ब्रह्मसूत्र

अध्याय दुसरा

पाद तिसरा

संबंध - या शास्त्रात जी ब्रह्माची लक्षणे सांगितली गेली आहेत, त्यात स्मृति आणि न्यायाशी जो विरोध प्रतीत होतो, त्याचे निर्णयपूर्वक समाधान तर या अध्यायाच्या पहिल्या पादात केले गेले आहे. त्यानंतर दुसर्‍या पादात आपल्या सिद्धांताच्या सिद्धीसाठी अनीश्वरवादी नास्तिकांच्या सिद्धांताचे तसेच ईश्वराला मानून ही त्यास उपादान कारण न मानणार्‍यांच्या सिद्धांताचे युक्तिंच्या द्वारा निराकरण केले गेले. या बरोबरच भागवतमतात जो या ग्रंथातील सिध्दांताशी विरोध प्रतीत होत होता, त्याचे समाधान करून त्या पादाची समाप्ति केली गेली. आता पूर्व प्रतिज्ञेनुसार परब्रह्माला समस्त प्रपंचाचे अभिन्ननिमित्तोपादान कारण मानण्यात ज्या श्रुतिंच्या वाक्यांनी विरोध प्रतीत होत होता, त्याचे समाधान करण्यासाठी तसेच जीवात्म्याच्या स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी तिसर्‍या पादाचा आरंभ केला जात आहे. श्रुतिंमध्ये काही ठिकाणी तर म्हटले आहे की, परमेश्वराने सर्वप्रथम तेजाची रचना केली. त्यानंतर तेजापासून जल आणि जलापासून अन्न. या क्रमाने जगताची रचना झाली. कुठे म्हटले आहे की, सर्व प्रथम आकाशाची रचना झाली, त्याच्यापासून वायु आदिच्या क्रमाने जगताची उत्पत्ति झाली. या प्रकारच्या विकल्पांची एकता करून समाधान करण्यासाठी पूर्वपक्षाची उत्थापना करतात.


न वियदश्रुतेः ॥ २.३.१ ॥


अर्थ - वियत् = आकाश, न = उत्पन्न होत नाही; अश्रुते = कारण की (छान्दोग्योपनिषदाच्या सृष्टि-प्रकरणात) त्याची उत्पत्ति ऐकलेली नाही.


व्याख्या - छान्दोग्योपनिषदात जेथे जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले आहे, तेथे सर्व प्रथम तेजाची रचना सांगितली गेली आहे. ‘तत्तेजोऽसृजत ।’ (छां.उ.६/२/३) नंतर तेज, जल आणि अन्न - या तीन्हीच्या संमेलनाने जगताच्या रचनेचे वर्णन आहे. (छान्दो.उ.६/२/१ पासून ६/३/४पर्यंत) तेथे आकाशाच्या उत्पत्तिचा काहीही प्रसंग नाही आहे. तसेच आकाशाला विभु (व्यापक) मानले गेले आहे. (गीता१३/३२) म्हणून हे सिद्ध होत आहे की, आकाश नित्य आहे, ते उत्पन्न होत नाही.




संबंध - या शंकेच्या उत्तरात सांगतात.


अस्ति तु ॥ २.३.२ ॥


अर्थ - तु = परंतु, अस्ति = आकाशाच्या उत्पत्तिचे वर्णनही (दुसर्‍या श्रुतित) आहे.


व्याख्या - तैत्तिरीयोपनिषदात ‘ब्रह्म, सत्य, ज्ञानस्वरूप आणि अनंत आहे’ याप्रकारे ब्रह्माचे लक्षण सांगून नंतर त्या ब्रह्मापासून आकाशाची उत्पत्ति सांगितली गेली आहे. ‘तस्माद् वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः । आकाशाद्वायु । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्‌भ्यः पृथिवी इत्यादि । (तै.उ.२/१/१) म्हणून असे म्हणणे ठीक नाही की, वेदात आकाशाच्या उत्पत्तिचे वर्णन नाही आहे.




संबंध - उक्त विषय स्पष्ट करण्यासाठी पुन्हा पूर्वपक्षाला उठवले जात आहे.


गौण्यसम्भवात् ॥ २.३.३ ॥


अर्थ - असम्भवात् = आकाशाची उत्पत्ति असंभव असल्याने, गौणी = ही श्रुति गौण आहे.


व्याख्या - अवयवरहित आणि विभु असल्याने आकाशाचे उत्पन्न होणे शक्य नाही, म्हणून तैत्तिरीयोपनिषदात जी आकाशाची उत्पत्ति सांगितली गेली आहे, त्या कथनाला गौण समजले पाहिजे. तेथे कुठल्या दुसर्‍या अभिप्रायाने आकाशाची उत्पत्ति सांगितली गेली असावी.




संबंध - पूर्वपक्षाच्या द्वारे आपल्या पक्षाला दृढ करण्यासाठी दुसरा हेतु दिला जात आहे.


शब्दाच्च ॥ २.३.४ ॥


अर्थ - शब्दात् = शब्दप्रमाणाने, च = ही (हे सिद्ध होत आहे की आकाश उत्पन्न होऊ शकत नाही.)


व्याख्या - बृहदारण्यकात म्हटले आहे की, ‘वायुश्चान्तरिक्षं चैतदमृतम्’ ‘वायु आणि अन्तरिक्ष’ हे अमृत आहे. (बृह.उ.२/३/३) म्हणून जे अमृत असेल त्याची उत्पत्ति होऊ शकत नाही. तथा असे हे म्हटले आहे की ज्याप्रकारे हे आकाश अनंत आहे त्याचप्रकारे आत्म्यालाहि अनंत समजले पाहिजे. ‘आकाशशरीरं ब्रह्म’ ब्रह्माचे शरीर आकाश आहे. (तै.उ.१/६/२) या श्रुति वाक्यांनी आकाशाची अनंतता सिद्ध होते. म्हणून ही आकाशाची उत्पत्ति होऊ शकत नाही.




संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, उक्त श्रुतिमध्ये ज्याप्रकारे आकाशाची उत्पत्ति दाखविणारी वाक्ये आहेत, त्याचप्रकारे वायु, अग्नि आदिंची उत्पत्ति दाखविणारे शब्दही आहेत. मग असे कसे मानले जाऊ शकते की, आकाशासाठी सांगणे तर गौण आहे आणि दुसर्‍यासाठी मुख्य आहेत, यावर पूर्वपक्षाच्या बाजूने उत्तर दिले जात आहे.


स्याच्चैकस्य ब्रह्मशब्दवत् ॥ २.३.५ ॥


अर्थ - च = तथा, ब्रह्मशब्दवत् = ब्रह्मशब्दाप्रमाणे, एकस्य = कुठल्या एका शाखेच्या वर्णनात, स्यात् = गौणरूपाने ही आकाशाची उत्पत्ति दाखविली जाऊ शकते.


व्याख्या - दुसर्‍या ठिकाणी एकाच प्रकरणात प्रथम तर म्हटले आहे की, ‘तपसा चीयते ब्रह्म ततोऽन्नमभिजायते ।’ ‘ब्रह्म विज्ञानमय तपाने वृद्धिला प्राप्त होते, त्याच्यापासून अन्न उत्पन्न होते.’ (मु.उ.१/१/८) त्यानंतर म्हटले आहे की, ‘यः सर्वज्ञः सर्वविद् यस्य ज्ञानमयं तपः । तस्मादेतद् ब्रह्मनाम रूपमन्नं च जायते ॥’ (मु.उ.१/१/९) अर्थात ‘जो सर्वज्ञ आहे, सर्वांना जाणणारा आहे, ज्याचे ज्ञानमय तप आहे, त्याच्यापासून हे ब्रह्म आणि नाम, रूप एवं अन्न उत्पन्न होते.’ या प्रकरणात जसा प्रथम ब्रह्म शब्द मुख्य अर्थाने प्रयुक्त झाला आहे आणि नंतर त्याच ब्रह्म शब्दाचा गौण अर्थाने प्रयोग केला गेला आहे. त्याचप्रकारे कुठल्या एका शाखेत गौण अर्थाने आकाशाला उत्पत्तिशील दाखविले जाऊ शकते.




संबंध - याप्रकारे पूर्वपक्षाची उत्थापना करून आता दोन सूत्रांद्वारे त्याचे समाधान करतात.


प्रतिज्ञाऽहानिरव्यतिरेकाच्छब्देभ्यः ॥ २.३.६ ॥


अर्थ - अव्यतिरेकात् = ब्रह्माच्या कार्यापासून आकाशाला अलग न मानल्याने ही; प्रतिज्ञाहानिः = एकाच्या ज्ञानाने सर्वांच्या ज्ञानासंबंधी प्रतिज्ञेचे रक्षण होऊ शकते. शब्देभ्यः= श्रुतिच्या शब्दाने हेच सिद्ध होते.


व्याख्या - उपनिषदात जी एकाला जाणल्याने सर्वांचे ज्ञान होण्याची प्रतिज्ञा केली गेली आहे आणि त्या प्रसंगी जी कारण-कार्याची उदाहरणे दिली गेली आहेत, (छां.उ.३/१/१ ते ६ पर्यंत) त्या सर्वांची विरोधरहित सिद्धी आकाशाला ब्रह्माच्या कार्याहून अलग न मानल्यानेच होऊ शकते, अन्यथा नाही. कारण की, तेथे माती आणि सुवर्ण आदिचा दृष्टांत देऊन त्यांच्या कुठल्याहि एका कार्याच्या ज्ञानाने कारणाच्या ज्ञानाच्याद्वारे सर्वांचे ज्ञान होणे सांगितले गेले आहे. म्हणून जर आकाशाला ब्रह्माहून अलग मानले तर कारणरूप ब्रह्माला जाणल्यावरहि आकाशाला जाणले असे होणार नाही. यामुळे प्रतिज्ञेची हानी होईल. एवढेच नव्हे तर ‘हे सर्व ब्रह्मच आहे.’ (मु.उ.२/२/११) ‘हे सर्व या ब्रह्माचे स्वरूप आहे.’ (छां.उ.६/८/७) ‘हे सर्व निःसंदेह ब्रह्मच आहे; कारण उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय त्याच्यातच होतात.’ (छां.उ.३/१४/१) इत्यादि श्रुतिवाक्यांनी ही हेच सिद्ध होत आहे की आकाश त्या ब्रह्माचेच कार्य आहे.




संबंध - दुसरे समाधान -


याद्विकरन्तु विभागो लोकवत् ॥ २.३.७ ॥


अर्थ - तु = तथा, लोकवत् = साधारण लौकिक व्यवहाराप्रमाणे, यावद्-विकारम् = विकारमात्र सर्व काही; विभागः = ब्रह्माचाच विभाग (कार्य) आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे लोकात असे दिसून येते की, कोणी पुरुष देवदत्ताच्या पुत्रांचा परिचय देतेवेळी म्हणतो की, ‘हे सर्वच्या सर्व देवदत्ताचे पुत्र आहेत.’ नंतर तो त्यांच्यामधून कोणा एक दोघांचेच नाम घेऊन जरी म्हणाला की यांची उत्पत्ति देवदत्तापासून झाली आहे.’ तरीही त्या सर्वांची उत्पत्ति देवदत्तापासूनच मानली जाईल. त्याचप्रकारे जेव्हा समस्त विकारात्मक जगताला त्या ब्रह्माचे कार्य सांगितले गेले आहे तर आकाश त्यापासून अलग कसे राहू शकते ? म्हणून तेज आदिची सृष्टि दाखविताना त्यावेळी जरी आकाशाचे नाव राहून गेले तरीही हेच सिद्ध होते की, आकाशही अन्य तत्त्वाप्रमाणे ब्रह्माचे कार्य आहे आणि ते त्याच्यापासून उत्पन्न होते. वायु आणि आकाशाला अमृत म्हणण्याचे तात्पर्य देवताप्रमाणे त्यांनाही अन्य तत्त्वांच्या पेक्षा चिरस्थायी दाखविणे मात्र आहे.




संबंध - याप्रकारे आकाशाचे उत्पन्न होणे सिद्ध करून त्याच्या उदाहरणाने हा निश्चय केला जात आहे वायु ही उत्पन्न होतो.


एतेन मातरिश्वा व्याख्यातः ॥ २.३.८ ॥


अर्थ - एतेन = याने अर्थात आकाशाची उत्पत्ति सिद्ध करणार्‍या कथनाने ही; मातरिश्वा = वायुचे उत्पन्न होणे, व्याख्यातः = सांगितले गेले आहे.


व्याख्या - ज्या युक्तिनी आणि श्रुतिप्रमाणांच्या द्वारा पूर्वसूत्रांमध्ये ब्रह्मापासून आकाशाचे उत्पन्न होणे निश्चित केले गेले, त्यायोगे हे कथन ही झाले की वायु ही उत्पन्न होत असतो. म्हणून त्याच्याविषयी वेगळे सांगणे आवश्यक वाटले नाही.




संबंध - याप्रकारे आकाश आणि वायुला उत्पत्तिशील दाखवून आता या दृश्य जगतात ज्या तत्त्वांना दुसर्‍या मताचे लोक नित्य मानतात तसेच ज्यांच्या उत्पत्तिचे स्पष्ट वर्णन वेदात आलेले नाही त्या सर्वांना ही उत्पत्तिशील दाखविण्यासाठी पुढील सूत्र सांगतात.


असम्भवस्तु सतोऽनुपपत्तेः ॥ २.३.९ ॥


अर्थ - सतः = ‘सत’ शब्दवाच्य ब्रह्माशिवाय (अन्य कोणाचे उत्पन्न न होणे) तु = तर; असंभव आहे, अनुपपत्तेः = कारण की अन्य कुणाचे उत्पन्न न होणे युक्ति आणि प्रमाणद्वारा सिद्ध होऊ शकत नाही.


व्याख्या - ज्या पूर्णब्रह्म परमात्म्याचे श्रुतिमध्ये ठिकठिकाणी सत् नामाने वर्णन आले आहे तसेच जे या जड चेतनात्मक जगताचे परमकारण मानले गेले आहे, त्यास सोडून या जगतात कोणतेही तत्त्व असे नाही, जे उत्पत्तिशील नाही. बुद्धि, अहंकार, काल तथा गुण आणि परमाणु आदि सर्व उत्पत्तिशील आहेत. कारण की वेदामध्ये प्रलयाच्या वेळी एकमात्र परब्रह्म परमेश्वराहून भिन्न कोणाचे अस्तित्व स्वीकारले गेलेले नाही; म्हणून युक्ति अथवा प्रमाणद्वारा कुठलाहि पदार्थ उत्पन्न न होणारा सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्माशिवाय सर्व काही उत्पत्तिशील आहे.




संबंध - छान्दोग्योपनिषदात असे म्हटले आहे की, ‘त्या ब्रह्माने तेजाची रचना केली’ आणि तैत्तिरोपनिषदात सांगितले गेले आहे की, ‘सर्वात्मा परमेश्वरापासून आकाश उत्पन्न झाले, आकाशापासून वायु आणि वायुपासून तेज.’ म्हणून येथे तेजाला कशापासून उत्पन्न झाले म्हणून मानावे ? ब्रह्मापासून अथवा वायुपासून ? या जिज्ञासेवर सांगतात.


तेजोऽतस्तथा ह्याह ॥ २.३.१० ॥


अर्थ - तेजः = तेज, अतः = या (वायु) पासून (उत्पन्न झालेला), तथा हि = असाच; आह = अन्यत्र म्हटले आहे.


व्याख्या - तेज-तत्त्व वायुपासून उत्पन्न झाले असेच मानले पाहिजे. कारण की हीच गोष्ट श्रुतिमध्ये दुसर्‍या जागी सांगितली गेली आहे. भाव हा आहे की त्या ब्रह्माने वायुपासून तेजाची रचना केली अर्थात आकाश आणि वायुला पहिल्याने उत्पन्न करून त्यानंतर वायुपासून तेजाची उत्पत्ति केली असे मानल्यावर दोन्ही श्रुतिंची एकवाक्यता होऊन जाईल.




संबंध - याप्रकारे


आपः ॥ २.३.११ ॥


अर्थ - आपः = जल (तेजापासून उत्पन्न झाले.)


व्याख्या - उपर्युक्त प्रकाराने दोन्ही श्रुतिंच्या कथनाची एकता झाल्याने हे जाणले पाहिजे की, उक्त तेजापासून जल उत्पन्न झाले.




संबंध - या प्रकरणात हे सांगितले गेले आहे की, त्या जलाने अन्नाची रचना केली, म्हणून येथे गहू, जव आदि अन्नाची उत्पत्ति जलापासून झाली की पृथ्वीपासून ? या जिज्ञासेवर सांगतात.


पृथिव्यधिकाररूपशब्दान्तरेभ्यः ॥ २.३.१२ ॥


अर्थ - पृथिवी = (या प्रकरणात अन्नाच्या नावांने) पृथ्वीच सांगितली गेली आहे; अधिकाररूपशब्दान्तरेभ्यः = कारण की पांच तत्त्वांच्या उत्पत्तिचे प्रकरण आहे त्यात सांगितलेले काळे रूप ही पृथ्वीचे मानले गेले आहे तथा दुसर्‍या श्रुतिमध्येही जलापासून पृथ्वीचीच उत्पत्ति सांगितली गेली आहे.


व्याख्या - या प्रकरणात अन्न शब्द पृथ्वीचाच बोधक आहे असे समजणे ठीक होईल; कारण की हे तत्त्वांच्या उत्पत्तिचे प्रकरण आहे, तसेच जे अन्नाचे रूप काळे म्हटले आहे, तेही अन्नाचे रूप नाही, पृथ्वीचेच रूप काळे मानले गेले आहे. याशिवाय, तैत्तिरीयोपनिषदात जेथे या क्रमाचे वर्णन आहे तेथेही जलापासून पृथ्वीचे उत्पन्न होणे सांगितले गेले आहे. त्यानंतर पृथ्वीपासून औषधी आणि औषधीपासून अन्नाच्या उत्पत्तिचे वर्णन आहे. म्हणून येथे सरळ जलापासूनच अन्नाची उत्पत्ति मानणे ठीक नाही. छान्दोग्यमध्ये उक्त प्रकरणात जी ही गोष्ट सांगितली गेली आहे की, ‘यत्र क्व च वर्षति तदेव भूयिष्ठमन्नं भवति ।’ (६/२/४) अर्थात ‘जेथे जेथे जल अधिक बरसते तेथे अन्नाची उत्पत्ति अधिक होते.’ याचा भाव हाच आहे की, जलाच्या संबंधात पृथ्वीमध्ये प्रथम औषधी अर्थात अन्नाचे रोपटे उत्पन्न होते आणि त्यापासून अन्न उत्पन्न होते, असे मानल्यावर पूर्वापरमध्ये काही विरोध रहाणार नाही.




संबंध - या प्रकरणात आकाशाची उत्पत्ति साक्षात् ब्रह्मापासून सांगितली गेली आहे आणि अन्य चार तत्त्वांची एकापासून दुसर्‍याची क्रमशः उत्पत्ति सांगितली गेली आहे. म्हणून ही जिज्ञासा उत्पन्न होते की, एका तत्त्वानंतर दुसर्‍या तत्त्वाची रचना साक्षात परमेश्वर करतो अथवा एक तत्त्व दुसर्‍या तत्त्वाला स्वयं उत्पन्न करते ? यावर सांगतात.


तदभिध्यानादेव तु तल्लिङ्गात् सः ॥ २.३.१३ ॥


अर्थ - तदाभिध्यानात् = त्या तत्त्वांचे उत्तम प्रकारे चिंतन करण्याचे कथन असल्याने; एव = च, तु = तर (हे सिद्ध होते की); सः = तो परमात्माच त्या सर्वांची रचना करतो, तल्लिङगात् = कारण की उक्त लक्षणे त्यालाचा अनुरूप आहेत.


व्याख्या - या प्रकरणात वारंवार कार्याच्या चिंतनाची गोष्ट सांगितली गेली आहे. हे चिंतनरूप कर्म जडात संभव नाही, चेतन परमात्म्यातच संगत होऊ शकते; म्हणून हेच सिद्ध होत आहे की, तो परमात्मा स्वतःच प्रथम उत्पन्न केलेल्या तत्त्वापासून दुसर्‍या तत्त्वास उत्पन्न करतो. याच उद्देशाने एका तत्त्वापासून दुसर्‍या तत्त्वाच्या उत्पत्तिचे कथन आहे. त्या तत्त्वांना स्वतंत्ररूपाने एक दुसर्‍याचे कार्य-कारण दाखविण्याच्या उद्देश्याने नाही. म्हणून असेच समजले पाहिजे की, मुख्यरूपाने सर्वांची रचना करणारा तो पूर्ण ब्रह्म परमेश्वरच आहे. अन्य कोणी नाही.




संबंध - याप्रकारे जगताच्या उत्पत्तिच्या वर्णनाद्वारा ब्रह्माला जगताचे कारण दाखवून आता प्रलयाच्या वर्णनाने या गोष्टीची पुष्टि करतात.


विपर्य्येयेण तु क्रमोऽत उपपद्यते च ॥ २.३.१४ ॥


अर्थ - तु = परंतु, अतः = या उत्पत्तिक्रमाने; क्रमः = प्रलयाचा क्रम, विपर्ययेण = विपरीत होतो, उपपद्यसे = असेच होणे युक्तिसंगत आहे, च = तथा (स्मृतिमध्ये ही असेच वर्णन आहे.)


व्याख्या - उपनिषदांत जगताच्या उत्पत्तिचा जो क्रम सांगितला गेला आहे त्याच्या विपरीत क्रम प्रलय कालात होतो. प्रारंभिक सृष्टिच्या समयी ब्रह्मापासून आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी आदिच्या क्रमाने जगताची उत्पत्ति होते. नंतर जेव्हा प्रलयकाल येतो तेव्हा बरोबर त्याच्या विपरीत क्रमाने पृथ्वी आदि तत्त्वांचा त्यांच्या कारणांत लय होतो. जसे पृथ्वी जलात, जल अग्नित, अग्नि वायुत, वायु आकाशात, आकाश परमात्म्यात विलीन होऊन जाते. युक्तिने ही हाच क्रम योग्य वाटतो. प्रत्येक कार्य आपल्या उपादान कारणातच लीन होते. जसे जलापासून बर्फ बनतो आणि जलातच त्याचा लय होतो. स्मृतिंमध्येही असे वर्णन येते. (विष्णुपुराण अंश ६, अध्याय ४, श्‍लोक १४, ते ३८ पर्यंत)




संबंध - येथे भूतांच्या उत्पत्ति आणि प्रलयाचा क्रम तर दाखविला गेला परंतु मन, बुद्धि आणि इंद्रियांच्या उत्पत्तिविषयी काही निर्णय नाही, म्हणून ही जिज्ञासा होते की, या सर्वांची उत्पत्ति भूतापसूनच होते का परमेश्वरापासून ? जर परमेश्वरापासून होत असेल तर भूतांच्या आधी होते का नंतर होते ? म्हणून याचा निर्णय करण्यासाठी म्हणतात.


अन्तरा विज्ञानमनसी क्रमेण तल्लिङ्गादिति चेन्न, अविशेषात् ॥ २.३.१५ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; विज्ञानमनसी = इंद्रिये आणि मन, क्रमेण = उत्पत्तिक्रमाच्या दृष्टिने, अन्तरा (स्याताम्) = परमात्मा आणि आकाश आदि भूतांच्या मध्ये असले पाहिजे. तल्लिङगात् = कारण की (श्रुतिमध्ये) हाच निश्चय करविणारे, लिङग (प्रमाण) = प्राप्त होते, इति न = तर असे म्हणणे ठीक नाही; अविशेषात् = कारण की श्रुतिमध्ये कुठल्याहि क्रमविशेषाचे वर्णन नाही.


व्याख्या - मुण्डकोप निषदात प्रथम असे वर्णन आले आहे की ‘जशी प्रज्वलीत अग्नीपासून ठिणग्यांची उत्पत्ति होत असते, त्याच प्रकारे हे नाना रुपानी संयुक्त पदार्थ त्या परमेश्वरापासून उत्पन्न होतात आणि त्यातच विलीन होऊन जातात.’ “यथा सुदीप्तात् पावकाद् विस्फुलिङ्गाः सहस्त्रशः प्रभवन्ते सरुपाः। तथाक्षराद् विविधाः सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति॥”(मु.उ.२/१/१) नंतर जगताच्या कारणरुप त्या परमेश्वराच्या परात्पर स्वरुपाचे वर्णन करताना त्याला अजन्मा, अविनाशी दिव्य, निराकार, सर्व प्रकाराने परम शुद्ध आणि समस्त जगताच्या बाहेर-आंत व्याप्त दाखविले गेले आहे. “द्विव्यो ह्यमूर्तः पुरुषः सबाह्याभ्यन्तरो ह्यजः। अप्राणो ह्यमनाः शुभ्रो ह्यक्षरात् परतः परः॥” (मु.उ.२/१/२) त्यानंतर असे सांगितले गेले आहे की ‘या परब्रह्म पुरुषोत्तमापासून हा प्राण, मन, सर्व इंद्रिये तथा आकाश, वायु, ज्योति, जल आणि सर्वांनी धारण करणारी पृथ्वी उत्पन्न होतात.’ “एतस्माज्जायते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च। रवं वायुज्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी॥” (मु.उ.२/१/३) या वर्णनामध्ये परमात्म्यापासून प्रथम प्राण, मन आणि इंद्रियांचे उत्पन्न होण्याची गोष्ट सांगून आकाश आदि भूतांची क्रमशः उत्पत्ति सांगितली गेली आहे. म्हणून परमात्मा आणि आकाशाच्या मध्ये मन-इंद्रियांचे स्थान निश्चित होत आहे. तात्पर्य हे की प्राण आणि इंद्रियांसहित मनाच्या उत्पत्ति नंतरच आकाश आदि भूतांची सृष्टि मानली पाहिजे; कारण की उपर्युक्त श्रुतिमध्ये जसा क्रम दिला गेला आहे, ते याच निश्चयावर पोहोचविणारा आहे, असे जर कुणी म्हटले तर त्याचे हे कथन ठीक नाही, कारण की या वर्णनात विशेषरुपाने कुठलाही क्रम सांगितला गेलेला नाही. यामुळे तर केवळ हीच गोष्ट सिद्ध होते की बुद्धी, मन आणि इंद्रियांची उत्पत्ति ही परमेश्वरापासूनच होते. एवढेच नव्हे तर उक्त श्रुतिचे पूर्ण प्रकरण पाहिले की हे स्पष्ट होते की श्रुतिचा उद्देश्य कुठल्याही प्रकारच्या क्रमाचे प्रतिपादन करणे हे नाही. त्यास केवळ हेच दाखविणे अभीष्ट आहे की जगताचे उपादान आणि निमित्त कारण एक मात्र ब्रह्म आहे; कारण की भिन्न-भिन्न कल्पात भिन्न भिन्न क्रमाने जगताच्या उत्पत्तिचे वर्णन श्रुति आणि स्मृतिंमध्ये प्राप्त होत असते. म्हणून कुठल्या तरी एका क्रमाला निश्चित करणे शक्य होत नाही. (मु.उ.२/१/५ पासून ९ पर्यंत)




संबंध - या ग्रन्थात आत्तापर्यंतच्या विवेचनाने परब्रह्म परमेश्वरास जड-चेतनात्मक संपूर्ण जगताचे अभिन्ननिमित्तोपादान कारण सिद्ध केले गेले. यावरुन हे प्रतीत होत आहे की त्या परब्रह्मापासून अन्य तत्त्वांप्रमाणेच जीवांची ही उत्पत्ति होत असते. जर असेच असेल तर असा प्रश्न उत्पन्न होतो की परमात्म्याचाच अंश असल्याने जीवात्मा तर अविनाशी, नित्य तथा जन्ममरणरहित मानला गेला आहे, त्याची उत्पत्ति कशी होईल ? यावर सांगतात.


चराचरव्यपाश्रयस्तु स्यात्तद्व्यपदेशो भाक्तस्तद्भावभावित्वात् ॥ २.३.१६ ॥


अर्थ - तु = परंतु, चराचरव्यपाश्रयः = चराचर शरीरांना धरून सांगितले गेलेला, तद्‌व्यपदेशः = ते जन्म-मरण आदिचे कथन; भाक्तः स्यात् = जीवात्म्यासाठी गौणरूपाने असू शकते; तद्भावभावित्वात् = कारण की तो त्या त्या शरीराच्या भावाने भावित रहातो.


व्याख्या - हा जीवात्मा वास्तवात सर्वथा शुद्ध परमेश्वराचा अंश, जन्म-मरणरहित विज्ञानस्वरूप नित्य अविनाशी आहे; यात काही शंका नाही. तरीही हे अनादि परंपरागत आपल्या कर्मांच्या अनुसार प्राप्त झालेले स्थावर (वृक्ष-पहाड आदि) जङगम (देव, मनुष्य, पशु, पक्षी आदि) शरीरांच्या आश्रित आहे, त्यांच्या त्यांच्याबरोबर तद्रूप होतात, ‘मी शरीराहून सर्वथा भिन्न आहे, याच्याशी माझा काही संबंध नाही आहे.’ या वास्तविक तत्त्वास जाणत नाही या कारणाने त्या त्या शरीरांच्या जन्म-मरण आदिना धरून गौणरूपाने जीवात्म्याचे उत्पन्न होणे श्रुतिमध्ये सांगितले गेले आहे. म्हणून काही विरोध नाही. कल्पाच्या आदि या जड-चेतनात्मक अनादि सिद्ध जगताचे प्रगट होणे ही त्या परमात्म्यापासून याचे उत्पन्न होणे आहे आणि कल्पाच्या अंती त्या परमेश्वरात विलीन होऊन जाणेच त्याचा लय आहे. (गीता ९/७-१०) याशिवाय परब्रह्म परमात्मा कुणा नव्या जीवाला उत्पन्न करतो अशी गोष्ट नाही. याप्रकारे स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन प्रकारच्या शरीरांच्या आश्रित जीवात्म्याचे परमात्म्यापासून उत्पन्न होणे आणि त्यात विलीन होणे श्रुति-स्मृतिमध्ये ठिकठिकाणी सांगितले गेले आहे. जीवांना भगवान त्यांच्या परंपरागत संचित कर्मांच्या अनुसारच चांगल्या-वाईट योनिमध्ये उत्पन्न करतात हे प्रथमच सिद्ध केले गेले आहे. (ब्र.सू.२/१/३४)




संबंध - येथे ही जिज्ञासा उत्पन्न होते की, जीवांची उत्पत्ति गौण न मानता मुख्य मानली तर काय आपत्ति आहे ? यावर सांगतात.


नात्माऽश्रुतेर्नित्यत्वाच्च ताभ्यः ॥ २.३.१७ ॥


अर्थ - आत्मा = जीवात्मा; न = वास्तवात उत्पन्न होत नाही; अश्रुते = कारण की श्रुतिमध्ये कोठेही जीवात्म्याची उत्पत्ति सांगितली गेलेली नाही; च = याशिवाय, ताभ्यः = त्या श्रुतिंपासून ही, नित्यत्वात् = यांची नित्यता सिद्ध केली गेली आहे म्हणून ही, (जीवात्म्याची उत्पत्ति मानली जाऊ शकत नाही.)


व्याख्या - श्रुतिमध्ये कोठेही जीवात्म्याचे वास्तविक उत्पन्न होणे सांगितले गेलेले नाही. मुण्डकोपनिषदात जे अग्निच्या दृष्टांताने नाना भावांच्या उत्पत्तिचे वर्णन आहे, (मु.उ.२/१/१) ते पूर्वसूत्रात सांगितल्यानुसार शरीरांच्या उत्पत्तिस धरूनच आहे. याचप्रकारे दुसर्‍या श्रुतिच्या कथनाचा उद्देशही समजला पाहिजे. म्हणून श्रुतिचा हाच निश्चित सिद्धांत आहे की जीवात्म्याची स्वरूपाने उत्पत्ति होत नाही. इतकेच नव्हे तर श्रुतिंच्या द्वारा त्याच्या नित्यतेचेच प्रतिपादन केले गेले आहे. छान्दोग्योपनिषदात सजीव वृक्षाच्या दृष्टांताने श्वेतकेतुला समजावीत त्याच्या पित्याने म्हटले आहे की, ‘जीवापेतं वाव किलेदं प्रियते न जीवो प्रियते ।’ अर्थात ‘जीवरहित झालेले हे शरीरच मरते, जीवात्मा मरत नाही.’ (छां.उ.६/११/३) कठोपनिषदात म्हटले आहे की, हा विज्ञानस्वरूप जीवात्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. हा अजन्मा, नित्य, सदा रहाणारा आणि पुराण आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. (क.उ.१/२/१८) इत्यादि. म्हणून हे सर्वथा निर्विवाद आहे की जीवात्मा स्वरूपाने उत्पन्न होत नाही. ‘न जायते म्रियते वा विपश्चिन्नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥’




संबंध - जीवाची नित्यता दृढ करण्यासाठी पुन्हा सांगतात.


ज्ञोऽत एव ॥ २.३.१८ ॥


अर्थ - अतः = (तो नित्य अर्थात जन्म-मरणरहित आहे) म्हणून; एव = ही, ज्ञः = ज्ञाता आहे.


व्याख्या - हा जीवात्मा स्वरूपाने जन्मणारा-मरणारा नाही आहे, नित्य चेतन आहे म्हणून तो ज्ञाता आहे. भाव हा आहे की तो जर जन्मणारा-मरणारा, अथवा घटणारा-वाढणारा आणि अनित्य असता तर तो ज्ञाता असू शकणार नाही. परंतु सिद्ध योगी आपल्या जन्म-जन्मांतरातील गोष्टी जाणतो तसेच प्रत्येक जीवात्मा पहिल्या शरीराशी असलेला संबंध सोडून जेव्हा दुसरे नवीन शरीर धारण करतो तेव्हा पूर्वस्मृतिला अनुसरून स्नानपानादिमध्ये प्रवृत्त होत असतो. याप्रकारे पशु-पक्षी आदिंना ही प्रजोत्पादनाचे ज्ञान पूर्वीच्या अनुभवाच्या स्मृतिने होऊन जाते. तसेच बालपण आणि युवावस्थेतील घटना ज्याच्या स्मरणात रहातात तो बदलत नाही हा सर्वांचा अनुभव आहे, जर आत्म्याचे परिवर्तन होत असते तर तो ज्ञाता होऊ शकला नसता. यावरून हे सिद्ध होत आहे की, जीव नित्य आहे आणि ज्ञानस्वरूप आहे. शरीरे बदलली तरी जीवात्मा बदलत नाही.




संबंध - जीवात्मा नित्य आहे, शरीर बदलले तरी तो बदलत नाही. ही गोष्ट प्रकारांतराने पुन्हा सिद्ध करतात.


उत्क्रान्तिगत्यागतीनाम् ॥ २.३.१९ ॥


अर्थ - उत्क्रान्तिगत्यागतीनाम् = (एकाच जीवात्म्याचे) शरीरातून उत्क्रमण करणे, परलोकात जाणे आणि फिरून परत येण्याचे श्रुतिमध्ये वर्णन आहे (यावरूनही हेच सिद्ध होते की जीवात्मा नित्य आहे.)


व्याख्या - कठोपनिषद (२/२/७) मध्ये म्हटले आहे की, “योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः । स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥” “मरण पावल्यावर या जीवात्म्यापैकी आपापल्या कर्मांनुसार कोणी तर वृक्षादि अचल शरीरास धारण करतात आणि कोणी देव, मनुष्य, पशु, पक्षी आदि जङगम शरीरांना धारण करतात.” प्रश्नोपनिषदात म्हटले आहे की, “अथ यदि द्विमात्रेण मनसि सम्पद्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम् । स सोमलोके विभूतिमनुभूय पुनरावर्तते ॥” (प्र.उ.५/४) अर्थात “जर कोणी या ॐ काराच्या दोन मात्रांना लक्ष्य करून मनात ध्यान करीत असेल तर यजुर्वेदाच्या श्रुति त्याला अन्तरिक्षवर्ती चंद्रलोकात वरच्या बाजूस घेऊन जाते; तेथे स्वर्गलोकात नाना प्रकारच्या ऐश्वर्यांचा भोग करून तो पुन्हा मृत्युलोकात परत येतो;” याचप्रकारे अन्यान्य श्रुतिंमध्ये जीवात्म्याच्या वर्तमान शरीर सोडून, परलोकात जाणे तथा तेथून पुन्हा परत येण्याचे वर्णन आहे, यावरून ही हेच सिद्ध होते की, शरीराचा नाश होण्याने जीवात्म्याचा नाश होत नाही. तो नित्य आणि अपरिवर्तनशील आहे.




संबंध - सांगितलेल्या गोष्टीवरूनही पुन्हा आत्म्याचे नित्यत्व सिद्ध करतात.


स्वात्मना चोत्तरयोः ॥ २.३.२० ॥


अर्थ - उत्तरयोः = परलोकात जाणे आणि तेथून परत पुन्हा परतणे या पूर्वी सांगितलेल्या दोन्ही क्रियांची सिद्धि; स्वात्मना = स्वस्वरूपाने, च = च होत आहे. (म्हणूनही आत्मा नित्य आहे.)


व्याख्या - उत्क्रांतीचा अर्थ आहे शरीराचा वियोग. तो तर आत्म्याला नित्य मानले नाही तरीही होणारच; परंतु नंतर सांगितलेल्या गति आणि आगति अर्थात परलोकात जाणे आणि तेथून परतून येणे या दोन क्रियांची सिद्धी आपल्या स्वरूपानेच होऊ शकतात. जो परलोकात जातो तोच स्वयं परतून येतो, दुसरा नाही. यावरून हे स्पष्ट होते की, शरीराच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही. आणि तो सदा रहातो.




संबंध - याप्रकारे श्रुतिप्रमाणाने जे आत्म्याचे नित्यत्व सिद्ध केले गेले, त्यातही जीवात्म्याला गमनागमनशील - एका देशातून दुसर्‍या देशात येणारा-जाणारा म्हटले गेले आहे. जर हे ठीक असेल तर मग तर तो आत्मा विभु मानला जाऊ शकत नाही, त्याला एकदेशी मानावे लागेल म्हणून त्याचे नित्यत्व ही गौणच होईल. या शंकेचे निराकरण करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. यात पूर्वपक्षाच्या बाजूने आत्म्याच्या अणुत्वाची स्थापना करून अंती त्यास विभु (व्यापक) सिद्ध केले गेले आहे.


नाणुरतच्छ्रुतेरिति चेन्न, इतराधिकारात् ॥ २.३.२१ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की, अणुः = जीवात्मा अणुः न = नाही आहे, अतच्छुतेः = कारण की श्रुतिमध्ये त्याला अणु न म्हणता महान आणि व्यापक सांगितले गेले आहे; इति न = तर असे म्हणणे ठीक नाही; इतराधिकारात् = कारण की, (जेथे श्रुतिमध्येही आत्म्याला महान आणि विभु म्हटले आहे) तेथे दुसर्‍याचे अर्थात परमात्म्याचे प्रकरण आहे.


व्याख्या - ‘स वा एष महानज आत्मा योऽयं विज्ञानमयः प्राणेषु ।’ (बृ.उ.४/४/२२) अर्थात ‘जो हा विज्ञानमय आत्मा प्राणांमध्ये आहे, तोच हा महान अजन्मा आत्मा आहे.’ इत्यादि श्रुतिंचे वर्णनास गृहीत धरून जर असे म्हणाल की, श्रुतिमध्ये यास अणु म्हटले गेलेले नाही, महान म्हटले गेले आहे, म्हणून जीवात्मा अणु नाही, व्यापक आहे तर हे सिद्ध होऊ शकत नाही. कारण की, ही श्रुति परमात्म्याच्या प्रकरणातील आहे; म्हणून तेथे आलेला ‘आत्मा’ शब्द जीवात्म्याचा वाचक नाही आहे.




संबंध - केवळ एवढीच गोष्ट नाही, अपितु -


स्वशब्दोन्मानाभ्याञ्च ॥ २.३.२२ ॥


अर्थ - स्वशब्दानुमानाभ्याम् = श्रुतिमध्ये अणुवाचक शब्द आहे, त्यावरून आणि अनुमान (उपमा) वाचक दुसर्‍या शब्दांनी, च = ही (जीवात्म्याचे अणुत्व सिद्ध होत आहे.)


व्याख्या - मुण्डकोपनिषदात म्हटले आहे की, ‘एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यः’ (३/१/९) अर्थात ‘हा अणु परिणामवाला आत्मा चित्ताने जाणण्यायोग्य आहे.’ तथा श्वेताश्वातर मध्ये म्हटले आहे की, ‘बालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च । भागो जीवः स विज्ञेयः ।’ (५/९) अर्थात ‘केसाच्या अग्रभागाचे शंभर तुकडे केले गेले आणि त्यातील एका तुकडयाचे पुन्हा शंभर तुकडे केले गेले तर तितकेच माप जीवात्म्याचे समजायला हवे.’ याप्रकारे श्रुतिमध्ये स्पष्ट शब्दात जीवाला ‘अणु’ म्हटले गेले तथा उपमेनेही त्याचे ‘अणुतुल्य माप सांगितले गेले आहे; आणि युक्तिनेही असेच समजून येते की, जीवात्मा अणु आहे; अन्यथा तो सूक्ष्मातिसूक्ष्म शरीरात प्रविष्ट कसा होऊ शकतो ? म्हणून हेच सिद्ध होत आहे की, जीवात्मा अणु आहे.




संबंध - जीवात्म्याला शरीराच्या होणार्‍या सुख-दुःखादिचा अनुभव कसा येईल ? यावर पूर्वपक्षाकडून सांगितले आहे. -


अविरोधश्चन्दनवत् ॥ २.३.२३ ॥


अर्थ - चन्दनवत् = ज्याप्रकारे एका देशात लावलेला चन्दन (वृक्ष) आपल्या गंधरूप गुणाने सर्व जागी पसरतो; तसाच एकाच देशात स्थित आत्मा विज्ञानरूप गुणद्वारा समस्त शरीरास व्याप्त करून सुख-दुःखादिचा ज्ञाता होतो, म्हणून; अविरोधः = काही विरोध नाही.


व्याख्या - जीवाला अणु मानल्यावर त्याला शरीराच्या प्रत्येक देशात होणार्‍या पीडेचे ज्ञान होणे युक्तिविरुद्ध प्रतीत होत आहे, अशी शंका ही घेता कामा नये. कारण की, ज्याप्रकारे कुठल्या एका देशात लावलेल्या अगर घरात कुठल्या एका जागी ठेवलेले चन्दन आपल्या गंधरूपी गुणाने सर्व जागी पसरते, तसाच शरीरात एका जागी हृदयात स्थित असलेला जीवात्मा आपल्या विज्ञानरूप गुणद्वारा समस्त शरीरात पसरतो आणि सर्व अंगात होणार्‍या सुख-दुःखांना जाणू शकतो.




संबंध - शरीराच्या एका देशात आत्म्याची स्थिति आहे हे सिद्ध करण्यासाठी पूर्वपक्षी म्हणतात-


अवस्थितिवैशेष्यादिति चेन्न, अभ्युपगमाद्धृति हि ॥ २.३.२४ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; अवस्थितिवैशेष्यात् = चन्दन आणि आत्म्याची स्थिति यात भेद आहे, म्हणून (चन्दनाचा दृष्टान्त उपयुक्त नाही); इति न = तर अशी गोष्ट नाही; हि = कारण की; हृदि = हृदय देशात; अध्युपगमात् = त्याची स्थिति स्वीकारली गेली आहे.


व्याख्या - जर म्हणाल की चन्दनाची स्थिति तर एका देशात प्रत्यक्ष आहे; परंतु त्याच्या समान आत्म्याची स्थिति शरीराच्या एका देशात प्रत्यक्ष नाही आहे, म्हणून हा दृष्टान्त उपयुक्त नाही तर हे म्हणणे ठीक नाही; कारण की श्रुतिने आत्म्याला हृदयात स्थित सांगून त्याची एका देशात स्थिति स्पष्टपणे स्वीकार केली आहे; जसे ‘हृद्येष आत्मा हा आत्मा हृदयात स्थित आहे.’ (प्र.उ.३/६) तथा ‘कतम आत्मेति योऽयं विज्ञायमयः प्राणेषु हृद्यन्तर्ज्योतिः पुरुषः’ - ‘आत्मा कोण आहे असे विचारल्यावर सांगितले आहे की, ‘प्राणांमध्ये हृदयात जो हा विज्ञानमय ज्योतिःस्वरुप पुरुष आहे.’ (बृह.उ.४/३/७) इत्यादि.




संबंध - तिची गोष्ट प्रकारान्तराने सांगतात.


घुणाद्वा लोकवत् ॥ २.३.२५ ॥


अर्थ - वा = अथवा असे समजा की, अणुपरिमाण असणार्‍या जीवात्म्याचे; गुणात् = चेतनतारूप गुणाने समस्त शरीरास चेतनायुक्त करणे सम्भव आहे; लोकवत् = कारण की, लोकात असे दिसून येते.


व्याख्या - अथवा ज्याप्रकारे लोकात ही गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते की, घरातील कुठल्या एक (देशात) भागात ठेवलेला दीपक आपल्या प्रकाशरूप गुणाने समस्त घराला प्रकाशित करतो तसेच शरीराच्या एका देशात स्थित अणुच्या मापाचा जीवात्मा आपल्या चेतनरूप गुणद्वारा समस्त शरीराला चेतनायुक्त करतो, म्हणून यात काही विरोध नाही.




संबंध - गुण आपल्या गुणीपासून अलग कसा होतो ? यावर सांगतात.


व्यतिरेको गन्धवत् ॥ २.३.२६ ॥


अर्थ - गन्धवत् = गंधाप्रमाणे, व्यतिरेकः = गुणाचे गुणीपासून अलग असणे असू शकते (म्हणून काही विरोध नाही.)


व्याख्या - येथे ही शंकाही करता कामा नये की गुण तर गुणीबरोबरच रहातो. तो गुणीपासून अलग होऊन काही कार्य कसे करू शकेल ? कारण की जसा गंध आपल्या गुणी पुष्प आदिपासून अलग होऊन स्थानान्तरात पसरतो त्याचप्रकारे आत्म्याचा चेतनतारूप गुणही आत्म्यापासून अलग होऊन समस्त शरीरात व्याप्त होतो; म्हणून काही विरोध नाही.




संबंध - हीच गोष्ट श्रुतिप्रमाणाने दृढ करतात.


तथा च दर्शयति ॥ २.३.२७ ॥


अर्थ - तथा = असे, च = आणि, दर्शयति = श्रुतिही दाखविते.


व्याख्या - केवळ युक्तिने ही गोष्ट सिद्ध होत आहे असे नाही. श्रुतिमध्येही आत्म्याचे एका जागी आपल्या गुणाच्या द्वारा समस्त शरीरात नखापासून रोमापर्यंत व्याप्त होणे दाखविले गेले आहे. म्हणून हे सिद्ध होते की, आत्मा अणु आहे. “स एष इह प्रविष्टः आ नखाग्रेभ्यः ।(बृ.उ.१/४/७) तौ होचतुः सर्वमेवेदमावां भगव आत्मानं पश्याव आ लोमभ्य आ नखेभ्यः प्रतिरूपमिति ।(छां.उ.८/८/१)




संबंध - याप्रकारे पूर्वपक्षीद्वारा एकविसाव्या सूत्रापासून सत्तावीसाव्या सूत्रापर्यंत जीवात्म्याचे अणु होणे सिद्ध केले गेले, परंतु त्या दिलेल्या युक्त्या सर्वथा निर्बल आहेत आणि पूर्वपक्षीद्वारा उद्‌धृत श्रुति-प्रमाण तर आभास मात्रच आहे; म्हणून आता सिद्धान्तीच्या बाजूने अणुवादाचे खण्डन करून आत्म्याचे विभुत्वाची सिद्धी केली जाते.


पृथगुपदेशात् ॥ २.३.२८ ॥


अर्थ - पृथक् = (जीवात्म्याच्या विषयात) अणुपरिमाणसे भिन्न; उपदेशात् = उपदेश श्रुतित मिळतो म्हणून, (जीवात्मा अणु नाही; विभु आहे.)


व्याख्या - पूर्वपक्षाकडून जीवात्म्यास अणु दाखविण्याचे जे प्रमाण दिले गेले त्या श्रुतिमध्ये स्पष्ट शब्दात जीवात्म्यास विभु दाखविले गेले आहे. भाव हा आहे की, जेथे जीवात्म्याचे स्वरूप बालाग्राच्या दहा हजाराव्या भागाएवढे म्हटले आहे, तेथेच त्यास ‘सचानन्त्याय कल्पते’ या वाक्याने अनंत अर्थात विभु होण्यास समर्थ म्हटले गेले आहे. (श्वेता.उ.५/९) म्हणून प्रमाण देणार्‍यास श्रुतिच्या पुढील उपदेशावर ही दृष्टिपात केला पाहिजे. याशिवाय कठोपनिषद (१/३/१०/१३/; २/३/७) मध्ये स्पष्टच जीवात्म्याचे विशेषण ‘महान’ आले आहे तथा गीतेत ही जीवात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करताना स्पष्ट म्हटले आहे की, ‘हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे.’ (गीता २/२४) ज्याप्रकारे सर्व जागी व्याप्त असूनहि आकाश सूक्ष्म असल्याने लिप्त होत नाही. तसेच आत्माही शरीरात सर्व जागी स्थित आहे तरीही त्यापासून लिप्त होत नाही. (गीता १३/३२) तथा ‘त्या आत्म्याला तू अविनाशी समज, ज्याने हे समस्त जडसमुदाय व्याप्त आहे’ (गीता २/१७) या प्रमाणांच्या विषयात असे सांगता येणे शक्य नाही की ही परमात्म्याच्या प्रकरणात आली आहेत.




संबंध - यावर अशी जिज्ञासा होते की, जर अशी गोष्ट आहे तर श्रुतिमध्ये जे स्पष्ट शब्दात आत्म्यास अणु आणि अंगुष्ठमात्र म्हटले आहे त्याची संगति कशी होईल ? यावर सांगतात. -


तद्गुणसारत्वात्तु तद्व्यपदेशः प्राज्ञवत् ॥ २.३.२९ ॥


अर्थ - तद्‌व्यपदेशः = ते कथन; तु = तर, तद्‌गुणसारत्वात = त्या बुद्धि आदिच्या गुणांची प्रधानता लक्षात घेऊन हे, प्राज्ञवत् = जसे परमेश्वरास अणु आणि हृदयामध्ये स्थित अंगुष्ठमात्र सांगितले गेले आहे. तसेच जीवात्म्यासाठी समजले पाहिजे.


व्याख्या - श्रुतिमध्ये जीवात्म्यास अंगुष्ठमात्र परिमाणाचा म्हणून म्हणत याप्रकारे वर्णन केले गेले आहे. “अङगुष्ठमात्रो रवितुल्यरूपः संकल्पाहङकारसमन्वितो यः । बुद्धेर्गुणेनात्मगुणेन चैव आराग्रमात्रो ह्यपरोऽपि दृष्टः ॥” ‘जो अंगुष्ठमात्र परिमाणाचा, सूर्यासदृश प्रकाशस्वरूप तथा संकल्प आणि अहंकाराने युक्त आहे, तो बुद्धिच्या गुणांनी आणि शरीराच्या गुणांनीही आर्‍याच्या टोका जसे सूक्ष्म आकाराचा आहे असा परमात्म्याहून भिन्न जीवात्मा ही निःसंदेह ज्ञानी लोकांच्या द्वारा पाहिला गेला आहे.’ (श्वेता.उ.५/८) जीवात्म्याच्या गति-अगतिचे वर्णन ही शरीरादिच्या संबंधानेच आहे. (कौ.उ.३/६; प्र.उ.३/९, १०) “यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना यथासंकल्पितं लोकं नयति ।” यामुळे ही गोष्ट बिलकुल स्पष्ट होत आहे की, श्रुतिमध्ये जेथे कोठे जीवात्म्याला एकदेशी ‘अङगुष्ठमात्र’ अथवा ‘अणु’ म्हटले गेले आहे. ती बुद्धि आणि शरीराच्या गुणांना धरूनच आहे, जसे परमात्म्यास ही ठिकठिकाणी जीवात्म्याच्या हृदयात स्थित (क.उ.१/३/१; प्र.उ.६/२; मु.उ.२/१/१० तथा २/२/१; ३/१/५, ७; श्वेता.उ.३/२०) तसेच अङगुष्ठमात्रही (क.उ.२/१/१२-१३) सांगितले गेले आहे. ते कथन स्थानाच्या अपेक्षेनेच आहे, त्याचप्रकारे जीवात्म्याच्या विषयीही समजले पाहिजे. वास्तवात तो अणु नाही, विभु आहे यात काही शंका नाही. पूर्वपक्षीने जी बृहदारण्यक आणि छान्दोग्य-श्रुतिची प्रमाणे देऊन ही गोष्ट सांगितली की, ‘तो एका जागी स्थित राहूनहि नखापासून रोमापर्यंत व्याप्त आहे.’ हे कथन सर्वथा प्रकरण विरुद्ध आहे. कारण की, त्या प्रकरणात आत्म्याच्या गुणाच्या व्याप्तिविषयी कुठलीच गोष्ट सांगितली गेलेली नाही. तसेच गंध, प्रदीप आदिचा दृष्टांत देऊन जी गुणद्वारा आत्म्याच्या चैतन्याची व्याप्ति दाखविली आहे, ती ही युक्तिसंगत नाही. कारण की श्रुतिमध्ये आत्म्याचे चैतन्यगुणविशिष्ट मानलेले नाही, तर उलट परमेश्वराप्रमाणे सत्, चेतन आणि आनंद हे त्याचे स्वरूपभूत लक्षण मानले गेले आहे. म्हणून जीवात्म्याला अणु मानणे कुठल्याही प्रकारे उचित नाही.




संबंध - येथे ही जिज्ञासा होते की जर याप्रकारे बुद्धि आदिच्या गुणांच्या संयोगाने आत्म्याला अङगुष्ठमात्र तथा एकदेशी मानले जाईल, स्वरूपाने नाही; मग तर जेव्हा प्रलयकाली आत्म्याच्या बरोबर बुद्धि आदिचा संबंध रहाणार नाही, त्या समयी समस्त जीवांची मुक्ति होऊन जाईल. म्हणून प्रलयानंतर सृष्टिही होऊ शकणार नाही. जर मुक्त जीवांचे पुन्हा उत्पन्न होणे मानले जाईल तर मुक्तिच्या अभावाचा प्रसंग उपस्थित होईल, यावर सांगतात.


यावदात्मभावित्वाच्च न दोषस्तद्दर्शनात् ॥ २.३.३० ॥


अर्थ - यावदात्मभावित्वात् = जोपर्यंत स्थूल, सूक्ष्म अथवा कारण यापैकी कुठल्याही शरीराशी जीवात्म्याचा संबंध रहातो, तोपर्यंत तो त्या शरीराच्या अनुरूप एकदेशीसारखा रहातो, म्हणून; च = ही, दोषः = उक्त दोष, न = नाही आहे; तद्दर्शनात् = श्रुतिमध्येही असेच दिसून येते.


व्याख्या - श्रुतिमध्ये सांगितले आहे की, जीवाचे एका शरीरातून दुसर्‍यात जाते समयी ही सूक्ष्म शरीराशी संबंध रहात असतो. (प्र.उ.३/९, १०) परलोकांतही त्याचा शरीराशी संबंध मानला गेला आहे. तथा सुषुप्ति आणि स्वप्नकालातही देहाशी संबंध दाखविला गेला आहे. (प्र.उ.४/२, ५) “तस्मै स होवाच । यथा गार्ग्य मरीचयोऽर्कस्यास्तं गच्छतः सर्वा एतस्मिंस्तेजोमण्डल एकीभवन्ति ताः पुनः पुनरुदयतः प्रचरन्त्येवँह वै तत्सर्वं परे देवे मनस्येकीभवति । तेन तर्ह्येष पुरुषो न श्रृणोति न पश्यति न जिघ्नति न रसयते न स्पृशते नाभिवदते नादत्ते नानन्दयते न विसृजते नेयायते स्वपितीत्याचक्षते ।” त्याला त्या सुप्रसिद्ध महर्षि पिप्पलादाने म्हटले, “गार्ग्य ! ज्या प्रकारे अस्तास जाणार्‍या सूर्याचे सर्व किरण या तेजोमण्डलात एक होतात आणि उदय झाल्यावर ते सर्व पुन्हा फैलावतात. बरोबर त्याचप्रमाणे (निद्रेच्या वेळी) ती सर्व इंद्रियेही परमदेव मनात एक होऊन जातात; यामुळे त्या समयी तो जीवात्मा ऐकत नाही, पहात नाही, वास घेत नाही, स्वाद घेत नाही, स्पर्श करत नाही, बोलत नाही, ग्रहण करत नाही, मैथुनाचा आनंद भोगत नाही, मल-मूत्राचा त्याग करत नाही अथवा चालतही नाही. त्या समयी ‘तो झोपला आहे असे लोक म्हणतात.’ ‘अत्रैष देवः स्वप्ने महिमान मनुभवति ।यद् दृष्टं दृष्ट मनुपश्यति श्रुतं श्रुतमेवार्थ मनुश्रृणोति । देशादिगन्तरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति । दृष्टं चादृष्टं च श्रुतं चाश्रुतं चानुभूतं चाननुभूतं च सच्चासच्च सर्वं पश्यति सर्वः पश्यति ।’ ‘या स्वप्नावस्थेत हा जीवात्मा आपल्या विभूतिचा अनुभव करतो जे वारंवार पाहिलेले आहे तेच वारंवार पाहतो, वारंवार ऐकलेल्या गोष्टी पुनः पुनः ऐकतो, नाना देशात आणि दिशात वारंवार अनुभवलेल्या विषयांचा पुनः पुनः अनुभवतो. इतकेच नव्हे तर पाहिलेले आणि न पाहिलेले आणि ऐकलेले आणि न ऐकलेलेहि, अनुभवलेले आणि न अनुभवलेले तसेच विद्यमान असलेले आणि अविद्यमानला पाहतो, याप्रकारे सार्‍या घटना पाहतो आणि सर्व काही स्वतःच बनून पाहतो. याचप्रकारे प्रलयकालीही कर्मसंस्कारांसहित कारण शरीराशी जीवात्म्याचा संबंध राहतो, कारण की, श्रुतिमध्ये ही गोष्ट स्पष्ट सांगितली गेली आहे की, प्रलयकालात हा विज्ञानात्मा समस्त इंद्रियांसह त्या परब्रह्मात स्थित होतो. (प्र.उ.४/११) ‘विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणा भूतानि सम्प्रतिष्ठन्ति यत्र । तदक्षरं वेदयते यस्तु सोम्य स सर्वज्ञः सर्वमेवाविवेशेति ॥’ म्हणून सुषुप्ति आणि प्रलयकालात समस्त जीव मुक्त होण्याचा तथा मुक्त पुरुषांचा पुनर्जन्म आदिचा काही दोष येऊ शकत नाही.




संबंध - प्रलयकाली तर समस्त जगत् परमात्म्यात विलीन होऊन जाते, तेथे बुद्धि आदि तत्त्वांची ही परमात्म्याहून भिन्न सत्ता राहात नाही. या स्थितीत बुद्धि आदिचा समुदायरुप सूक्ष्म अथवा कारण शरीराबरोबर जीवात्म्याचा संबंध कसा राहू शकतो? आणि जर त्या समयी राहात नाही तर सृष्टिकालात कसा संबंध होतो? या जिज्ञासेवर सांगतात-


पुंस्त्वादिवत्तस्य सतोऽभिव्यक्तियोगात् ॥ २.३.३१ ॥


अर्थ - पुंस्त्वादिवत् = पुरुषत्व आदि प्रमाणे; सतः = प्रथमपासून विद्यमान; अस्य = या (कारण शरीरादिच्या) संबंधाचे; तु = ही; अभिव्यक्तियोगात् = (सृष्टिकाली) प्रकट होण्याचा योग आहे; म्हणून (काही दोष नाही आहे).


व्याख्या - प्रलयकालात यद्यपि बुद्धि आदि तत्त्व स्थूलरूपात न राहाता आपल्या कारणरुप परब्रह्म परमेश्वरात विलीन होऊन जाते, तथापि भगवंताच्या अचिन्त्य शक्तिच्या रुपात ती अव्यक्तरुपाने सर्वच सर्व विद्यमान राहातात. तथा सर्व जीवात्मे ही आपापल्या कर्मसंस्काररूप कारणशरीरांसहित अव्यक्तरूपाने त्या परब्रह्म परमेश्वरात विलीन होऊन रहातात. (प्र.उ.४/११) त्यांच्या संबंधाचा सर्वथा नाश होत नाही. म्हणून सृष्टिकाली त्या परब्रह्म परमात्म्याच्या संकल्पाने ते त्याच प्रकारे सूक्ष्म आणि स्थूल रूपात प्रकट होतात. जसे बीजरूपात प्रथमच विद्यमान पुरुषत्व बाल्यकाली प्रकट होत नाही. परंतु युवावस्थेत शक्तिच्या संयोगाने प्रकट होते हीच गोष्ट बीज-वृक्षाच्या संबंधात ही समजली जाऊ शकते.(गीता अ.१४ श्‍लोक ३ व ४ मध्ये हीच गोष्ट स्पष्ट केली गेली आहे.) म्हणून काही विरोध नाही. ज्या साधकाचे अंतःकरण साधनेच्या द्वारा जितके शुद्ध आणि व्यापक होते ते तितकेच विशाल होऊन जाते. हेच कारण आहे की योग्यामध्ये दूर देशातील गोष्ट जाणणे आदिचे सामर्थ्य येत असते, कारण की जीवात्मा तर प्रथमपासूनच सर्वत्र व्याप्त आहेच, अंतःकरण आणि स्थूल शरीराच्या संबंधानेच तो त्याच्या अनुरुप आकाराचा होत आहे.




संबंध - जीवात्मा तर स्वयंप्रकाशस्वरूप आहे, त्याला मन, बुद्धिच्या संबंधाने वस्तुचे ज्ञान होते, हे मानण्याची काय आवश्यकता आहे ? या जिज्ञासेवर सांगतात.


नित्योपलब्ध्यनुपलब्धिप्रसङ्गोऽन्यतरनियमो वाऽन्यथा ॥ २.३.३२ ॥


अर्थ - अन्यथा = जीवाला अंतःकरणाच्या संबंधाने विषय ज्ञान होत असते असे मानले नाही तर; नित्योपलब्ध्यनुपलब्धिप्रसङगः = त्याला सदाच विषयांचा अनुभव येण्याचा अथवा कधीही अनुभव न येण्याचा प्रसंग उपस्थित होईल; वा = अथवा, अन्यतर नियमः = आत्म्याची ग्राहक-शक्ति अथवा विषयाच्या ग्राह्य-शक्तिचे नियमना (प्रतिबंधा) ची कल्पना करावी लागेल (अशा स्थितीत अंतःकरणाचा संबंध मानणेच युक्तिसंगत आहे.)


व्याख्या - जर असे मानले नाही तर हा जीवात्मा अंतःकरणाच्या संबंधाने समस्त वस्तुंचा अनुभव करतो हे प्रत्यक्षात जे दिसून येते की हा जीवात्मा कधी कुठल्या वस्तुचा अनुभव करतो आणि कधी करत नाही, याची सिद्धी होणार नाही. कारण की याला जर प्रकाशस्वरूप असल्याने स्वतः अनुभव करणारा मानाल तर मग यास सदैव एकाच वेळी प्रत्येक वस्तुचे ज्ञान होते असे मानावे लागेल. जर याच्या ठिकाणी जाणण्याची शक्ति स्वाभाविक मानली नाही तर कधी कुठल्याही काळात न जाणण्याचा प्रसंग येईल अथवा दोघांपैकी कुणा एकाच्या शक्तिचे नियमन (संकोच) मानावे लागेल. अर्थात एक तर हे स्वीकारावे लागेल की कुठल्या तरी निमित्ताने जीवात्म्याच्या ग्राहकशक्तिचा प्रतिबंध होतो अथवा असे मानावे लागेल की विषयाच्या ग्राह्य-शक्तित कुठल्या तरी कारणाने प्रतिबंध येत असतो. प्रतिबंध दूर झाल्यावर विषयाची उपलब्धी होते आणि तो राहिला तर विषयोपलब्धि होत नाही. परंतु ही गौरवपूर्ण कल्पना करण्यापेक्षा अंतःकरणाच्या संबंधाचा स्वीकार करण्यातच लाघव आहे. म्हणून हेच मानणे ठीक आहे की, अंतःकरणाच्या संबंधानेच जीवात्म्याला समस्त लौकिक पदार्थांचा अनुभव येतो. ‘मनसा ह्येव पश्यति मनसा श्रृणोति ।’ (बृह.उ.१/५/३) अर्थात ‘मनानेच पहातो, मनानेच ऐकतो.’ इत्यादि मंत्र-वाक्यांच्या द्वारा श्रुति ही अंतःकरणाच्या संबंधाचा स्वीकार करते. जीवात्म्याचा अंतःकरणाशी संबंध असूनहि तो कधी तर कार्यरूपात प्रकट राहातो आणि कधी कारणरूपाने अप्रकट राहातो. या प्रकारे येथपर्यंत ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, जीवात्म्याला जे अणु म्हटले गेले आहे, ते त्याच्या सूक्ष्मतेचे बोधक आहे, एकदेशितेचे (लघुत्वाचे) बोधक नाही; आणि त्याला जे अङगुष्ठमात्र म्हटले गेले आहे, ते मनुष्य शरीराच्या हृदयाच्या मापानुसार म्हटले गेले आहे. तसेच त्याला जे लहान आकाराचा म्हटले गेले आहे, तेही संकीर्ण अंतःकरणाच्या संबंधाने आहे. वास्तवात तो विभु (समस्त जड पदार्थात व्याप्त) आणि अनंत (देशकालाच्या सीमेहून अतीत आहे.)




संबंध - सांख्यमतामध्ये जड प्रकृतिला स्वतंत्र कर्ता मानले गेले आहे आणि पुरुषाला असंग मानले गेले आहे, परंतु जड प्रकृतिला स्वभावाने कर्ता मानणे युक्तिसंगत नाही आहे तसेच पुरुष असंग असल्याने त्यालाही कर्ता मानणे शक्य होत नाही. म्हणून हा निश्चय करण्यासाठी की कर्ता कोण आहे, पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. तेथे गौणरूपाने ‘जीवात्मा कर्ता आहे.’ ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी सूत्रकार म्हणतात.


कर्त्ता शास्त्रार्थवत्त्वात् ॥ २.३.३३ ॥


अर्थ - कर्ता = कर्ता जीवात्मा आहे; शास्त्रार्थवत्त्वात् = कारण की विधिनिषेधबोधक शास्त्राची यात सार्थकता आहे.


व्याख्या - श्रुतिमध्ये वारंवार जे असे म्हटले गेले आहे की, अमुक काम केले पाहिजे, अमुक करता कामा नये. अमुक शुभ कर्म करणार्‍याला अमुक श्रेष्ठ फळ मिळते; अमुक पापकर्म करणार्‍याला अमुक दुःख भोगावे लागते, इत्यादि; हे जे शास्त्राचे कथन आहे, ते कुठल्या चेतनास कर्ता न मानण्याने आणि जड प्रकृतिला कर्ता मानण्याने हे व्यर्थ होत आहे; परंतु शास्त्र-वचन कधी व्यर्थ होऊ शकत नाही. म्हणून जीवात्म्याला ही समस्त कर्मांचा कर्ता मानणे उचित आहे. याशिवाय श्रुति स्पष्ट शब्दात जीवात्म्याला कर्ता म्हणत आहे. (प्र.उ.४/९) ‘एष हि द्रष्टा स्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः ।’ येथे हे ध्यानात ठेवले पाहिजे की, अनादिकालापासून जीवात्म्याचा कारण-शरीराशी जो संबंध आहे त्यामुळेच जीवाला कर्ता मानला गेला आहे, स्वरूपाने तो कर्ता नाही. कारण की, श्रुतिमध्ये त्याचे स्वरूप निष्क्रिय म्हटले गेले आहे. (श्वेता.६/१२) ही गोष्ट या प्रकरणाच्या अंती सिद्ध केली आहे.




संबंध - जीवात्मा कर्ता असण्यात दुसरा हेतु सांगितला जात आहे.


विहारोपदेशात् ॥ २.३.३४ ॥


अर्थ - विहारोपदेशात् = स्वप्नात स्वेच्छेने विहार करण्याचे वर्णन असल्याने ही (हे सिद्ध होत आहे की जीवात्मा ‘कर्ता’ आहे.)


व्याख्या - शास्त्राच्या विधि-निषेधाशिवाय हे स्वप्नावस्थेत स्वेच्छापूर्वक हिंडणे-फिरणे, खेळ तमाशा करणे आदि कर्मे करतो असे वर्णन आहे. (बृह.उ.४/३/१३, २/१/१८) म्हणूनही हे सिद्ध होत आहे की, जीवात्मा कर्ता आहे, जड प्रकृतिमध्ये स्वेच्छापूर्वक कर्म करणे संभवत नाही.




संबंध - तिसरे कारण सांगतात.


उपादानात् ॥ २.३.३५ ॥


अर्थ - उपादानात् = इंद्रियांना ग्रहण करुन विचरण्याचे वर्णन असल्याने (ही हेच सिद्ध होते की, इंद्रिये आदिच्या संबंधाने जीवात्मा कर्ता आहे.)


व्याख्या - येथे उपादान शब्द उपादान कारणाचा वाचक नाही. परंतु ‘ग्रहण’रूप क्रियेचा बोधक आहे. श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘स यथा महाराजो जानपदान् गृहीत्वा स्वे जनपदे यथाकामं परिवर्तेतैव । मे वैष एतत्प्राणान् गृहीत्वा स्वे शरीरे यथाकामं परिवर्तते ॥’ (बृह.उ.२/१/१८) ‘अर्थात ज्या प्रकारे कुणी महाराज प्रजाजनांना बरोबर घेऊन आपल्या देशाने इच्छेनुसार भ्रमण करतो, तसाच हा जीवात्माही स्वप्नावस्थेत प्राणशब्दवाच्य इंद्रियांना ग्रहण करून या शरीरात इच्छेनुसार विचरतो. याप्रकारे इंद्रियांच्या द्वारा कर्मे करण्याचे वर्णन असल्याने हे सिद्ध होते की प्रकृति किंवा इंद्रिये स्वतंत्र कर्ता नाहीत, त्यांनी युक्त होऊन जीवात्माच कर्ता आहे. (गीता १५/७, ९)




संबंध - प्रकारान्तराने जीवात्माचे कर्तेपण सिद्ध करतात.


व्यपदेशाच्च क्रयायां न चेन्निर्देशविपर्ययः ॥ २.३.३६ ॥


अर्थ - क्रियायाम् = क्रिया करण्यात, व्यपदेशात् = जीवात्म्याचे कर्तेपण श्रुतिमध्ये कथन आहे, म्हणून; च = ही (जीवात्मा कर्ता आहे); चेत् = जर, न = जीवात्म्याला कर्ता म्हणणे अभीष्ट नसते तर, निर्देशविपर्ययः = श्रुतिचा संकेत त्याचा विपरीत झाला असता.


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘विज्ञानं यज्ञं तनुते कर्माणि तनुतेऽपि च ।’ (तै.उ.२/५) अर्थात ‘हा जीवात्मा यज्ञाचा विस्तार करतो आणि त्यासाठी कर्मांचा विस्तार करतो.’ याप्रकारे जीवात्म्याला कर्मांचा विस्तार करणारा म्हटले गेल्याने त्याचे कर्तेपण सिद्ध होत आहे. जर म्हणाल की, ‘विज्ञान’ शब्द बुद्धीचा वाचक आहे; म्हणून येथे बुद्धिलाच कर्ता म्हटले गेले आहे. तर हे म्हणणे त्या प्रसंगाच्या विपरीत होईल. कारण की तेथे विज्ञानमयच्या नावाने जीवात्म्याचेच प्रकरण आहे. जर विज्ञान नामाने बुद्धीला ग्रहण करणे अभीष्ट असते तर मंत्रात ‘विज्ञान’ शब्दाच्या बरोबर प्रथमा विभक्तिचा प्रयोग न करता करण द्योतक तृतीया विभक्तिचा प्रयोग केला असता.




संबंध - येथे ही जिज्ञासा होते की, जीव जर स्वतंत्र कर्ता आहे, तर मग त्याने आपल्या हिताचेच काम केले पाहिजे, अनिष्ट कार्यात याची प्रवृत्ति होता कामा नये. परंतु असे दिसून येत नाही. याचे काय कारण आहे ? यावर सांगतात.


उपलब्धिवदनियमः ॥ २.३.३७ ॥


अर्थ - उपलब्धिवत् = सुख-दुःखादि भोगांच्या प्राप्तीप्रमाणे; अनियमः = कर्म करण्यात ही नियम नाही आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे या जीवात्म्याला सुख-दुःख आदि भोगांची प्राप्ती होते, त्यात हा निश्चित नियम नाही की, त्याला अनुकूलच अनुकूल भोग प्राप्त होतील, प्रतिकूल प्राप्त होणार नाही; याचप्रकारे कर्म करण्यात ही हा नियम नाही की तो आपल्याला हितकारकच कर्म करील, अहितकारक कर्म करणार नाही. जर म्हणाल की, फलभोगात तर जीव प्रारब्धामुळे स्वतंत्र नाही आहे, त्याच्या प्रारब्धानुसार परमेश्वराच्या विधानाने जसे भोग मिळणे उचित असेल तसे भोग मिळतात; परंतु नवीन कर्मे करण्यात तर तो स्वतंत्र आहे; मग अहितकारक कर्मात प्रवृत्त होणे कसे उचित आहे ? तर याचे उत्तर असे आहे की तो ज्याप्रकारे फल भोगण्यात प्रारब्धाच्या अधीन आहे तसाच नवीन कर्मे अरण्यात अनादिकालापासून संचित कर्मांच्या अनुसार जो जीवात्म्याचा स्वभाव बनलेला असेल त्याच्या अधीन आहे म्हणून हा सर्वथा हितातच प्रयुक्त होईल असा नियम होऊ शकत नाही. म्हणून काही विरोध नाही आहे. भगवंताचा आश्रय घेऊन जर तो प्रभुच्या कृपेने मिळालेल्या विवेकाचा आदर करील, प्रमाद करणार नाही तर फार सुगमतेने आपला स्वभाव सुधारू शकतो. त्याची त्याच्यात पूर्णपणे सुधारणा झाली तर अहितकारक कर्मात होणारी प्रवृत्ति बंद होऊ शकते.




संबंध - उपर्युक्त कथनाच्या पुष्टिसाठी दुसरा हेतु प्रस्तुत करतात.


शक्तिविपर्य्ययात् ॥ २.३.३८ ॥


अर्थ - शक्तिविपर्ययात् = शक्तिचा विपर्यय होण्यामुळे ही (विवेकाचा आदर केल्याशिवाय त्याच्याद्वारा सर्वथा हिताचरण होण्याचा नियम होऊ शकत नाही.)


व्याख्या - जीवात्म्याचे जे कर्तापण आहे ते स्वरूपाने नाही; परंतु अनादि कर्मसंस्कार तसेच इंद्रिये आणि शरीर आदिच्या संबंधाने आहे ही गोष्ट पूर्वी सांगितली आहे. म्हणून तो नियमित रूपाने आपल्या हिताचे आचरण करू शकत नाही; कारण की प्रत्येक काम करण्यात सहकारी कारणांची आणि बाह्य सामग्रीची आवश्यकता असते; त्या सर्वांच्या उपलब्धीमध्ये हा सर्वथा परतंत्र आहे. एवं अंतःकरणाची, इंद्रियांची आणि शरीराची शक्तिही कधी अनुकूल होते आणि कधी प्रतिकूल होते. याप्रकारे शक्तिचा विपर्यय होण्यामुळेही विवेकाचा आदर केल्याशिवाय जीवात्मा आपल्या हिताचे आचरण करण्यात सर्वथा स्वतंत्र नाही.




संबंध - येथे ही जिज्ञासा होते की, जर जीवात्म्याचे कर्तापण त्यात स्वरूपतः मानले गेले तर काय हानि आहे ? यावर सांगतात.


समाध्यभावाच्च ॥ २.३.३९ ॥


अर्थ - समाध्यभावात् = समाधि-अवस्थेचा अभाव प्राप्त होण्याने; च = ही, (जीवात्म्याचे कर्तेपण स्वाभाविक मानता कामा नये.)


व्याख्या - समाधी अवस्थेत कर्मांचा सर्वथा अभाव होऊन जातो. जरी जीवाच्या ठिकाणी कर्तेपण त्याचा स्वाभाविक धर्म मानला गेला तरी समाधी अवस्था होणे सिद्ध होणार नाही; कारण की, ज्याप्रकारे जीवात्म्यामध्ये चेतनता स्वरूपगत धर्म आहे; त्याचप्रकारे जर कर्म ही असेल तर तो कधीही निष्क्रिय होऊ शकणार नाही. परंतु वास्तवात अशी गोष्ट नाही आहे; जीवात्म्याचे स्वरूप निष्क्रिय मानले गेले आहे. (श्वेता.६/१२) म्हणून त्यात जे कर्तेपण आहे ते अनादिसिद्ध अंतःकरण आदिच्या संबंधाने आहे; स्वरूपगत नाही आहे.




संबंध - ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी परत सांगितले जात आहे.


यथा च तक्षोभयथा ॥ २.३.४० ॥


अर्थ - च = याशिवाय, यथा = जसे, तक्षा = कारागीर, उभयथा = कधी कर्म करतो, कधी करत नाही, अशा दोन प्रकारच्या स्थितिमध्ये दिसून येतो. (त्याचप्रकारे जीवात्मा ही दोन्ही प्रकारच्या स्थितित राहतो म्हणून त्याचे कर्तेपण स्वरूपगत नाही.)


व्याख्या - ज्याप्रकारे रथ आदि वस्तु बनविणारा कारागिर जेव्हा आपल्या सहकारी नाना प्रकारच्या हत्यारांनी संपन्न होऊन कार्यात प्रवृत्त होतो, तेव्हा तो त्या कार्याचा कर्ता असतो. आणि जेव्हा हत्यारांना दूर ठेवून गुपचुप बसतो तेव्हा त्या क्रियेचा कर्ता नसतो. याप्रकारे हा जीवात्मा ही जेव्हा अंतःकरण आणि इंद्रियांचा अधिष्ठाता होतो तेव्हा तो त्यांच्याद्वारा केल्या जाणार्‍या कर्मांचा कर्ता असतो आणि ज्यावेळी त्यांच्याशी संबंध सोडतो तेव्हा कर्ता नसतो. म्हणून जीवात्म्याचे कर्तेपण स्वभावसिद्ध नाही. याशिवाय जर जीवात्म्याला स्वरूपतः कर्ता मानले गेले तर श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे निम्नलिखित वर्णन सर्वथा असंगत ठरेल. “प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥” ‘हे अर्जुना ! वास्तविक संपूर्ण कर्मे प्रकृतिच्या गुणांच्या द्वारा केली जातात, तरी ही जो अहंकाराने मोहित झालेला असतो असा पुरुष ‘मी कर्ता आहे’ असे मानतो.’ (गीता३/२७) “नैव किञ्चितत्करोमीति युक्तो मन्यते तत्त्वचित् । पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्नन्नश्नन्गच्छन्स्वपञ्स्श्वसन् ॥ प्रलपन्विसृजन् गृहन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥” “हे अर्जुना ! तत्त्व जाणणारे योगी तर पहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता (हुंगताना), भोजन करताना, गमन करताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, त्याग करताना, ग्रहण करताना, तसेच डोळे उघडताना, मिटताना ही सर्व इंद्रिये आपापल्या अर्थात वर्तत आहेत, याप्रकारे समजून निःसंदेह असे मानतो की, मी काहीही करत नाही.” “प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥” “जो पुरुष संपूर्ण कर्मांना सर्व प्रकारांनी प्रकृतिद्वारा केलेली पहातो अर्थात ही गोष्ट तत्त्वाने जाणतो की, प्रकृतिपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणच गुणात वर्तत आहेत तसेच आत्म्याला अकर्ता पहातो, तोच पहातो.” (गीता१३/२९) याचप्रकारे भगवद्‌गीतेत ठिकठिकाणी जीवात्म्याच्या ठिकाणी कर्तेपणाचा निषेध केला आहे; यावरून हेच सिद्ध होते की, जीवात्म्याचे कर्तेपण अंतःकरण आणि संस्कारांच्या संबंधामुळे आहे, केवळ शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी कर्तेपण नाही आहे. (गीता१८/१६)




संबंध - पूर्वसूत्रानी हा निश्चय केला गेला की प्रकृति स्वतंत्र कर्ता नाही तथा जीवात्म्याचे जे कर्तेपण आहे तेही बुद्धि, मन आणि इंद्रिये आदिच्या संबंधाने आहे, स्वभावतः नाही या कारणाने येथे ही जिज्ञासा होत आहे की, उपर्युक्त जीवात्म्याचे कर्तेपण स्वाधीन आहे की पराधीन यावर सांगतात.


परात्तु तच्छ्रुतेः ॥ २.३.४१ ॥


अर्थ - तत् = ते जीवात्म्याचे कर्म; परात् = परमेश्वरापासून, तु = ही आहे, श्रुतेः = कारण की श्रुतिच्या वर्णनाने हेच सिद्ध होत आहे.


व्याख्या - बृहदारण्यकमध्ये म्हटले आहे की, ‘जो जीवात्म्यामध्ये राहून त्याचे नियमन करतो, तो अंतर्यामी तुझा आत्मा आहे.’ (३/७/२२) छान्दोग्यमध्ये म्हटले आहे की, ‘मी या जीवात्म्यासहित प्रविष्ट होऊन नामरूपाला प्रकट करीन.’ (६/३/२) तथा केनोपनिषदमध्ये जी यक्षाची आख्यायिका आहे, तिच्यामध्ये ही हे सिद्ध केले गेले आहे की, ‘अग्नि आणि वायु आदि देवतामध्ये आपले कार्य करण्याची स्वतंत्र शक्ति नाही, त्या परब्रह्मापासून शक्ति प्राप्त करूनच ते आपापले कार्य करण्यास समर्थ होतात.’ (३/१-१०) इत्यादि श्रुतिंच्या या वर्णनावरून हेच सिद्ध होते की, जीवात्मा स्वतंत्रतापूर्वक काहीही करू शकत नाही, तो जे काही करतो ते परब्रह्म परमेश्वराच्या सहयोगाने, त्याच्याकडून दिल्या गेलेल्या शक्तिच्या द्वाराच करतो. जीवाचे कर्तेपण ईश्वराधीन आहे ही गोष्ट गीतेत स्पष्ट सांगितली गेली आहे. “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥” (गीता१८/६१) ‘हे अर्जुना ! शरीररूपी यंत्रात आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना आपल्या मायेने कर्मांच्या अनुसार चालविणारा ईश्वर सर्वांच्या हृदयात निवास करतो.’ (१८/६१) विष्णुपुराणात जेथे प्रल्हादाचा प्रसंग आला आहे, तेथे प्रल्हादाने आपल्या पित्याला म्हटले आहे, ‘पिताजी ! ते भगवान विष्णु केवळ माझ्याच हृदयात नाहीत अपितु समस्त लोकांना सर्व बाजूंनी व्याप्त करून स्थित आहेत. तेच सर्वव्यापी परमेश्वर माझ्या आणि आपल्यासहित सर्व प्राण्यांनाहि समस्त क्रियांमध्ये नियुक्त करतात.’ (विष्णु.१/१७/२६) “न केवलं मद्‌धृदयं स विष्णुराक्रम्य लोकानखिलानवस्थितः । स मां त्वदादींश्च पितः समस्तान् समस्तचेष्टासु युनक्ति सर्वगः ॥” यावरून ही हे सिद्ध होते की, जीवात्म्याचे कर्तेपण सर्वथा ईश्वराधीन आहे. हा जे काही करतो ते परमेश्वराने दिलेल्या शक्तिने करतो, तथापि अभिमानवश आपल्याला कर्ता मानून प्राप्त शक्तिचा दुरूपयोग करण्यामुळे फसतो. (गीता३/२७)




संबंध - पूर्वसुत्रात जीवात्म्याचे कर्तेपण ईश्वराधीन म्हटले गेले आहे, हे ऐकून ही जिज्ञासा होत आहे की, ईश्वर पहिल्याने तर जीवांकडून शुभाशुभ कर्मे करवितो आणि नंतर त्याचा फलभोग करवितो. हे मानण्याने ईश्वरात विषमता आणि निर्दयतेचा दोष येईल. त्याचे निराकरण कसे होईल यावर सांगतात.


कृतप्रयत्‍नापेक्षस्तु विहितप्रतिषिद्धावैयार्थादिभ्यः ॥ २.३.४२ ॥


अर्थ - तु = परंतु, कृतप्रयत्नापेक्षः = ईश्वर जीवाच्या पूर्वकृत कर्म-संस्कारांची अपेक्षा ठेवून ही त्याला नवीन कर्म करण्याची शक्ति आणि सामग्री प्रदान करतो म्हणून तथा; विहितप्रतिषिद्धावैयर्थ्यादिभ्यः = विधि-निषेध, शास्त्राची सार्थकता आदि हेतुपासून ही ईश्वर सर्वथा निर्दोष आहे.


व्याख्या - ईश्वरद्वारा जी जीवात्म्याला नवीन कर्म करण्याची शक्ति आणि सामग्री दिली जाते, ती त्या जीवात्म्याच्या जन्म-जन्मांतरात संचिते केलेल्या कर्म संस्कारांच्या अपेक्षेनेच दिली जाते. अपेक्षा विना नाही, तसेच त्याचबरोबर परम सुहृद प्रभुंनी त्या शक्ति आणि सामग्रीचा सदुपयोग करण्यासाठी मनुष्याला विवेकहि प्रदान केला आहे. एवं त्या विवेकाला जागृत करण्यासाठी शास्त्रात चांगल्या कर्मांचे विधान आणि वाईट कर्मांचा निषेधही केला आहे; यावरून हेच सिद्ध होत आहे की, आपल्या स्वभावात सुधारणा करण्यासाठी मनुष्यास प्रभुंनी पूर्ण स्वतंत्रता प्रदान केली आहे. म्हणून ईश्वर सर्वथा निर्दोष आहे. भाव हा आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो, ते ईश्वराच्या सहयोगानेच करू शकतो म्हणून तो पराधीन अवश्य आहे, परंतु प्राप्त शक्ति आणि सामग्रीचा सदुपयोग अथवा दुरूपयोग करण्यात पराधीनता नाही आहे. म्हणून शुभाशुभ कर्मांच्या फलाचे दायित्व जीवावर आहे. या स्वतंत्रतेला ही जर तो ईश्वरास समर्पण करून सर्वथा त्याच्यावर निर्भर राहिल तर सहजासहजी कर्मबंधनातून सुटू शकतो. हा भाव स्पष्ट करण्यासाठी या प्रसंगात भगवंताने म्हटले आहे की, “तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥” अर्थात “ज्या परमेश्वराने कर्म करण्याची शक्ति सामग्री प्रदान केली आहे, जो तुमच्या हृदयात स्थित आहे आणि तुमचा प्रेरक आहे त्याला सर्व प्रकारे शरण जावे. त्याच्या कृपेने परम शांति आणि निश्चल परम धामाला प्राप्त व्हाल.” (गीता१८/६२)




संबंध - पूर्वप्रकरणात हे सिद्ध केले गेले आहे की, जीवात्मा कर्ता आहे आणि परमेश्वर त्याला कर्मांमध्ये नियुक्त करणारा आहे. ज्यायोगे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद सिद्ध होत आहे. श्रुतिमध्येही ठिकठिकाणी भेदाचे प्रतिपादन केले गेले आहे. (श्वेता.उ.४/६-७) परंतु काही ठिकाणी अभेदाचेहि प्रतिपादन आहे. (बृह.उ.४/४/५) तथा समस्त जगताचे कारण एक परब्रह्म परमेश्वरच सांगितले गेले आहे. यावरूनही अभेद सिद्ध होतो आहे. म्हणून उक्त विरोधाचे निराकरण करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


अंशो नानाव्यपदेशादन्यथा चापि दाशकितवादित्वमधीयत् एके ॥ २.३.४३ ॥


अर्थ - नानाव्यपदेशात् = श्रुतिमध्ये जीवांना अनेक आणि अलग अलग सांगितले गेले आहे; म्हणून, च = तथा; अन्यथा = दुसर्‍या प्रकाराने, अपि = ही, (हेच सिद्ध होत आहे की) अंशः = जीव ईश्वराचा अंश आहे, एके = कारण की एका शाखेचे; दाशकितवादित्वम् = ब्रह्मास दाशकितव आदिरूप म्हणून; अधीयते = अध्ययन करतात.


व्याख्या - श्वेताश्वतरोपनिषद् (६/१२-१३) मध्ये म्हटले आहे की, “एकी वशी निष्क्रियाणां बहूनामेकं बीजं बहुधा यः करोति । तमात्यस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम् ॥ नित्यों नित्यानां चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान् । तत्कारणं सांख्ययोगाधिगम्यं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः ॥” “बर्‍याचशा निष्क्रिय जीवांवर शासन करणारा जो एक परमेश्वर एका बीजाला (आपल्या प्रकृतिला) अनेक प्रकाराने विस्तृत करतो, त्या आपल्या हृदयात स्थित परमेश्वरास जे ज्ञानीजन निरंतर पहातात, त्यांनाच सदा राहाणारे (शाश्वत) सुख मिळते, दुसर्‍यांना नाही. जो एक नित्य चेतन परब्रह्म परमेश्वर बर्‍याचशा नित्य चेतन जीवांच्या कर्मफलभोगांचे विधान करतो, तोच सर्वांचे कारण आहे. त्या ज्ञानयोग आणि कर्मयोगद्वारा प्राप्त करण्यास योग्य परमदेव, परमेश्वरास जाणून जीवात्मा समस्त बंधनातून मुक्त होतो. याप्रकारे श्रुतिमध्ये जीवांचे नानात्वाचे प्रतिपादन केले गेले आहे. त्याचबरोबर त्याला नित्य आणि चेतनहि म्हटले गेले आहे आणि ईश्वरास जगताचे कारण सांगितले गेले आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की, जीवगण परमेश्वराचा अंश आहे. केवळ एवढयानेच नाही तर प्रकारान्तरानेहि जीवगण ईश्वराचे अंश सिद्ध होत आहे; कारण की अथर्ववेदाच्या शाखा असणार्‍या ब्रह्मसूक्तांत हा पाठ आहे की, ‘ब्रह्म दाशा ब्रह्म दासा ब्रह्मैवेमे कितवाः’ अर्थात ‘हे केवळ ब्रह्म आहेत, दास ब्रह्म आहे तथा हे जुगारी ही ब्रह्मच आहेत.’ याप्रकारे जीवांचे बहुत्व आणि ब्रह्मरूपतेचे ही वर्णन असल्याने हेच सिद्ध होत आहे की, जीव ईश्वराचे अंश आहेत. जर जीवांना परमेश्वराचे अंश न मानता सर्वथा भिन्न तत्त्व मानले गेले तर पूर्वोक्त श्रुतिमध्ये ब्रह्माला जगताचे एकमात्र कारण म्हटले गेले आहे आणि त्या दाश, कितवानाना ब्रह्म म्हटले गेले आहे; त्या कथनात विरोध येईल, म्हणून सर्वथा भिन्न तत्त्व मानले जाऊ शकत नाही. म्हणुन अंश मानणेच युक्तिसंगत आहे. परंतु ज्याप्रकारे साकार वस्तुच्या तुकडयांना तिचा अंश म्हटले जाते, तसे जीवांना ईश्वराचा अंश म्हणता येत नाही कारण की, अवयवरहित अखंड परमेश्वराचा खंड होऊ शकत नाही. म्हणून कार्यकारणभावानेच जीवांना परमेश्वराचे अंश मानणे उचित आहे तथा तो कार्यकारणभावहि याच रूपात आहे की, प्रलयकालात अव्यक्तरूपाने परब्रह्म परमेश्वरात विलीन रहाणारे नित्य आणि चेतन जीव, सृष्टिकालात त्याच परमेश्वरापासून प्रकट होतात आणि पुन्हा संहाराच्या समयी त्यांच्यातच त्या जीवांचा लय होतो तथा त्यांच्या शरीरांची उत्पत्तिही त्या ब्रह्मापासूनच होते. ही गोष्ट श्रीमद्‌‍भगवद्‌गीतेत याप्रकारे स्पष्ट केली गेली आहे. ‘मम योनिर्महद्‌ब्रह्म तस्मिन्गर्भं दध्याम्यहम् । सम्भवः सर्वभूतानां तत्तो भवति भारत ॥ सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥’ ‘हे अर्जुना ! माझी महत् ब्रह्मरूप प्रकृति अर्थात त्रिगुणमयी माया संपूर्ण भूतांची योनि आहे अर्थात गर्भाधानाचे स्थान आहे आणि मी त्या योनिमध्ये चेतनरूप बीजाला स्थापन करतो. त्या जड-चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ति होते. तथा हे अर्जुना ! नाना प्रकारच्या सर्व योनिंमध्ये जितक्या मूर्ति अर्थात शरीरे उत्पन्न होतात, त्या सर्वांची त्रिगुणमयी माझी प्रकृति तर गर्भ धारण करणारी माता आहे आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे.’ (गीता१४/३-४) म्हणून पिता आणि संतानाप्रमाणे जीवांना ईश्वराचा अंश मानणेही शास्त्राच्या कथनानुसार ठीक आहे असे वाटते. आणि असे असल्याने जीव आणि ब्रह्माचा अभेद सांगणार्‍या श्रुतिंचीही सार्थकता होत आहे.




संबंध - प्रमाणान्तराने जीवाचे अंशत्वच सिद्ध करतात.


मन्त्रवर्णाच्च ॥ २.३.४४ ॥


अर्थ - मन्त्रवर्णात् = मंत्राच्या शब्दांपासून, च = ही (हीच गोष्ट सिद्ध होत आहे)


व्याख्या - मंत्रात म्हटले आहे की, पहिल्याने जे काही वर्णन केले गेले आहे, तितके तर या परब्रह्म परमेश्वराचे महत्त्व आहेच, तो परमपुरुष त्याहून अधिकही आहे, समस्त जीव-समुदाय या परब्रह्माचा एक पाद (अंश) आहे, आणि त्याचे तीन पाद अमृतस्वरूप दिव्य (सर्वथा अलौकिक आपल्याच विज्ञानानन्दस्वरूपात) आहेत. (छा.उ.३/१२/६) याप्रकारे मंत्राच्या शब्दात स्पष्टच समस्त जीवांना ईश्वराचे अंश म्हटले गेले आहे. यावरूनच हेच सिद्ध होत आहे की, जीवगण परमेश्वराचे अंश आहेत.




संबंध - हीच गोष्ट श्रुतिप्रमाणांनी सिद्ध करतात.


अपि च स्मर्य्यते ॥ २.३.४५ ॥


अर्थ - अपि = याशिवाय, स्मर्यते च = (भगवद्‌गीता आदिमध्ये) हे स्मरणहि केले गेले आहे.


व्याख्या - ही गोष्ट केवळ मंत्रातच सांगितली गेलेली नाही, तर गीते (१५/७) मध्ये साक्षात् भगवान श्रीकृष्णानी ही याचे अनुमोदन केले आहे. “ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।’ ‘या जीवलोकात हा जीवसमुदाय माझाच अंश आहे.’ याप्रकारे दहाव्या अध्यायात आपल्या मुख्य मुख्य विभूतींचे अर्थात अंशसमुदायांचे वर्णन करून अंती (१०/४२) मध्ये म्हटले आहे की, “अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तरार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥” ‘हे अर्जुना ! तुला या अनेक भेदांना अलग-अलग जाणण्याचे काय प्रयोजन, तू फक्त इतकेच समजून घे की मी आपल्या शक्तिच्या कुठल्या एका अंशाने या समस्त जगतास उत्तमप्रकारे धारण करून स्थित आहे.’ दुसर्‍या ठिकाणी असेही वर्णन आले आहे ‘हे मैत्रेय ! एक पुरुष जीवात्मा जो अविनाशी, शुद्ध, नित्य आणि सर्वव्यापी आहे, तो ही सर्वभूतमय विज्ञानानन्दघन परमात्म्याचा अंशच आहे.’ याप्रकारे स्मृतिंच्या द्वारा समर्थन केले जाण्याने ही हेच सिद्ध होत आहे की, जीवात्मा परमेश्वराचा अंश आहे. ‘ “एकः शुद्धोऽक्षरो नित्यः सर्वव्यापी तथा पुमान् । सोऽप्यंशः सर्वभूतस्य मैत्रेय परमात्मनः ॥ (वि.पु.६/४/३६)




संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, जर जीवात्मा ईश्वराचाच अंश आहे तर मग जीवाच्या शुभाशुभ कर्मांशी आणि सुख-दुःखादि भोगांशी ईश्वराचाही संबंध असला पाहिजे.


प्रकाशादिवन्नैवं परः ॥ २.३.४६ ॥


अर्थ - परः = परमेश्वर, एवम् = याप्रकारे जीवात्म्याच्या दोषांशी संबंध, न = असत नाही, प्रकाशादिवत् = ज्याप्रकारे प्रकाश आदि आपल्या अंशाच्या दोषांनी लिप्त होत नाहीत.


व्याख्या - ज्याप्रकारे प्रकाश सूर्य तथा आकाश आदिही आपले अंश इंद्रिय आदिच्या दोषांनी लिप्त होत नाहीत, तसेच ईश्वरही जीवांच्या शुभाशुभ कर्मफलरूप सुख-दुःखादि दोषांनी लिप्त होत नाही. श्रुतिमध्ये सांगितले आहे. ‘सूर्यो तथा सर्वलोकस्य चक्षुर्न लिप्यते चाक्षुषैर्बाह्यदोषैः । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः ॥’ ‘ज्याप्रकारे समस्त लोकांच्या चक्षुःस्वरूप सूर्यदेव चक्षुमध्ये असणार्‍या दोषांनी लिप्त होत नाहीत, तसाच ईश्वरही जीवांच्या शुभाशुभ कर्मफलरूप सुख-दुःखादि दोषांनी लिप्त होत नाही.’ (क.उ.२/२/११)




संबंध - ही गोष्ट श्रुतिप्रमाणाने पुष्ट करतात.


स्मरन्ति च ॥ २.३.४७ ॥


अर्थ - स्मरन्ति = हीच गोष्ट स्मृतिकार सांगतात, च = आणि (श्रुतिमध्येही सांगितली गेली आहे.)


व्याख्या - श्रीमद्‍भगवद्‍गीतेतही असेच वर्णन मिळते. ‘अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ।’ ‘हे अर्जुन ! हा अविनाशी परमात्मा अनादि आणि गुणातीत असल्यामुळे शरीरात स्थित असूनहि तो स्वयं कर्ता नाही आणि सुख-दुःखादि फलांनी लिप्त होत नाही,’ (गीता १३/३१) याचप्रकारे दुसर्‍या ठिकाणीही सांगितले गेले आहे की त्या दोन्हीमध्ये जो परमात्मा नित्य आणि निर्गुण म्हटले गेले आहे, ‘तो ज्याप्रकारे कमळाचे पान जलात राहुन सुद्धा जलाने लिप्त होत नाही, तसेच तो जीवाच्या कर्मफलांनी लिप्त होत नाही.’ (महाभारत, शांतिपर्व ३५१/१४-१५) याचप्रकारे श्रुतित ही म्हटले आहे की, ‘त्या दोन्हीपैकी एक जीवात्मा तर पिप्पलाच्या फळांचा अर्थात कर्मफलरूप सुख-दुःखांना भोगतो आणि परमेश्वर न भोगता पहात राहतो.’ (मु.उ.३/१/१) यावरूनहि हेच सिद्ध होते की, परमात्मा कुठल्याहि प्रकारे दोषांनी लिप्त होत नाही.




संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, ‘जर सर्व जीव एकाच परमेश्वराचे अंश आहेत, तर कुणा एकासाठी जे काम करण्याची आज्ञा दिली जाते, दुसर्‍यासाठी त्या कामाचा निषेध का केला जातो ? शास्त्रात जीवांसाठी भिन्न भिन्न आदेश दिले जाण्याचे कारण काय आहे ? यावर सांगतात.


अनुज्ञापरिहारी देहसम्बन्धाज्ज्योतिरादिवत् ॥ २.३.४८ ॥


अर्थ - अनुज्ञापरिहारौ = विधि आणि निषेध; ज्योतिरादिवत् = ज्योति आदि प्रमाणे, देहसंबंधात् = शरीराच्या संबंधाने आहेत.


व्याख्या - भिन्न भिन्न प्रकारच्या शरीरांबरोबर जीवात्म्यांचा संबंध असल्याने त्यांच्यासाठी अनुज्ञा आणि निषेधाचा भेद अनुचित नाही. जसे स्मशानातील अग्निला त्याज्य आणि यज्ञाच्या अग्निला ग्राह्य म्हटले गेले आहे. तथा जसे शूद्राला सेवा करण्याची आज्ञा दिली आहे आणि ब्राह्मणांसाठी सेवा वृत्तिचा निषेध केला गेला आहे. याप्रकारे सर्व ठिकाणी समजले पाहिजे. शरीरांच्या संबंधाने यथायोग्य भिन्न भिन्न प्रकारचा विधि-निषेधरूप आदेश उचितच आहे यात काही विरोध नाही.




संबंध - येथे अशी जिज्ञासा होते की, उक्त प्रकाराने विधि-निषेधाची व्यवस्था असल्यावर ही जीवात्म्यांना विभु मानल्याने त्यांचा आणि कर्मांचा अलग-अलग विभाग कसा होईल ? यावर सांगतात.


असन्ततेश्चाव्यतिकरः ॥ २.३.४९ ॥


अर्थ - च = याशिवाय; असंततेः = (शरीराच्या आवरणाने), व्यापकतेचा निरोध होण्यामुळे, अव्यतिकरः = त्यांचे तसेच त्यांच्या कर्मांचे मिश्रण होणार नाही.


व्याख्या - ज्याप्रकारे कारण शरीराचे आवरण असल्याने सर्व जीवात्मे विभु असूनहि प्रलयकालात एक होऊन जात नाहीत, त्यांचा विभाग विद्यमान रहातो. (ब्रह्म.सू.२/३/३०) तसेच सृष्टिकाली शरीरांच्या संबंधाने सर्व जीवांची परस्पर व्याप्ती होत नसल्याने त्यांच्या कर्मांचे मिश्रण होत नाही, विभाग तसाच रहातो कारण की शरीर, अंतःकरण आणि अनादि कर्मसंस्कार आदिच्या संबंधाने त्यांची व्यापकता परमेश्वरासारखी नाही, परंतु सीमित आहे. म्हणून ज्याप्रकारे शब्दमात्राची आकाशात व्याप्ती असूनहि प्रत्येक शब्दाचे परस्पर मिश्रण होत नाही, त्यांची भिन्नता टिकून राहते म्हणून तर एकाच समयी भिन्न भिन्न देशात बोललेल्या शब्दांना भिन्न भिन्न स्थानामध्ये भिन्न भिन्न माणसे रेडियोद्वारा अलग अलग ऐकू शकतात, यात कुठलीही अडचण येत नाही. त्या शब्दांचे विभुत्व आणि अमिश्रण दोन्ही टिकून राहू शकते. तसेध आत्म्यांचे ही विभुत्व त्यांच्या अमिश्रणात बाधक होत नाही. कारण की, आत्मतत्त्व तर शब्दांच्या पेक्षा अत्यंत सूक्ष्म आहे, त्याचे विभु असूनहि परस्पर मिश्रण न होण्याबद्दल तर काय बोलावे !




संबंध - येथपर्यंत जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे तथा तो नित्य आणि विभु आहे या सिद्धांताचे श्रुति-स्मृतिंच्या प्रमाणाने आणि युक्तिंच्याद्वाराही उत्तम प्रकारे प्रतिपादन केले गेले तथा अंशांशिभावामुळे अभेद प्रतिपादक श्रुतिंचीही सार्थकता सिद्ध केली गेली आहे. आता जे लोक जीवात्म्याचे स्वरूप अन्य प्रकाराने मानतात, त्यांचीही मान्यता ठीक नाही, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात.


आभास एव च ॥ २.३.५० ॥


अर्थ - च = याशिवाय, (अन्य प्रकारच्या मान्यतेचे समर्थनासाठी दिली जाणारी युक्तिप्रमाणे), आभासाः = आभासमात्र, एव = च आहेत.


व्याख्या - जे लोक जीवात्म्यास त्या परब्रह्माचा अंश मानत नाहीत, सर्व जीवांना अलग-अलग स्वतंत्र मानतात, त्यांनी आपली मान्यता सिद्ध करण्यासाठी जी युक्तिप्रमाणे दिली आहेत, ती सर्वच्या सर्व आभासमात्र आहेत. म्हणून त्यांचे कथन ठीक नाही आहे. जीवात्म्यांना परमात्म्याचा अंश मानणेच युक्तिसंगत आहे; कारण की असे मानल्यावरच समस्त श्रुतिंच्या वर्णनाची एकवाक्यता होऊ शकते.




संबंध - परब्रह्म परमेश्वराला श्रुतिंमध्ये अखण्ड आणि अवयवरहित म्हटले गेले आहे म्हणून त्याचा अंश होऊ शकत नाही. तरीही जीवांना त्या परमात्म्याचे अंश म्हटले जाते. तो अंशांशिभाव वास्तविक नाही आहे; घटाकाशाप्रमाणे उपाधिच्या निमित्ताने प्रतीत होत असतो, असे मानले तर काय आपत्ति आहे ?


अदृष्टानियमात् ॥ २.३.५१ ॥


अर्थ - अदृष्टानियमात् = अदृष्ट अर्थात जन्मांतरात केलेल्या कर्मफलभोगाची काही नियत व्यवस्था होऊ शकणार नाही. म्हणून (उपाधिच्या निमित्ताने जीवांना परमात्म्याचा अंश मानणे युक्तिसंगत नाही आहे.


व्याख्या - जीवांना परमात्म्याचे अंश न मानता अलग-अलग स्वतंत्र मानण्याने तसेच घटाकाशाप्रमाणे उपाधिच्या निमित्ताने जीवगणास परमात्म्याचा अंश मानण्याने ही जीवांच्या कर्मफलभोगांची व्यवस्था होऊ शकत नाही. कारण की, जर जीवांना अलग-अलग स्वतंत्र मानले तर त्यांच्या कर्मफलभोगाची व्यवस्था कोण करेल ? जीवात्मा स्वयं आपल्या कर्मांचा विभाग करून असा नियम करावा की, अमुक कर्माचे अमुक फळ मला अमुक प्रकाराने भोगायचे आहे तर हे संभव नाही. कर्मे जड आहेत, म्हणून ती ही आपल्या फळाचा भोग करविण्याची व्यवस्था स्वयं करू शकत नाहीत. जर असे मानले की एकच परमात्मा घटाकाशाप्रमाणे अनादिसिद्ध शरीरादिच्या उपाधिंच्या निमित्ताने नाना जीवांच्या रूपात प्रतीत होत आहे, तरीही त्या जीवांच्या कर्मफलभोगाची व्यवस्था होऊ शकत नाही; कारण की, या मान्यतेनुसार जीवात्मा आणि परमात्म्याचा भेद वास्तविक नसल्याने समस्त जीवांच्या कर्मांचा विभाग करणे, त्यांना भोगणार्‍या जीवांचा विभाग करणे तसेच परमात्म्याला त्या सर्वांपासून अलग राहून त्यांचा व्यवस्थापक मानणे संभव होणार नाही. म्हणून श्रुतिच्या असेच मानणे योग्य आहे की, सर्वशक्तिमान परब्रह्म परमेश्वरच सर्वांच्या कर्मफलांची यथायोग्य व्यवस्था करतो, तसेच सर्व जीव त्याच्यापासून प्रकट होतात, म्हणून पिता-पुत्राप्रमाणे त्याचे अंश होतात.




संबंध - केवळ कर्मफलभोगामध्येच नाही; संकल्प आदिमध्ये ही त्याच दोषांची प्राप्ति दाखवितात.


अभिसन्ध्यादिष्वपि चैवम् ॥ २.३.५२ ॥


अर्थ - च = याशिवाय, एवम् = याप्रकारे, अभिसन्ध्यादिषु = संकल्प आदिमध्ये; अपि = ही (अव्यवस्था होईल)


व्याख्या - ईश्वर आणि जीवांचा अंशांशिभाव वास्तविक नाही, घटाकाशाप्रमाणे उपाधिच्या निमित्ताने प्रतीत होणारा आहे. असे मानल्यावर ज्याप्रकारे पूर्वसूत्रात जीवांच्या कर्मफलभोगांची नियमित व्यवस्था होऊ न शकण्याचा दोष दाखविला गेला आहे; त्याचप्रकारे त्या जीवांच्या संकल्प आणि इच्छा आदिच्या विभागाची नियमित व्यवस्था होण्यातही बाधा येईल; कारण की त्या सर्वांचे संकल्प आदि परस्पर अलग राहू शकणार नाहीत आणि परमात्म्याचे संकल्प आदिशीही त्यांचा भेद सिद्ध होऊ शकणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये जे परब्रह्म परमेश्वर द्वारा ईक्षण (संकल्पपूर्वक जगताची उत्पत्ति करण्याचे वर्णन आहे, त्याचीही संगति लागणार नाही.)




संबंध - देशभेदानेही नाही -


प्रदेशादिति चेन्न, अन्तरभावात् ॥ २.३.५३ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल, प्रदेशात् = उपाधिंमध्ये देशभेद होण्यामुळे (सर्व व्यवस्था होऊन जाईल); इति न = तर हे होऊ शकत नाही; अन्तर्भावात् = कारण की सर्व देशांचा उपाधिमध्ये आणि उपाधिंचा सर्व देशांमध्ये अंतर्भाव आहे.


व्याख्या - जर म्हणाल, उपाधिंच्या मध्ये देशांचा भेद होण्याने सर्व जीवांचा वेगवेगळा विभाग होऊन जाईल आणि त्यामुळे कर्मफलभोग तसेच संकल्प आदिची ही व्यवस्था होऊन जाईल, तर अशी गोष्ट नाही आहे, कारण की, सर्वव्यापी परब्रह्म सर्व उपाधिंमध्ये व्याप्त आहे. उपाधिंच्या देशभेदाने परमात्म्याच्या देशात भेद होऊ शकत नाही. प्रत्येक उपाधिचा संबंध सर्व देशाशी असू शकतो. उपाधि एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी गेली तर तिच्याबरोबर आकाश येत जात नाही. जेव्हा ज्या देशात उपाधि रहाते, त्यावेळी तेथील आकाश तिच्यात येऊन जाते. याप्रकारे समस्त आकाशाच्या प्रदेशाचा सर्व उपाधिंमध्ये अंतर्भाव होईल. याचप्रकारे समस्त उपाधिंचाहि आकाशात अंतर्भाव होईल. कुठल्याहि प्रकारे कुठलाही विभाग सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून परब्रह्म परमेश्वर आणि जीवात्म्यांचा अंशांशिभाव घटाकाशाप्रमाणे उपाधिनिमित्तक मानला जाऊ शकत नाही.




येथे दुसर्‍या अध्यायातील तिसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP