच न घडे । फिर्णें विवरणें ॥ २५ ॥
पुष्कळांच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण आढळतो. विचारवंत लोकांशी मैत्री होते. उगीच हात जोडून स्वस्थ बसले तर फिरणे वा विवरणे यांपैकी काहीच घडत नाही. (२५)

सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें ।
जाऊं ये तिकडे जावें । विवेकें सहित ॥ २६ ॥
सावधपणे सर्व जाणावे. जेथे जावयाचे असेल तेथील वर्तमान आधीच जाणून घ्यावे व मग जाण्याला योग्य असेल तिकडेच विचारपूर्वक जावे. (२६)

नाना जिनसपाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें ।
लेहोन देतां परोपकारें । सीमा सांडावी ॥ २७ ॥
नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंत:करणे निववावीत. परोपकाराने लोकांना ग्रंथ आदी लिहून देऊन त्यांच्यावर अमर्याद उपकार करावेत. (२७)

जैसें जयास पाहिजे । तैसें तयास दीजे ।
तरी मग श्रेष्ठचि होइजे । सकळां मान्ये ॥ २८ ॥
ज्याला जे पाहिजे असेल, ते त्याप्रमाणेच त्याला द्यावे. म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस श्रेष्ठ होतो. (२८)

भूमंडळीं सकळांस मान्य । तो म्हणों नये सामान्य ।
कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥
जो या जगात सर्वमान्य होतो, त्यास सामान्य समजू नये. त्या पुरुषाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. (२९)

ऐसीं चातुर्याचीं लक्षणें । चातुर्यें दिग्विजये करणें ।
मग तयास काये उणें । जेथतेथें ॥ ३० ॥
अशी ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो, त्याला मग तो कुठेही गेला, तरी काहीही उणे पडत नाही. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यविवरणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'चातुर्यविवरणनाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : अधोर्धनिरूपण

॥ श्रीराम ॥

नाना विकाराचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
अचंचळीं जे चंचळ । सूक्ष्मरूपें ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, अनेक विकारांचे मूळ मूळमायाच फक्त आहे. निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचळ पण अतिसूक्ष्मरूपाने असते. (१)

मूळामाया जाणीवेची । मुळींच्या मुळ संकल्पाची ।
वोळखी शडगुणैश्वराची । येणेंचि न्यावें ॥ २ ॥
जाणीव म्हणजे मूळमाया होय. ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला, तीच मूळमाया होय, तिलाच षड्गुणैश्वर्यसंपन्न असे म्हणतात. (२)

प्रकृतिपुरुष शिवशक्ति । आर्धनारीनटेश्वर म्हणती ।
परी ते आवघी जगज्जोती । मूळ त्यासी ॥ ३ ॥
प्रकृती-पुरुष, शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात. पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय. (३)

संकल्पाचें जें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
वायो आणी त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ ४ ॥
संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण स्वरूप होय. वायू , त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जाणावी. (४)

पाहातां कोणीयेक वेल । त्याच्या मुळ्या असती खोल ।
पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासी ॥ ५ ॥
एखादा वेल पाहिला, तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पाने, फुले, फळे लागतात. (५)

याहिवेगळे नाना रंग । आकार विकार तरंग ।
नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥
इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार, विकार, तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात, त्यांचे अंतरंग मुळामध्येच असते. (६)

तेंचि मूळ फोडून पाहातां । कांहींच नाहीं वाटे आतां ।
पुढें वाढतां वाढतां । दिसों लागे ॥ ७ ॥
पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तेथे काहीच दिसून येत नाही, त्यामुळे त्यात काही नाही असेच प्रथम वाटते. पण पुढे जसजशी वेलाची वाढ होते, तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते. (७)

कड्यावरी वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला ।
फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥
एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो. तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो. तो फोफावून पुढे खूप विस्तार पावतो व जमिनीपर्यंत येऊन पोहोचतो. (८)

तैसीं मुळमाया जाण । पंचभूतें आणी त्रिगुण ।
मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥
मूळमाया ही त्याप्रमाणेच जाणावी. तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्मरूपाने असतात. हे अनुभवानेच जाणून घ्यावे. (९)

अखंड वेल पुढें वाढला । नाना विकारीं शोभला ।
विकारांचा विकार जाला । असंभाव्य ॥ १० ॥
असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला. तो नाना विकारांनी शोभू लागला. त्या विकारांतून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. (१०)

नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडें वाढली ।
अनंत अग्रें चालिलीं । सृष्टीमधें ॥ ११ ॥
त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अग्रे पसरत चालली. (११)

कित्येक फळें तीं पडती । सवेंचि आणीक निघती ॥
ऐसीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥
कित्येक फळे गळून पडली. त्याचबरोबर आणखी नवीनही लागली. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. (१२)

येक वेलचि वाळले । पुन्हां तेथेंचि फुटले ।
ऐसे आले आणि गेले । कितीयेक ॥ १३ ॥
काही वेल वाळले. नंतर तेथेच दुसरे फुटले. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. (१३)

पानें झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रितीं ।
मध्यें जीव हे जगती । असंभाव्य ॥ १४ ॥
वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले, फळेही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात. मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते. (१४)

अवघा वेलचि कर्पतो । मुळापासून पुन्हा होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥
कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो, पण परत मुळापासून पुन्हा उगवतो. याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे. (१५)

मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययेज्ञानें निर्मूळ केलें ।
तरी मग वाढणेंचि राहिलें । सकळ कांहीं । १६ ॥
वासनामय मूळ खणून काढले. स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते. (१६)

मुळीं बीज सेवटीं बीज । मध्यें जळरूप बीज ।
ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ॥ १७ ॥
सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते, शेवटीही बीजच राहते. मध्ये जळरूपाने नाना पत्री, पुष्पे, फळे, या रूपानेही बीजच विस्तारलेले असते. याप्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविक (सहज) विस्तार असतो. (१७)

मुळामधील ज्या गोष्टी । सांगताहे बीजसृष्टी ।
जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥
मुळात काय आहे हेच बीजापासून झालेली पाने, फळे इत्यादी बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करीत असतात. काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो, तेथे तो व्यवस्थितपणे जातो. (१८)

जातो येतो पुन्हा जातो । ऐसा प्रत्यावृत्ति करितो ।
परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥
याप्रमाणे जीव जातो, येतो, पुन्हा जातो याप्रमाणे येरझारा करीतच असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो, तो मात्र जन्ममृत्यू असणारा असा होत नाही. (१९)

न घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहींतरी लागे जाणावें ।
अंतरींच परी ठावें । सकळांस कैचें ॥ २० ॥
आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असे जरी आपण म्हटले, तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधानादी करावेच लागते. हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते, पण सर्वांना ते कसे कळणार ? (२०)

तेणेंसींच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती ।
दिसेना ते काये करिती । बापुडे लोक ॥ २१ ॥
अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात, तरी ते त्याला जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार ? कारण तो तर दिसत नाही! (२१)

विषयेभोग तेणेंचि घडे । तेणेंविण कांहींच न घडे ।
स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥
प्राणी अंतरात्म्यामुळेच विषयभोग घेऊ शकतात. त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. म्हणून स्थूल देहास सोडून सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. (२२)

जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदांतर ।
शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥
जो आपल्या अंतरी आहे, तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे. शरीरभेदामुळे तो वेगळा दिसतो. (२३)

आंगोळीची आंगोळीस वेधना । येकीची येकीस कळेना ।
हात पाये अवेव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥
एका बोयचे दु:ख त्या बोटालाच फक्त जाणवते. दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. हातपाय इत्यादी अवयवांचेही तसेच आहे. (२४)

अवेवाचें अवेव नेणे । मा तो परांचें काये जाणे ।
परांतर याकारणें । जाणवेना ॥ २५ ॥
एका अवयवाचे दु:ख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार ? म्हणून लोकांचे अंत:करणही याप्रकारेच जाणता येत नाही. (२५)

येकाचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रेंभेद दिसती ।
खुडिलीं तितुकींच सुकती । येर ते टवटवीत ॥ २६ ॥
एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होते. अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो. त्यांचा जेवढा भाग खुडावा, तेवढाच फक्त सुकतो. न खुडलेला टवटवीत राहतो. (२६)

येणेंचि न्यायें भेद जाला । कळेना येकाचें येकाला ।
जाणपणें आत्मयाला । भेद नाहीं ॥ २७ ॥
या न्यायानेच वस्तू-वस्तूत भेद उत्पन्न झाला. एकाचे दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीवरूपाने आत्म्यामध्ये (अंतरात्म्यामध्ये) भेद नाही. (२७)

आत्मत्वीं भेद दिसे । देहप्रकृतिकरितां भासे ।
तरी जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥
आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो, तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देहस्वभावामुळे होय, हे बहुतेकांना माहीत असते. (२८)

देखोन ऐकोन जाणती । शाहाणे अंतर परीक्षिती ।
धूर्त ते अवघेंच समजती । गुप्तरूपें ॥ २९ ॥
बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात, पण शहाणे असतात, ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. धूर्त लोक सर्वच जाणतात, पण गुप्तरूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत. (२९)

जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी ।
धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥
जो अनेकांचे पालन करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होते. (३०)

आधी मनोगत पाहतीं । मग विश्वास धरिती ।
प्राणीमात्र येणें रितीं । वर्तताहे ॥ ३१ ॥
लोक दुसऱ्याचे मनोगत आधी जाणन घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व प्राणिमात्र या पद्धतीने वागत असतात. (३१)

स्मरणामगें विस्मरण । रोकडी प्रचित प्रमाण ।
आपलें ठेवणें आपण । दुकताहे ॥ ३२ ॥
स्मरणानंतर विस्मरण होतच असते याची रोकडी प्रचीती सर्वांना येत असते. त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. (३२)

आपलेंच आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना ।
उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥
आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपण काय बोललो तेही आठवत नाही. त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात. पण त्या कशा लक्षात राहणार ? (३३)

ऐसें हें चंचळ चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र ।
जाला रंक अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥
असे हे स्मरण-विस्मरणाचे चक्र सारखे सुरू असते. त्यात काही सरळ असते, काही वाकडे असते. रंक असो वा इंद्र असो, कुणालाही स्मरण-विस्मरण हे होतच असते. (३४)

स्मरण म्हणिजे देव । विस्मरण म्हणिजे दानव ।
स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥
स्मरण म्हणजे देव. तर दानव हे विस्मरणरूप आहेत. मानवात हे दोन्ही प्रकार असतात, म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो. (३५)

म्हणोनि चेवी आणि दानवी । संपत्ति द्विधा जाणावी ।
प्रचित मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥
म्हणूनच मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते. दैवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात याची प्रचीती पाहावी. (३६)

विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा वोळखावा ।
नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥
विवेकाने सारासारविवेक जाणावा. अंतरात्म्याने आत्मा ओळखावा. आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पहावा. (३७)

स्थूळें स्थूळ खाजवावें । सुक्ष्में सुक्ष्म समजावें ।
खुणेनें खुणेसी बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥
स्थूलाने स्थूल खाजवावे. सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे. खुणेनेच अंतर्यामी खूण बाणून घ्यावी. (३८)

विचारें जाणाव विचार । अंतरें जाणावे अंतर ।
अंतरें जाणावे परांतर । । हौनियां ॥ ३९ ॥
विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा. आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतरंग जाणावे. दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घ्यावे. (३९)

स्मरणामाजीं विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण ।
येकदेसी । परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥
अंतरात्मा सर्वत्र आहे या स्मरणाचे विस्मरण होऊन मी, तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एकदेशीसापेक्ष असल्याने तो परिपूर्ण म्हणजे खरा नव्हे. (४०)

पुढें सिके मागें विसरे । पुढें उजेडे मागें अंधारें ।
पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥
पुढचे शिकतो पण मागचे विसरतो. पुढे उजेड असतो पण मागे अंधार असतो. माणूस पुढचे स्मरतो आणि मागचे सर्व काही विसरतो अशी त्याची स्थिती असते. (४१)

तुर्या जाणावी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण ।
उभयेता शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥
तुर्यावस्था म्हणजे स्मरण असे जाणावे तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण होय. ह्या दोन्ही अवस्था माणसांच्या देहांत राहतात. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अधोर्धनिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'अधोर्धनिरूपणनाम' समास सातवा समाप्त.

GO TOP

समास आठवा : सूक्ष्मजीवनिरूपण

॥ श्रीराम ॥

रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपटचि थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥
या सृष्टीमध्ये रेणूहूनही सूक्ष्म असे कित्येक किडे आहेत. त्यांचे आयुष्य अगदीच थोडे असते आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अल्प बुद्धी असते. (१)

ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती ।
अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंचि आहे ॥ २ ॥
असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहू जाता ते डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु अंत:करणपंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणीही असते. (२)

त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान ।
सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥
त्यांच्यापुरतेच त्यांचे ज्ञान असते. त्यांची इंद्रिये आणि विषयभोग हेही समानच असतात. पण सूक्ष्म शरीराचे विवरण कोण करणार ? (३)

त्यास मुंगी माहा थोर । नेणोंचालिला कुंजर ।
मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥
ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगीही फार विशाल वाटते. जणू एखादा हत्तीच चालला आहे असे त्यांना वाटते. पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की 'मुंगीला मुताचा पूर' अशी म्हणच पडली आहे. (४)

तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें ।
समस्तांमध्यें जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥
त्या मुंगीप्रमाणे लहान-मोठी असंख्य शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने (अंतरात्म्याने) वस्ती केलेली आहे. (५)

ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥
असे किड्यांचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत. जो यत्नशील आणि विचारी माणूस असतो, तोच त्यांचेसंबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. (६)

नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढे ।
आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥
नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात. ते आकाराने पर्वताएवढे भासतात. त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणात फारच दीर्घ असते. (७)

पक्षायेवढें लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं ।
सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडे ॥ ८ ॥
अत्यंत लहान पक्षी असतात त्याप्रमाणे खूप मोठेही पक्षी असतात. सर्प आणि मासे यांचेही असेच आहे. (८)

मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें ।
त्यांची निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
मुंगीपासून एकाहून एक मोठी, चढती-वाढती शरीरे आहेत. नीट विचार केला की, त्यांचे अंतरंगही कळून येते. (९)

नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग ।
येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥
त्यामध्ये नाना वर्ण, नाना रंग असतात. जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवनपद्धती असतात. काहींचे रंग सुंदर असतात. काहींचे रंग घाणेरडे असतात. किती म्हणून सांगावे ? (१०)

येकें सुकुमारें येकें कठोरें। निर्माण केलीं जगदेश्वरें ।
सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥
एखाद्या प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असते, तर एखाद्याचे फार कठीण असते. तर कुणाचे सोन्यासारखे चकचकीत असते. जगदीश्वरानेच अशी ही वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. (११)

शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें ।
अंतरीं वसिजे अभेदें । येकरूपें ॥ १२ ॥
त्या प्राण्यांच्या शरीरांत अनेक भेद आहेत. त्यांच्या आहारांतही नाना भेद आहेत. वाचेमध्ये आणि गुणांमध्येही भरपूर भेद आहेत. पण त्या सर्वांच्या अंतरात अंतरात्मा सर्वत्र एकच आहे, (१२)

येक त्रासकें येकमारकें। पाहो जातां नाना कौतुकें ।
कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥
एखादा प्राणी त्रासणारा असतो, दुसरा एखादा मारणारा असतो. या सृष्टीमध्ये असे कित्येक अमोलिक चमत्कार पाहावयास मिळतात. (१३)

ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
आपल्यापरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥
या सर्वांचे विवरण करून पाहील, असा कोण प्राणी या जगात आहे ? प्रत्येक जण आपापल्यापुरते थोडेसे जाणून घेतो. (१४)

नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥
ही पृथ्वी नवखंड असून तिच्याभोवती सप्त सागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे, ते कोण पाहातो ? (१५)

त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती ।
त्या विशाळ जीवांची स्थिती । कोणजाणे ॥ १६ ॥
त्या पाण्यातही जीव असतात व ते असंख्य आणि विशाल असतात. त्या जीवांची स्थिती कोण जाणणार ? (१६)

जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव ।
पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे । ॥ १७ ॥
जेथे जल असते तेथे तेथे जीव असतात. हा उत्पत्तीचा स्वभावच आहे. याचा अभिप्राय पाहायला गेलो, तर तो उदंडच आहे. (१७)

पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जिनस लाहानथोरें । कोण जाणें ॥ १८ ॥
पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत. त्या पाण्यामध्येही अनेक शरीरे, अनेक लहान-मोठे पदार्थ इत्यादी आहेत. त्यांना कोण जाणू शकेल ? (१८)

येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावरी उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥
काही प्राणी अंतरिक्षात असतात. त्यांनी कधी पृथ्वीच पाहिलेली नसते. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावरच उडून जातात. (१९)

नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें ।
चौयासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥
आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहाणारे प्राणी असतात. काही प्राणी पाण्यातच विहार करणारे असतात. अशा या चौांऐंशी लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकेल ? (२०)

उष्ण तेज वेगळे करुनी । जेथें तेथें जीवयोनी ।
कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥
फक्त अग्नी सोडून जेथे तेथे जीवयोनी उत्पन्न होतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात. त्यांना कोण जाणू शकेल ? (२१)

येक नाना सामर्थ्यें केले । येक इच्छेपासून जाले ।
येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥
काही आपल्या योगसामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात, काही इच्छामात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह धारण करतात. (२२)

येक देह बाजीगिरीचे । येक देह वोडंबरीचे।
येक देह देवतांचे । नानाप्रकारें॥ २३॥
काही देह बाजीगरीचे तर काही देह वोडंबरीचे, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे असतात. (२३)

येक क्रोधापासून जाले । येक तपा पासून जन्मले ।
येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥
काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून होते, तर काहींची तपापासून होते, तर काही जणांना उ:शापामुळे आपापले पूर्वदेह प्राप्त होतात. (२४)

ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें ।
विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥
असे हे भगवंताचे करणे अलौकिक आहे. त्याचे किती वर्णन करणार ? मायेच्या योगाने असे हे सर्व विचित्र विचित्र होत जाते. (२५)

नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली ।
विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वें ॥ २६ ॥
मायेने ही अशी विलक्षण आणि अवघड जी करणी केली आहे, तशी कधी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेलीही नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणे आवश्यक आहे. (२६)

थोडें बहुत समजलें। पोटापुरती विद्या सिकलें ।
प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७॥
एखाद्याला थोडे फार कळले, पोटापुरती विद्या तो शिकला तरी त्याला 'मी ज्ञाता' असा गर्व होऊन तो वाया जातो. (२७)

ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा ।
त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८॥
सर्वांच्या अंतर्यामी असणारा सर्वात्मा, म्हणजे एक अंतरात्माच खरा ज्ञानी होय. पण त्याचा महिमा कळेल अशी बुद्धी कुणाला आहे ? (२८)

सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥
पंचमहाभूते, अहंकार आणि महत्तत्त्व या सात वेष्टणांचे ब्रह्मांड असते आणि त्यात सात आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडातही उदंड प्राणी असतात. (२९)

आपल्य देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचें कळे ।
लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥
माणसाला आपल्या देहात काय काय आहे हेही नीट कळत नाही, तर मग सर्व सृष्टीतील जीवांचे ज्ञान कसे असणार ? पण अज्ञानी लोक अल्पज्ञानाने उतावळे होतात. (३०)

अनुरेणाऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष ।
आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥
अणूरेणूएवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात, त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना दीर्घच वाटते. (३१)

त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक ।
जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥
त्यांच्या आचरणाचे नियम, त्यांच्या पद्धती, वगैरे निरनिराळ्या प्रकारचे असते. हे सर्व कौतुक जाणू शकेल असा कोण आहे ? (३२)

धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं ।
उगीच अहंता पापिणी । वेढा लावी ॥ ३३ ॥
खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य, अलौकिक अशीच आहे. कितीही कल्पना केली तरी अंत:करणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंतारूपी पापीण माणसाला उगीच गुंतवून ठेवते. (३३)

अहंता सांडून विवरणें । कित्येक देवांचे करणें ।
पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
देवाची जी कित्येक करणी आहे, तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतके थोडे अल्प आहे की विवरण करण्यास ते पुरणार नाही. (३४)

थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५॥
आयुष्य अत्यंत थोडे आणि क्षणभंगुर देह तरी गर्व करतात आणि रडतात. शरीर पडायला जराही वेळ लागत नाही. (३५)

कुश्चीळ ठाईं जन्मलें । आणि कुश्चीळ रसेंचि वाढलें।
यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥३६॥
घाणेरड्या जागी देह जन्मतो, तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि या देहाला थोर म्हणतात, ते कोणत्या हिशोबाने ? (३६)

कुश्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर ।
लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥
देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगुर असतो. त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात, मनातही तो सदैव चिंतातुर असतो आणि तरी लोक याला वेडेपणाने थोर म्हणतात. (३७)

कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी ची ची ।
झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८॥
देह आणि संपत्ती फक्त काही दिवसांपुरतीच असतात. जन्ममृत्युसमयी (आधी आणि अंती) सर्व फजितीच असते. उगीच वस्त्राने झाकपाक करून देहाचा मोठेपणा मिरवितात. (३८)

झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे ।
जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥
मरणकाळी झाकून ठेवला तरी देह उघडा पडतो आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो, तोच धन्य होय. (३९)

उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें ।
विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४०॥
उगीचच भांडणतंटा कशाला करावा ? अहंतेचे बंड मोडून काढावे आणि विवेकाने देवाचा शोध घ्यावा, हेच उत्तमोत्तम होय. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सूक्ष्मजीवनिरूपणनाम' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : पिंडोत्पत्ती

॥ श्रीराम ॥

चौंखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती ।
ऐसे होतीआणी जाती । असंख्यात ॥ १ ॥
चारी खाणींचे जे प्राणी असतात, ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात. असे असंख्य प्राणी होतात उपजतात आणि मरतात. (१)

तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें ।
त्यांचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥
सर्व प्राण्यांचे शरीर हे अंतरात्म्यासह तत्त्वांचे झालेले असते. त्याचे मूळ शोधले की, ते उदकरूप आहे हे कळून येते. (२)

शरत्काळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें ।
उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥
शरत्काली घामरूपाने जसे सर्वांगातून पाणी झिरपते, त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुषवीर्य आणि स्त्रीरेत ही रक्तात एकत्र मिसळतात. (३)

अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस ।
रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४ ॥
अन्नरस, देहरस, रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते. (४)

वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें।
पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५॥
ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते. नंतर उदकामुळेच नाना अवयव वगैरे विस्तार होतो. (५)

संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे ।
अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥
संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते. सर्व प्राण्यांच्या बाबतीत सर्व असेच घडत असते. (६)

कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मूळापासून अवघें घडे ।
अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥
कुडी म्हणजे शरीर वाढू लागते, तशी कुबुद्धी वाढू लागते. मुळापासूनच सर्व उत्पन्न होते. सर्वच मोडते आणि पाहता पाहता वाढते. (७)

पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर ।
सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥
पुढे सर्वांचेच शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही काही विचारही सुचू लागतात. (८)

फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें ।
ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥
फळामध्ये बीज येतेच. त्याच न्यायाने येथेही घडते. ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागते. (९)

बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती ।
येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥
बीजे असतात ती उदकामुळे अंकुरतात. उदक मिळाले नाही, तर नष्ट होतात. बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर बरे. (१०)

दोहिंमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज ।
वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥
माती आणि पाणी या दोन्हीच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो. वाढता वाढता पुढे उदंड वाढ होते. (११)

इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती ।
मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥
इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात, तर तिकडे अग्रे वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळे आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात. (१२)

मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धावतीं अंतराळीं ।
नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥
मुळ्या खाली पाताळाकडे जातात, तर अग्रे आकाशाकडे धावतात. आणि नाना पाने, फुले आणि फळे यांनी झाडे लगडून जातात. (१३)

फळावडिल सुमनें । सुमनांवडिल पानें ।
पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आघवीं ॥ १४ ॥
फळांच्या पूर्वी फुले येतात, फुलांच्या आधी पाने येतात. पानांच्यापेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात. (१४)

काष्ठांवडिल मुळ्या बारिक। मुळ्यां वडिल तें उदक ।
उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥
काष्ठापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात. मुळ्यांपेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी, पदार्थ उत्पन्न होतात. (१५)

याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळां वडिल जगती ।
जगतीवडिल मूर्ती। आपोनारायायेणाची ॥१६ ॥
या सर्व अनुभवावरून या जगात सर्वांत आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपोनारायण होय. (१६)

तयावडिल अग्निदेव । अग्निवडिल वायेदेव ।
वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥
त्याला वडील अग्निदेव आहे. त्या अग्निदेवाहन वायुदेव वडील आहे आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील (श्रेष्ठ) आहे. (१७)

सकळांवडिल अंतरात्मा। त्यासि नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥
म्हणून सर्वांना वडील, साहन श्रेष्ठ जो अंतरात्मा, त्याला जो जाणत नाही, तो दुरात्मा होय. दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला, अंतरला, तो होय. (१८)

जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें ।
उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥
जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखण्यास चुकले. त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही. उगाच जन्मले आणि मेले, तेही अंतरात्म्यामुळेच होय. (१९)

म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव ।
मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥
म्हणून सकळांहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झाले म्हणजे देहस्वभाव पालटू लागून बाहेरच्या विषयांचे आकर्षण कमी होऊ लागते आणि माणूस जास्तच अंतर्मुख होऊ लागतो. (२०)

करी आपुला व्यासंग। कदापि नव्हे ध्यानभंग ।
बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥
आपला जो व्यासंग, व्यवसाय असेल तो करावा, पण ध्यानाभ्यास कधी खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणे-चालणे यात काहीच फरक पडत नाही. (२१)

जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें ।
काये काये वडिलीं केलें । कीती पाहावें ॥ २२ ॥
जे वडिलांनी निर्माण केले असेल, ते पाहिलेच पाहिजे. वडिलांनी काय काय केले ते किती म्हणून पाहावे ? (२२)

तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाल ।
अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥
तो अंतरात्मा जेथे जागृत होतो, तो पुरुष भाग्यवान ठरतो. जो थोडासाच अंतरात्म्यास जाणतो, त्याला थोडासाच लाभ होतो. (२३)

तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासूनी । जाईल कोठें ॥ २४ ॥
त्या नारायणाला ध्यानीमनी अखंड आठवावे. मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कोठे ? (२४)

नारायेण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी ।
याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥
नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे. त्याची पूजा नेहमी करावी. त्यासाठीच कोणाचीही का होईना काया तोषवावी. देहाची सेवा करावी. ती नारायणाला पोहोचते. (२५)

उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपाळिती जाली ।
न कळे लीळा परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६ ॥
उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला, तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असे कळून आले. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कुणाला कळत नाही. (२६)

देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण ।
पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥
देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल ? पाहिल्यावर कळते की आपण तो देवच होय. (२७)

उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं ।
याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें॥ २८ ॥
या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्माराम कोठे नाही असे नाही. सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचीच सत्ता ठायीठायी चालताना दिसते. (२८)

ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।
नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥
माझी उपासना ही अशी आहे. तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोहोचतो. (२९)

देवाकरितां कर्में चालती । देवाकरितां उपासक होती ।
देवाकरितां ज्ञानी असती । कितियेक ॥ ३० ॥
अंतरात्म्यामुळेच सर्व कर्मे चालतात. अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात. अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात. (३०)

नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें ।
नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥
नाना शास्त्रे, नाना मते. देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे. कर्मानुसार जो तो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो. (३१)

देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।
अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥
वंद्य, निंद्य सर्व देवानेच केले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे. आपापल्या योग्यतेनुसार चालावे म्हणजे बरे. (३२)

आवाहन विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान ।
पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥
उभारणी आणि संहारणी म्हणजेच आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षातच म्हणजे मायेतच येते. आता पुढे सिद्धान्ताचे निरूपण येईल. (३३)

वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त ।
पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थ पाहावा ॥ ३४ ॥
वेदांत, सिद्धांत आणि धादांत यांत मुख्य प्रचीतीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे. पंचीकरणादी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्ष्यार्थ अनुभवावा. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पिंडोत्पत्तिनिरूपणणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'पिंडोत्पत्तीनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : सिद्धान्तनिरूपण

॥ श्रीराम ॥

गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें ।
निश्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आकाशात अनेक घटना होतात आणि जातात. त्या आकाशासारख्या टिकून राहात नाहीत. त्याचप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ येते आणि जाते. (१)

अंधार दाटला बळें। वाटे गगन जालें काळें ।
रविकिर्णें तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥
ज्या वेळी आकाशात बळेच अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळे झाले असे वाटते. सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते पिवळे झाले असे वाटते. (२)

उदंड हिंव जेव्हां पडिले । गमे गगन थंड जालें।
उष्ण झळेनें वाळलें। ऐसें वाटे ॥ ३ ॥
जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झाले आहे असे वाटते. व कडक उन्हामुळे ते जणू वाळून जाते ! (३)

ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें ।
आकाशासारिखें तगलें । हें तों घडेना ॥ ४ ॥
असे जे जे वाटते ते येते आणि जाते. पण ते काही आकाशासारखे टिकून राहत नाही. (४)

उत्तम जाणिवेचा जिनस । समजोन पाहे सावकास ।
निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥
उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजते की आकाश हे निराभास असून भास हे मिथ्या आहेत. (५)

उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे ।
तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥
उदक सर्वत्र पसरते, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा तर अत्यंतच पसरतो. तत्त्वे सर्वच व्यापक आहेत. हे अंतर्यामी विचार केला असता कळून येते. (६)

चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें ।
विवरणेंचि निवळतें । प्राणिमात्रासी ॥ ७ ॥
काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळेच कळते. प्राणिमात्राने विवरण करून पाहिले की, त्यास सर्व उलगडा होतो. (७)

विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी ।
जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥
विवरण करता करता शेवटी निवृत्तिपदाची प्राप्ती होते. निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातूट होत नाही. (८)

जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन ।
तत्वनिर्शनीं अनन्य। विवेकें होतें ॥ ९ ॥
अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहातच नाही. ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते आणि सारासारविवेकाने तत्त्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. (९)

वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ जालें ।
देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥
अंतरात्म्याला शोधून पाहिल्यावर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला आणि त्या ठिकाणी देव-भक्तपणाही एकवटला. देव आणि भक्त असे द्वैत उरलेच नाही. (१०)

ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळीं नाहीं ।
जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥
तेथे' वगैरे (स्थलवाचक) शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थमात्र काहीच नाही. जसे सुचले तसे कळण्यासाठी बोललो एवढेच. (११)

अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति मावळली ।
वृत्तिशून्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥
अज्ञानशक्तीचे निरसन झाले, ज्ञानशक्ती मावळली, म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्ति-शून्य स्थिती प्राप्त झाली. (१२)

मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा ।
निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥
सद्गुरुकृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय असे समर्थ म्हणतात. मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही. तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठायी स्थिर होतो. (१३)

चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे ।
चंचळ निश्चळ घनवटे । हें तों घडेना ॥ १४ ॥
चंचळाच्या विकाराची अग्रे, शाखा, मुख्य चंचळच तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाहीत. चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे तर कधी घडत नाही. (१४)

माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु।
दैवीकृपेची जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥
महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर मग तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. (१५)

संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी ।
आपली करणी आपणासी । निश्चयेंसीं ॥ १६ ॥
संन्यासी म्हणजे जो षड् म्हणजे सहा गोष्टींचा त्याग करतो. (कामक्रोधादी सहा विकारांचा जो त्याग करतो त्यास संन्यासी म्हणावे. ) ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत. कारण या विचारात विकारांचा त्यागच आवश्यक असतो. आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगी पडते. (१६)

जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी ।
आतां असो हें विचारी। विचर जाणती ॥ १७ ॥
जगदीश एकदा प्रसन्न झाल्यावर तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे ? असो. आता हे राहू दे. जे विचारवंत असतात, ते हे विचार जाणतात. (१७)

जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले ।
देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥
जे जे विवेकी लोक हे सर्व समजले ते ते नि:संग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले. देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानाचेच रक्षण करीत बसतात. (१८)

लक्षीं बैसले अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष ।
हेतुरूपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥
ज्याच्या मनात ब्रह्म ठसले त्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे माया उडूनच जाते आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. (१९)

आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ ।
काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥
आकाश आणि पाताळ दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. त्यांच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे, तो काढला की ते अखंड होते. (२०)

तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे।
उपाधिनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥
वास्तविक ते अखंडच आहे पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानते. उपाधि निरास झाल्यावर तेथे शब्दही सहन होत नाही. (२१)

शब्दपर कल्पनेपर । मन बुद्धि अगोचर ।
विचारें पाहावा विचार। अंतर्यामीं ॥ २२ ॥
शब्दातीत, कल्पनातीत, मनबुद्धीअगोचर जो परमात्मा याच्या सबंधी अंतर्यामी सारासारविवेकाने विचार करून पाहावा. (२२)

पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें ।
अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥
पाहाता पाहाता कळू लागले, पण कळले अशी जाणीवही राहता कामा नये. ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखेच व्यर्थ होते. हा विषयच असा अवघड आहे की, कशा प्रकारे बोलून तो समजावून द्यावा हेच कळत नाही. (२३)

वाक्यार्थवाच्यांश शोधिला। अलक्षीं लक्ष्यांश बुडाला ।
पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥
वाक्यार्थवाच्यांश यांचा शोध घेऊन त्यातील लक्ष्यांशाचे मनन, निदिध्यासन करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्ष्यांश लय पावतो. मग हे सर्व समजले तरी बोलताच येत नाही. (२४)

शाश्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला ।
विकार सांडून मिळाला । निर्विकारीं ॥ २५ ॥
शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होतो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावतो. (२५)

दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें ।
पुन्हां जरी आठवलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥
एखाद्याला दुःस्वप्न पडते, पण तो जागा झाला की, ते मिथ्या ठरते. समजा जरी त्याला ते परत आठवले, तरी ते मिथ्या होते, हे ज्ञान त्याचे कायम राहते. त्यामुळे तो दु:खी होत नाही. (२६)

प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे ।
विचार अंतरीं बैसे । चळेना ऐसा ॥ २७ ॥
प्रारब्धयोग असतो, त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट होतो. पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो, तो चळत नाही. (२७)

बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें ।
ज्ञात्यास तैसे जालें । वासनाबीज ॥ २८ ॥
बीज असते ते अग्नीने भाजले की, त्याचे वाढणे खंटते. त्याला परत अंकुर येऊ शकत नाही. ज्ञात्याच्या बाबतीतही तसेच घडते. त्याचे वासनाबीज ज्ञानाग्नीने भाजले गेल्याने त्यास परत अंकुर फुटत नाही. त्याच्या मनात परत वासना निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. (२८)

विचारें निश्चळ जाली बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि ।
पाहातां वडिलांची बुद्धि । निश्चळीं गेलीं ॥ २९ ॥
विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. त्या स्थिरबुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. पूर्वी झालेले साधू, संत यांची बुद्धीही निश्चळ परब्रह्मात समरसून गेली होती. (२९)

निश्चळास ध्यातो तो निश्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ ।
भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥
जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो. जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो. जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. (३०)

जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी ।
अंतरिनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥
जो परब्रह्मापर्यंत पोहोचतो, त्याला हे काहीच करीत नाही. जे अंतरनिष्ठ असतात, त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे मिथ्या भासते. (३१)

मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें ।
अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥
माया मिथ्या असे कळून येते आणि निरंतर विचाराने ते अंतरात सुदृढ होते. त्यायोगे अकस्मात सर्व प्रकारचे भयच नाहीसे होते. (३२)

उपासनेचें उत्तिर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें ।
अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
हे सर्व श्रीरामउपासनेमुळे कळले, म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीरामभक्ती ही वाढवावी. हे कार्य करीत असताही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चळू देऊ नये, असे श्रीसमर्थ सांगतात. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिद्धांतनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सिद्धान्तनिरूपणनाम' समास दहावा समाप्त.

॥ दशक पंधरावा समाप्त ॥



GO TOP