श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
त्रयोविंशोऽध्यायः

बलेः सुतललोकगमनं वामनस्य उपेंद्रपदेऽभिषेकश्च -

बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
इत्युक्तवन्तं पुरुषं पुरातनं
     महानुभावोऽखिलसाधुसंमतः ।
बद्धाञ्जलिर्बाष्पकलाकुलेक्षणो
     भक्त्युत्कलो गद्‍गदया गिराब्रवीत् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
पुराण ऐशा पुरुषोत्तमाच्या
    ऐकोनि बोला द्रवला बळीतो ।
तो संतप्रीयो अन दैत्यराजा
    जोडोनि हाता मग बोलला हे ॥ १ ॥

महानुभावः - मोठया योग्यतेचा - अखिलसाधुसंमतः - व सर्व सज्जनांना मान्य असा बलिराजा- बाष्पकुलाकुलेक्षणः - अश्रुबिंदूंनी नेत्र भरून गेले आहेत ज्याचे असा- बद्धांजलिः - हात जोडलेला- इति उक्तवन्तं पुरातनं पुरुषं - अशा रीतीने बोलणार्‍या पुराणपुरुष विष्णूला- भक्त्युग्दलः - भक्तीमुळे कंठ दाटून आला आहे ज्याचा असा- गग्ददया गिरा अब्रवीत् - अडखळणार्‍या शब्दांनी बोलला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्‍गद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला - (१)


श्रीबलिरुवाच -
अहो प्रणामाय कृतः समुद्यमः
     प्रपन्नभक्तार्थविधौ समाहितः ।
यल्लोकपालैस्त्वदनुग्रहोऽमरैः
     अलब्धपूर्वोऽपसदेऽसुरेऽर्पितः ॥ २ ॥
बळी म्हणाला -
प्रणामिले ना तुज पूर्ण देवा
    तशा प्रयत्‍ने मज लाभ झाला ।
ना लोकपाला अन देवतांना
    अशी कृपा ही मजला मिळाली ॥ २ ॥

अहो प्रणामाय कृतः समुद्यमः - अहो नमस्कारासाठी केलेला प्रयत्न- प्रसन्नभक्तार्थविधौ समाहितः - शरणागत भक्तांचे कार्य साधण्याकरिता योजिला गेला- यत् - कारण- लोकपालैः अमरैः - लोकपाल देवांनी - अलब्धपूर्वः त्वदनुग्रहः - पूर्वी न मिळविलेली अशी तुझी कृपा- अपसदे असुरे - मी जो नीच दैत्य - (मयि) अर्पितः - त्याला दाखविली गेली. ॥२॥
बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्‍न केला, तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या नीच असुरावर केलीत. (२)


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
इत्युक्त्वा हरिमानत्य ब्रह्माणं सभवं ततः ।
विवेश सुतलं प्रीतो बलिर्मुक्तः सहासुरैः ॥ ३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
बळी हे बोलता ऐसे तुटले बद्ध-पाश ते ।
त्याने प्रणामिला विष्णू ब्रह्म देव तसा शिवो ॥
पुन्हा प्रसन्न चित्ताने निघाला सुतला कडे ॥ ३ ॥

मुक्तः - पाशातून सुटलेला - प्रीतः बलिः - व प्रसन्न अंतःकरण झालेला बलिराजा- इति उक्त्वा - याप्रमाणे बोलून- हरि सभवं - विष्णू व शंकर यांसह - ब्रह्माणं (च) आनम्य - ब्रह्मदेव यांना नमस्कार करून- ततः असुरैः सह - नंतर दैत्यांसह- सुतलं विवेश - सुतलामध्ये शिरला. ॥३॥
श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. (३)


एवं इन्द्राय भगवान् प्रत्यानीय त्रिविष्टपम् ।
पूरयित्वादितेः कामं अशासत् सकलं जगत् ॥ ४ ॥
या परी भगवंताने स्वर्गीचे राज्य घेउनी ।
इंद्राला दिधले आणि उपेंद्र जाहला स्वयें ॥
दितीची कामना पूर्ण केली नी जग शासि तो ॥ ४ ॥

भगवान् - परमेश्वर- एवं इंद्राय - याप्रमाणे इंद्राला - त्रिविष्टपं प्रत्यानीय - स्वर्गाचे राज्य परत मिळवून देऊन- अदितेः कामं पूरयित्वा - अदितीची इच्छा पूर्ण करून- जगत् अशासत् - संपूर्ण जगाचे रक्षण करिता झाला. ॥४॥
अशा प्रकारे भगवंतांनी बलीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. (४)


लब्धप्रसादं निर्मुक्तं पौत्रं वंशधरं बलिम् ।
निशाम्य भक्तिप्रवणः प्रह्राद इदमब्रवीत् ॥ ५ ॥
प्रल्हादे पाहिले पौत्रा कृपालाभ असा मिळे ।
भक्तीने भरले चित्त श्रीहरी स्तविला तये ॥ ५ ॥

भक्तिप्रवणः प्रह्लादः - भक्तीने नम्र झालेला प्रल्हाद- लब्धप्रसादं - प्रसाद मिळविलेल्या - वंशधरं पौत्रं बलिं - व वंशाला धारण करणार्‍या नातू बलिराजाला- निर्मुक्तं निशाम्य - वरुणपाशांतून मुक्त झालेला पाहून- इदम् अब्रवीत् - हे म्हणाला. ॥५॥
जेव्हा प्रह्लादांनी पाहिले की, माझा वंशज नातू बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली. (५)


श्रीप्रह्राद उवाच -
नेमं विरिञ्चो लभते प्रसादं
     न श्रीर्न शर्वः किमुतापरेऽन्ये ।
यन्नोऽसुराणामसि दुर्गपालो
     विश्वाभिवन्द्यैरभिवन्दिताङ्‌घ्रिः ॥ ६ ॥
प्रल्हादजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
ब्रह्मा नि लक्ष्मी शिवजीस तैसे
    कोणा न झाला असला प्रसाद ।
ब्रह्मादि सारे तुज वंदितात
    तो दुर्गपालो असुरासि झाला ॥ ६ ॥

विरिञ्चः - ब्रह्मदेव- इमं ते प्रसादं न लभते - तुझा हा प्रसाद मिळवीत नाही- श्रीः न शर्वः न - लक्ष्मी व शंकर मिळवीत नाहीत, - किमतु अपरे - मग दुसर्‍यांची कथा काय- यत् - जो- विश्वाभिवंद्यैः अपि - जगाला वंदनीय अशा सत्पुरुषांनीही - वन्दिताङ्‌घ्रि (त्वं) - ज्याचे चरणकमल वंदिले आहेत असा तू- असुराणां नः - आम्हा दैत्यांचा- दुर्गपालः - दुर्गसंरक्षक- असि - झाला आहेस. ॥६॥
प्रह्लाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्षी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसर्‍यांची गोष्ट कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. (६)


यत्पादपद्ममकरन्दनिषेवणेन
     ब्रह्मादयः शरणदाश्नुवते विभूतीः ।
कस्माद्वयं कुसृतयः खलयोनयस्ते
     दाक्षिण्यदृष्टिपदवीं भवतः प्रणीताः ॥ ७ ॥
या पादपद्मी बसुनी विधी तो
    विभूति मोठ्या अन शक्ति मेळी ।
आम्ही कुळाने खळ नी कुमार्गी
    झाले तुम्ही द्वारपालो प्रसन्ने ॥ ७ ॥

शरणद - हे शरणागताला आश्रय देणार्‍या ईश्वरा- ब्रह्मादयः - ब्रह्मादिदेव- यत्पादपद्ममकरन्दनिषेवणेन - ज्याच्या चरणकमळांतील रसाच्या सेवनाने - विभूतीः अश्नुते - ऐश्वर्याचा उपभोग घेतात- कुसृतयः - दुराचारी - खलयोनयः ते वयं - व दुष्कुळांत जन्मले गेले ते आम्ही- भवतः - तुम्ही आपल्या - दाक्षिण्यदृष्टिपदवीं - बहुमानपूर्वक कृपादृष्टीला योग्य - कस्मात् प्रणीताः - काय म्हणून केले. ॥७॥
हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्ण दृष्टी कशी काय वळली ? (७)


चित्रं तवेहितमहोऽमितयोगमाया
     लीलाविसृष्टभुवनस्य विशारदस्य ।
सर्वात्मनः समदृशोऽविषमः स्वभावो
     भक्तप्रियो यदसि कल्पतरुस्वभावः ॥ ८ ॥
तू योगामाये रचिलीस सृष्टी
    सर्वज्ञ आत्मा समदर्शि तू तो ।
लीला तुझ्या त्या अघटीत सर्व
    त्या कल्पवृक्षा परि तू स्वभावे ।
तू पक्षघेसी निजभक्त त्यांचा
    अभक्त त्यांना अति निर्दयो ही ॥ ८ ॥

अहो - अहो- अमितयोगमाया - आचिंत्य योगमायेच्या - लीलाविसृष्टभुवनस्य - क्रीडेने निर्मिले आहे जग ज्याने अशा- विशारदस्य सर्वात्मनः - निपुण, सर्वस्वरूपी - समदृशः तव - व समदृष्टि अशा तुझे- चित्रं ईहितम् - चरित्र विचित्र आहे- यत् - कारण- अविषमस्वभावः - सर्वांवर सारखी दृष्टी ठेवणारा - भक्तप्रियः (त्वम्) - व भक्तांना प्रिय असा तू- कल्पतरुस्वभावः (असि) - कल्पवृक्षासारख्या स्वभावाचा आहेस. ॥८॥
आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणार्‍यांच्या बाबतील पक्षपाती आणि विन्मुख असणार्‍यांच्या बाबतीत निर्दय बनता ! (८)



श्रीभगवानुवाच -
(अनुष्टुप्)
वत्स प्रह्राद भद्रं ते प्रयाहि सुतलालयम् ।
मोदमानः स्वपौत्रेण ज्ञातीनां सुखमावह ॥ ९ ॥
श्री भगवान म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
सुखी हो वत्स प्रल्हादा ! तूही जा सुतळात त्या ।
आनंदपूर्णची राही बळीपौत्रा सवे तिथे ॥ ९ ॥

वत्स प्रह्लाद - हे बाळा प्रल्हाद- ते भद्रं (अस्तु) - तुझे कल्याण असो- स्वपौत्रेण - आपल्या नातवासह - मोदमानः सुतलालयं प्रयाहि - आनंदित होत्साता सुतलात जा- ज्ञातीनां सुखम् आवह - बांधवांना सुख दे. ॥९॥
श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रह्लादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. (९)


नित्यं द्रष्टासि मां तत्र गदापाणिमवस्थितम् ।
मद्दर्शनमहाह्लाद ध्वस्तकर्मनिबन्धनः ॥ १० ॥
सगदा तू तिथे नित्य मजला पाहशील की ।
सदैव दर्शने माझ्या तुटेल कर्म बंध ते ॥ १० ॥

तत्र गदापाणिं अवस्थितं मां - त्या सुतलात गदा हातात घेऊन राहिलेल्या मला- मद्दर्शनमहाह्लाद - माझ्या दर्शनामुळे झालेल्या आनंदाने - ध्वस्तकर्मनिबन्धनः (त्वं) - नष्ट झाली आहेत कर्माची बंधने ज्याची असा तू- नित्यं दृष्टासि - नित्य पाहशील. ॥१०॥
तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील. (१०)


श्रीशुक उवाच -
आज्ञां भगवतो राजन् प्रह्रादो बलिना सह ।
बाढमित्यमलप्रज्ञो मूर्ध्न्याधाय कृताञ्जलिः ॥ ११ ॥
परिक्रम्यादिपुरुषं सर्वासुरचमूपतिः ।
प्रणतः तदनुज्ञातः प्रविवेश महाबिलम् ॥ १२ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
दैत्येंद्र शुद्धबुद्धी तो आज्ञा घेवोनिया शिरी ।
बळीच्या सहही त्याने करोनी त्या परीक्रमा ॥ ११ ॥
घेतली भगवद्‌आज्ञा जोडोनी कर दोन्हि ते ।
नमिले भगवंताला चालला यात्रि सूतला ॥ १२ ॥

राजन् - हे परीक्षित राजा- अचलप्रज्ञः सर्वासुरचमूपतिः प्रह्लादः - निर्मळबुद्धीचा असा सर्व दैत्यसेनेचा अधिपति प्रल्हाद- बलिना सह कृतांज्जलिः - बलिराजासह हात जोडिलेला- भगवतः आज्ञां - परमेश्वराची आज्ञा - बाढं इति मूर्ध्नि आधाय - ‘बरे आहे’ असे म्हणून शिरसा ग्रहण करून- आदिपुरुषं परिक्रम्य - महाविष्णूला प्रदक्षिणा करून- प्रणतः तदनुज्ञातः च - नम्र झालेला व त्याची अनुज्ञा मिळालेला- महाबिलं प्रविवेश - सुतलामध्ये शिरला. ॥११-१२॥
श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्ध बुद्धी प्रह्लादांनी ’ठीक’ असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. (११-१२)


अथाहोशनसं राजन् हरिर्नारायणोऽन्तिके ।
आसीनं ऋत्विजां मध्ये सदसि ब्रह्मवादिनाम् ॥ १३ ॥
परीक्षिता ! तये वेळी ब्रह्मवादी सभेत त्या ।
शुक्राचार्या हरी बोले जे होते समिपी तयां ॥ १३ ॥

राजन् - हे परीक्षित राजा- अथ हरिः नारायणः - नंतर भगवान विष्णु- अंतिके सदसि - जवळच सभेत - ब्रह्मवादिनां ऋत्विजां मध्ये - ब्रह्मवेत्त्या ऋत्विजांमध्ये - आसीनं उशनसं आह - बसलेल्या शुक्राचार्याला म्हणाला. ॥१३॥
परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्य़ांना म्हटले. (१३)


ब्रह्मन् सन्तनु शिष्यस्य कर्मच्छिद्रं वितन्वतः ।
यत् तत् कर्मसु वैषम्यं ब्रह्मदृष्टं समं भवेत् ॥ १४ ॥
आचार्य आपुला शिष्य यज्ञ होता करीत तो ।
त्रुटी पूर्ण कराव्या त्या द्विजा सामर्थ्य ते असे ॥ १४ ॥

ब्रह्मन् - हे शुक्राचार्या- कर्मवितन्वतः शिष्यस्य - यज्ञ करणार्‍या शिष्य बलिराजाचे- यत् छिद्रं (स्यात्) - जे न्यून असेल- तत् संतनु - ते भरून काढ- कर्मसु वैषम्यं - कर्मातील न्यून - ब्रह्मदृष्टं समं भवेत् - ब्राह्मणाने अवलोकन केले असता भरून निघेल. ॥१४॥
ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी तृटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते. (१४)


श्रीशुक्र उवाच -
कुतस्तत्कर्मवैषम्यं यस्य कर्मेश्वरो भवान् ।
यज्ञेशो यज्ञपुरुषः सर्वभावेन पूजितः ॥ १५ ॥
शुक्राचार्य म्हणाले -
अर्पिता सर्व ते कर्म श्रीयज्ञेश्वर पूजिता ।
त्रुटी कर्मात त्याच्या ती राहील कशि सांग पा ॥ १५ ॥

कर्मेश्वरः यज्ञेशः यज्ञपुरुषः भवान् - कर्माधिपति, यज्ञचालक व यज्ञमूर्ति असा तू- यस्यं सर्वभावेन पूजितः - ज्याकडून सर्व वस्तू अर्पण करून पूजिला गेलास- तत्कर्मवैषम्यं कुतः - त्याच्या कर्मात न्यूनता कशी असणार ? ॥१५॥
शुक्राचार्य म्णाले, भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील. (१५)


मंत्रतः तंत्रतः छिद्रं देशकालार्हवस्तुतः ।
सर्वं करोति निश्छिद्रं अनुसंकीर्तनं तव ॥ १६ ॥
मंत्र काल तपो देश पात्र वस्तू त्रुटी अशा ।
नामसंकीर्तने पूर्ण होती रे श्री हरी तुझ्या ॥ १६ ॥

तवंनामसंकीर्तनं - तुझ्या नावाचे कीर्तन- मन्त्रतः तन्त्रतः - मन्त्र, तंत्र - देशकालार्ह वस्तुतः - व देशकालानुरूप वस्तू ह्यांमुळे होणारे- छिद्रं सर्वं निच्छिद्रं करोति - सर्व न्यून पूर्ण करिते. ॥१६॥
कारण मंत्रांचे, अनुष्ठान पद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूंविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. (१६)


तथापि वदतो भूमन् करिष्याम्यनुशासनम् ।
एतच्छ्रेयः परं पुंसां यत् तवाज्ञा अनुपालनम् ॥ १७ ॥
अनंता ! तरि ही आज्ञा मानोनी पाळितो पहा ।
कल्याण साधत तेणे आज्ञा ती पाळणे तुझी ॥ १७ ॥

तथा अपि - तरीसुद्धा- भूमन् - हे महात्मा विष्णो- वदतः (ते) अनुशासनं करिष्यामि - सांगणार्‍या तुझी आज्ञा मी पाळीन- यत् तव् आज्ञानुपालनं - जे तुझ्या आज्ञेचे पालन- एतत् पुंसां परं श्रेयः (अस्ति) - हे पुरुषांना अत्यंत कल्याणप्रद होय. ॥१७॥
तथापि अनंत, आपणच जर म्हणत असाल, तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परम कल्याण आहे. (१७)


श्रीशुक उवाच -
अभिनन्द्य हरेराज्ञां उशना भगवानिति ।
यज्ञच्छिद्रं समाधत्त बलेर्विप्रर्षिभिः सह ॥ १८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
हरिआज्ञा स्विकारोनी भगवान्‌ शुक्र यांनि ही ।
अन्य द्विजांसवे तेंव्हा यज्ञपूर्तीहि साधिली ॥ १८ ॥

भगवान् उशनाः - सर्वगुणसंपन्न शुक्राचार्य- इति हरेः आज्ञां अभिनन्द्य - याप्रमाणे विष्णूच्या आज्ञेचे अभिनंदन करून- विप्रर्षिभिः सह बलेः - ब्रह्मर्षीसह बलिराजाच्या - यज्ञच्छिद्रं समाधत्त - यज्ञातील न्यूनता पूर्ण करिता झाला. ॥१८॥
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षींसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. (१८)


एवं बलेर्महीं राजम् भिक्षित्वा वामनो हरिः ।
ददौ भ्रात्रे महेन्द्राय त्रिदिवं यत्परैर्हृतम् ॥ १९ ॥
बळीच्या कडुनी ऐसा वामने स्वर्ग घेतला ।
दिधला बंधुइंद्राला पराजित असोनिया ॥ १९ ॥

राजन् - हे परीक्षित राजा- वामनः हरिः - वामनावतारी विष्णु- एवं बलेः महीं भिक्षित्वा - याप्रमाणे बलीजवळ पृथ्वीची याचना करून- परैः यत् हृतं त्रिदिवं - शत्रूंनी जो हरण केलेला स्वर्ग- (तं) भ्रात्रे महेन्द्राय ददौ - तो भाऊ जो इंद्र त्याला देता झाला. ॥१९॥
परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणार्‍या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. (१९)


प्रजापतिपतिर्ब्रह्मा देवर्षिपितृभूमिपैः ।
दक्षभृग्वङ्‌गिरोमुख्यैः कुमारेण भवेन च ॥ २० ॥
प्रजापती पतीब्रह्मा देवर्षी पितरे मनू ।
दक्ष भृगु कुमारो नी अंगिरे कश्यपे शिवे ॥ २० ॥

प्रजापतिपतिः ब्रह्मा - मरिच्यादि प्रजापतींचा अधिपति असा ब्रह्मदेव- देवर्षिपितृभूमिपैः - देव, ऋषि, पितर, राजे, ह्यांसह तसेच - दक्षभृग्वाङ्‌गिरोमुख्यैः - दक्ष, भृगु आणि अंगिरा हे ज्यात मुख्य आहेत अशांसह - कुमारेण भवेन च - आणि कार्तिकस्वामी व शंकर ह्यांसह- ॥२०॥
यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पितर, मनू, दक्ष, भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह (२०)


कश्यपस्यादितेः प्रीत्यै सर्वभूतभवाय च ।
लोकानां लोकपालानां अकरोद् वामनं पतिम् ॥ २१ ॥
अदितीच्या प्रसन्नार्थे आणि अभ्यूदया जगा ।
लोकपालपदी केले स्थापीत वामना तदा ॥ २१ ॥

कश्यपस्य (च) अदितेः प्रीत्यै - कश्यपाच्या व अदितीच्या संतोषाकरिता - सर्वभूतभवाय च - आणि सर्व प्राण्यांच्या उत्कर्षाकरिता- वामनं लोकानां - वामनाला लोकांचा - लोकपालानां पतिम् अकरोत् - व लोकपालांचा अधिपति करिता झाला. ॥२१॥
कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला. (२१)


वेदानां सर्वदेवानां धर्मस्य यशसः श्रियः ।
मंगलानां व्रतानां च कल्पं स्वर्गापवर्गयोः ॥ २२ ॥
वेदो देव यशो धर्म लक्षुमी मंगलो व्रत ।
स्वर्गादी रक्षिण्या साठी उपेंद्र वामना तदा ॥ २२ ॥

वेदानां सर्वदेवानां - वेद, सर्व देव, - धर्मस्य यशसः श्रियः - धर्म, कीर्ति व लक्ष्मी ह्यांचे- मङगलानां व्रतानां - मंगलकारक व्रते - स्वर्गापवर्गयोः - आणि स्वर्ग व मोक्ष - च कल्पं - ह्यांचे रक्षण करण्यास ॥२२॥
परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून (२२)


उपेन्द्रं कल्पयां चक्रे पतिं सर्वविभूतये ।
तदा सर्वाणि भूतानि भृशं मुमुदिरे नृप ॥ २३ ॥
स्थापिले सर्व कल्याण सर्वशक्ति हरीसि नी ।
आनंद बहुही झाला प्राणिमात्रासि तो तदा ॥ २३ ॥

उपेन्द्रं - समर्थ अशा उपेन्द्राला - सर्वविभूतये पतिं कल्पयाञ्चक्रे - सर्वांच्या कल्याणासाठी पति करता झाला- नृप - हे परीक्षित राजा- तदा सर्वाणि भूतानि - त्या वेळी सर्व प्राणी - भृशं मुमुदिरे - अत्यंत आनंदित झाले. ॥२३॥
सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. (२३)


ततस्त्विन्द्रः पुरस्कृत्य देवयानेन वामनम् ।
लोकपालैर्दिवं निन्ये ब्रह्मणा चानुमोदितः ॥ २४ ॥
आज्ञा घेवोनि ब्रह्म्याची इंद्राने वामना तदा ।
विमानी घेतले तैसे स्वर्गी घेवोनि पातला ॥ २४ ॥

ततः च - त्यानंतरही- इंद्रः तु - इंद्र तर- ब्रह्मणा अनुमोदितः - ब्रह्मदेवाने अनुमोदन दिलेला- वामनं पुरस्कृत्य - वामनाचा सत्कार करून- देवयानेन - विमानातून- लोकपालैःसह दिवं निन्ये - लोकपालांसह स्वर्गी नेता झाला. ॥२४॥
यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वांच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोवर स्वर्गात नेले. (२४)


प्राप्य त्रिभुवनं चेन्द्र उपेन्द्रभुजपालितः ।
श्रिया परमया जुष्टो मुमुदे गतसाध्वसः ॥ २५ ॥
इंद्राला लाभला स्वर्ग मिळाले हरिछत्र ही ।
ऐश्वर्य पातले पायी आनंदोत्सव जाहला ॥ २५ ॥

उपेन्द्रभुजपालितः - वामनाच्या बाहुबलाच्यायोगे - परमया श्रिया जुष्टः - रक्षिलेला व श्रेष्ठ ऐश्वर्याने सेविलेला- गतसाध्वसः च - आणि निर्भय झालेला- इंद्रः - इंद्र- त्रिभुवनं प्राप्य मुमुदे - त्रैलोक्य मिळवून आनंदित झाला. ॥२५॥
इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. (२५)


ब्रह्मा शर्वः कुमारश्च भृग्वाद्या मुनयो नृप ।
पितरः सर्वभूतानि सिद्धा वैमानिकाश्च ये ॥ २६ ॥
कुमारो शंकरो ब्रह्मा भृगू सिद्ध मुनी भुते ।
सिद्ध नी पितरे देव विमानी बैसले तदा ॥ २६ ॥

नृप - हे परीक्षित राजा- ब्रह्मा शर्वः - ब्रह्मदेव, शंकर - कुमारः च भृग्वाद्याः मुनदः - कार्तिकस्वामी तसेच भृगु आदिकरून मुनि,- पितरः सर्वभूतानि - पितर व सर्व प्राणी- ये वैमानिकाः सिद्धाःच - आणि जे विमानात बसून जाणारे देव आणि सिद्ध- ॥२६॥
ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगू इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगण, (२६)


सुमहत्कर्म तद्विष्णोः गायन्तः परमाद्‍भुतम् ।
धिष्ण्यानि स्वानि ते जग्मुः अदितिं च शशंसिरे ॥ २७ ॥
अद्‌भूत भगवद्‌लीला मुखांनी गाउ लागले ।
निघाले आपुल्या लोका अदितीला प्रशंसुनी ॥ २७ ॥

विष्णोः परमाद्‌भुतं - विष्णूचे अत्यंत आश्चर्यजनक - तत् सुमहत् कर्म - असे ते मोठे कृत्य- गायन्तः स्वानि धिषानि जग्मुः - गात गात आपापल्या स्थानी गेले- अदितिं च शशंसिरे - आणि अदितींची स्तुति करू लागले. ॥२७॥
भगवंतांच्या या परम अद्‌भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली. (२७)


सर्वं एतन्मयाख्यातं भवतः कुलनन्दन ।
उरुक्रमस्य चरितं श्रोतॄणां अघमोचनम् ॥ २८ ॥
परीक्षिता तुला मी ही भगवत्‌कीर्ति बोललो ।
ऐकता सर्व ती पापे सुटोनी पळती पुढे ॥ २८ ॥

कुलनन्दन - कुरूकुलाला आनंद देणार्‍या हे परीक्षित राजा- श्रोतृणां अघमोचनं - श्रोत्यांच्या पापांचे नाश करणारे - उरुक्रमस्य एतत् सर्वं चरितं - महापराक्रमी वामनाचे हे सर्व चरित्र- मया भवतः आख्यातं - मी आपणाला सांगितले. ॥२८॥
परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणार्‍यांची सर्व पापे नष्ट होतात. (२८)


पारं महिम्न उरुविक्रमतो गृणानो
     यः पार्थिवानि विममे स रजांसि मर्त्यः ।
किं जायमान उत जात उपैति मर्त्य
     इत्याह मन्त्रदृगृषिः पुरुषस्य यस्य ॥ २९ ॥
(वसंततिलका)
लीला अनंत हरिच्या महिमा अपार
    ना मोजमाप जणु हे भुमिचे कणो की ।
ना जन्मला नच पुढे गुण वर्णि ऐसा
    वेदात ते मुनिवसिष्ठ वदोनि गेले ॥ २९ ॥

यः उरुविक्रमतः - जो महापराक्रमी वामनाचे - महिम्नः - माहात्म्य - पारं गृणानः (स्यात्) - पूर्णपणे वर्णन करणारा असेल- सः मर्त्यः पार्थिवानि रजांसि विममे - तो मनुष्य पृथ्वीचे परमाणुही मोजील- जायमानः उत जातः - विद्यमान अथवा होऊन गेलेला मनुष्य - मर्त्यः (तस्य पारं) उपैति किम् - त्या माहात्म्याच्या अंताला पोहोचेल काय- इति मन्त्रदृक् ऋषिः - असे एका मंत्रद्रष्टया ऋषीने - यस्य पुरुषस्य आह - ज्या परमेश्वरासंबंधाने म्हटले आहे. ॥२९॥
भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रद्रष्ट्या महर्षी वसिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. (२९)


(अनुष्टुप्)
य इदं देवदेवस्य हरेरद्‍भुतकर्मणः ।
अवतारानुचरितं श्रृण्वन्याति परां गतिम् ॥ ३० ॥
(अनुष्टुप्‌)
वामनो देव देवांचा त्याची अद्‌भूत ही लिला ।
ऐकता या चरित्राला गति उत्तम लाभते ॥ ३० ॥

यः अद्‌भुतकर्मणः - जो आश्चर्यकारक कृत्य करणार्‍या - देवदेवस्य हरेः - देवाधिदेव विष्णूच्या- इदं अवतारानुचरितं - ह्या अवतारातील चरित्राला- शृण्वन् (भवति) - ऐकणारा होतो- (सः) परांगतिं याति - तो श्रेष्ठ गतीला जातो. ॥३०॥
अद्‌भुत लीला करणार्‍या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परमगती प्राप्त होते. (३०)


क्रियमाणे कर्मणीदं दैवे पित्र्येऽथ मानुषे ।
यत्र यत्रानुकीर्त्येत तत्तेषां सुकृतं विदुः ॥ ३१ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे वामनावतारचरिते त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
यज्ञात देव पित्रांच्या कर्मी त्या कोणत्याहि ही ।
कीर्तनी गायिली जाता कर्माचे फळ लाभते ॥
अनुभवो महात्म्यांचा थोर श्रेष्ठासही तसा ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ तेविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २३ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

क्रियमाणे दैवे - आरंभिलेल्या देवसंबंधी, - पित्र्ये अथ मानुषे कर्मणि - पितृसंबंधी तशाच मनुष्यसंबंधी कर्मामध्ये- यत्र-यत्र इदं अनुकीर्त्येत - जेथे जेथे हे चरित्र वर्णन केले जाईल- तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी- तत् तेषां - ते कर्म त्यांच्याकडून - सुकृतं विदुः - यथासांग केले गेले असे म्हणतात. ॥३१॥
देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे कीर्तन होते, ते कर्म सफल होते. (३१)


स्कंध आठवा - अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP